अष्टांगिक मार्गाचे स्पष्टीकरण

ह्या आर्य अष्टांगिक मार्गाची सम्यक् दृष्टि ही पहिली पायरी आहे. सम्यक् दृष्टि म्हणजे चार आर्यसत्यांचे यथार्थ ज्ञान. जगामध्ये दु:ख भरले आहे. ते मनुष्यजातीच्या तीव्र तृष्णेमुळे उत्पन्न झाले, त्या तृष्णेचा क्षय केला असता सर्वांना शांति मिळणे शक्य आहे आणि परस्परांशी कायावाचामनेकरून सदाचाराने, सत्याने, प्रेमाने, आणि कळकळीने वागणे, हा आर्य अष्टांगिक मार्ग त्या शांतीचा मार्ग आहे. अशी सम्यक् दृष्टि लोकांत उद्भवली नाही तर अहंकाराच्या आणि स्वार्थाच्या पायी होणारे तंटेबखेडे थांबावयाचे नाहीत आणि जगाता शांति मिळवायची नाही.

आपले ऐश्वर्य आणि सत्ता वाढविण्याचा संकल्प प्रत्येक व्यक्तीने केला तर त्यापासून त्याची आणि इतरांची सारखीच हानी होणार आहे. यासाठी कामोपभेगीत बद्ध न होण्याचा, इतरांशी पूर्ण मैत्री करण्याचा, आणि इतरांच्या सुखसमाधानात भर घालण्याचा शुद्ध संकल्प बाळगणे योग्य आहे. खोटे भाषण, चहाडी, शिवीगाळ, वृथा बडबड इत्यादि असद्वाणीच्या योगे समाजाची घडी बिघडते, व तंटबखेडे उद्भवून ते हिंसेला कारणीभूत होतात म्हणून सत्य परस्परांचे सख्य साधणारे प्रिय आणि मित भाषण करणे योग्य आहे यालाच सम्यक वाचा म्हणतात.

प्राणघात, चोरी, व्यभिचार, इत्यादि कर्मे कायेने आचरली तर त्यापासून समाजात मोठे अनर्थ उत्पन्न होतील, यास्तव प्राणघात, चोरी, व्यभिचार इत्यादिक कर्मापासून अलिप्त राहून लोकांचे कल्याण होईल अशीच कायकर्मे आचरली पाहिजेत. यालाच सम्यक् कर्मान्त म्हणतात.

सम्यक् आजीव म्हणजे समजाला अपाय होणार नाही अशा रीतीने आपली उपजीविका करणे. उदाहरणार्थ गृहस्थाने मद्यविक्रय, जनावरांची देवघेव, इत्यादी व्यवसाय करता कामा नये. यापासून समाजाला मोठा त्रास होतो हे उघड आहे. असे व्यवसाय वर्ज्य करून शुद्ध आणि सरळ व्यवहाराने आपली उपजीविका करणे, यालाच सम्यक् जीव म्हणतात.

जे वाईट विचार मनात आले नसतील त्यांना मनात येण्यास सवड न देणे, जे वाईट विचार मनात आले असतील त्यांचा नाश करणे, जे सुविचार मनात उद्भवले नसतील ते उत्पन्न करण्याचा प्रयत्न करणे, आणि जे सुविचार मनात उद्भवले असतील ते वाढवून पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करणे, या चार मानसिक प्रयत्नांना सम्यक् व्यायाम म्हणतात. (शारीरिक व्यायामाशी याचा संबंध नाही).

शरीर अपवित्र पदार्थाचेच बनले आहे हा विवेक जागृत ठेवणे, शरीरातील सुखदु:खादि वेदनाचे वारंवार अवलोकन करणे, स्वचित्ताचे अवलोकन करणे आणि इंद्रिये व त्याचे विषय यापासून कोणती बंधने उत्पन्न होतात आणि त्याचा नाश कसा करता येतो इत्यादि मनोधर्माचा नीट विचार करणे, याला सम्यक् पद्धती म्हणतात. आपल्या शरारीवर, मृतशरीरावर मैत्री करुणादिक मनोवृत्तीवर किंवा पृथ्वी, आप, तेज, इत्यादिक पदार्थावर चित्त एकाग्र करून चार ध्याने संपादन करणे याला सम्यक् समाधि म्हणतात. दोन अन्ताला न जाता या मध्यम मार्गाची भावना केली पाहिजे. पहिला अन्त म्हणजे कामोपभोगात सुख मानणे, त्याला हीन, ग्राम्य, सामान्यजनसेवित, अनर्य आणि अनर्थावह (हीनो गम्मो पोथुज्जनिको अनरियो अनत्यसंहितो) ही पाच विशेषणे जोडली आहेत. मनुष्यजाति दारिद्र्यात आणि अज्ञानात खितपत पडली असता आपण मौजमजेत आनंद मानणे याररखी हीन गोष्ट कोणती? हा अन्त ग्राम्य म्हणजे गावंढळ लोकांचा आहे. तो सामान्य लोकांचा आहे. आर्यांना (धीरवीरांना) शोभण्याजोगा नाही आणि तो अनर्थकारक आहे. दुसरा अन्त देहदंडन करणे हा. त्याला हीन आणि ग्राम्य ही विशेषे लावली नाहीत. पण तो दु:खकारक आहे. धीरवीरांना शोभण्यासारखा नाही आणि अनर्थावह आहे (दुक्खो अनरियो अनत्थसंहितो) अष्टांगिक मार्गाची सर्व अंगे हे दोन अन्त वर्ज्य करतात. उदाहरणार्थ खावे, प्यावे, मजा करावी ही चैनी लोकांची दृष्टि  आणि उपोषणादिक व्रतांनी देह झिजवावा ही तपस्व्याची दृष्टि यांच्या मधली दृष्टि म्हटली म्हणजे चार आर्यसत्यांचे ज्ञान. याप्रमाणे बाकीच्या अंगाची देखील मध्यवर्तिता जाणावी.*
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*ह्या सर्व पदार्थांवर ध्याने कशी संपादता येतात याचे विवरण ‘समाधिमार्गा’त केले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel