प्रकरण सहावे

श्रावकसंघ
पंचवर्गीय भिक्षूंची माहिती


ज्या पंचवर्गीय भिक्षूंना बुद्ध भगवंताने पहिला धर्मोपदेश केला त्यांची माहिती सुत्तपटिकात फारच थोडी सापडते. पहिल्या प्रथम जयाला बौद्धधर्माचा तत्त्वबोध झाला तो अज्ञात कौण्डिन्य चिरकालाने राजगृहाला आला व त्याने बुद्धाला साष्टांग प्राणिपात केला असा उल्लेख संयुक्तनिकायातील वंगीस संयुत्तात (नं. ९) सापडतो. दुसरा पंचवर्गीय भिक्षु अस्साजि (अश्वजित) राजगृह येथे आजारी होता व त्याला भगवंताने उपदेश केला अशी माहिती खन्धसंयुत्ताच्या ८८ व्या सुत्तात आली आहे. या दोघांशिवाय बाकी तिघांची नावे सुत्तपिटाकात मुळीच सापडत नाहीत. जातकाच्या निदानकथेत व इतर अट्ठकथांतून या पंचवर्गीय भिक्षूंची थोडीबहुत माहिती सापडते, तिचा सारांश असा –

रामो धजो लक्खणो चापि मन्ती
कोण्डञ्ञो च भोजो सुयामो सुदत्तो।
एते तदा अट्ठ अहेसं ब्राह्मणा
छळंगवा मन्तं व्याकरिंसु।।

‘राम, ध्वज, लक्खण (लक्ष्मण), मन्ती (मंत्री), कोण्डञ्ञ (कौण्डिन्य), भोज, सुयाम आणि सुदत्त हे आठ षडेग वेद जाणणारे ब्राह्मण होते, त्यांनी बोधिसत्त्वाचे भविष्य वर्तविले.’

यापैकी सातांनी बोधिसत्त्व गृहस्थाश्रमात राहिला, तर चक्रवर्ती होईल, आणि गृहस्थाश्रम सोडून संन्यासी झाला तर सम्यकसंबुद्ध होईल, असे द्विधा भाकित केले. या आठांत कौण्डिन्य अगदी तरुण होता. त्याने बोधिसत्त्व निस्संशय सम्यकसंबुद्ध होणार असे एकच भविष्य वर्तविले. द्विधा भविष्य वर्तविणार्‍या सात ब्राह्मणांनी घरी जाऊन आपल्या मुलांना सांगितले की, “आम्ही आता वृद्ध झालो आहोत, आणि सिद्धार्थ राजकुमार बुद्ध झाला, तर ते पाहण्याचे आमच्या नशिबी नाही. तो जर बुद्ध झाला तर तुम्ही त्याच्या संघात प्रवेश करा.”

बोधिसत्त्वाने गृहत्याग केला, तेव्हा एकटा कौण्डिन्य हयात होता. बाकी सात ब्राह्मणांच्या मुलांपाशी जाऊन तो म्हणाला, “सिद्धार्थकुमार परिव्राजक झाला आहे. तो खात्रीने बुद्ध होणार. त्याच्या मागोमाग आपणही परिव्राजक होऊ.”त्या तरुणांपैकी चौघांनी कौण्डिन्याचे वचन मान्य केले; व त्याच्या बरोबर प्रव्रज्या घेऊन ते बोधिसत्त्वाच्या मागोमाग गेले. हे पाच जण पुढे पंचवर्गीय या नावाने प्रसिद्धीस आले. त्यांची नावे महावग्गात आणि ललितविस्तरात सापडतात, ती येणे प्रमाणे :-- कौण्डञ्ञ (कौण्डिन्य), वप्प (वाष्प), भद्दिय (भद्रिक), महानाम आणि अस्सजि (अश्वजित).

परंतु वर दिलेली पंचवर्गीयांची माहिती दंतकथात्मक दिसते. गोतमकुमार बुद्ध होणार अशी जर कौण्डिन्याची खात्री होती, तर त्याला उरुवेलेत सोडून कौण्डिन्य वाराणसीला कां गेला? बोधिसत्त्वाने शरीराला लागणारा आहार घेण्याला सुरुवात केल्याबरोबर कौण्डिन्याची पूर्ण श्रद्धा कशी नष्ट झाली? मला वाटते की, हे पंचवर्गीय भिक्षु पूर्वी आळार कालामाच्या पंथातील असून शाक्यांच्या किंवा त्याच्या आसपासच्या प्रदेशात राहत असत. तेथे त्यांची व बोधिसत्त्वाची मैत्री जमली. ते सर्वच ब्राह्मण होते, असेही म्हणता येत नाही. आळार कालामाच्या आणि उद्दक रामपुत्ताच्या संप्रदायात तथ्य न वाटल्यामुळे बोधिसत्त्व पुढील मार्ग शोधण्याच्या हेतूने राजगृहाला आला, तेव्हा त्याच्या बरोबर हे पंचवर्गीय भिक्षु देखील आले असावेत. बोधिसत्त्वाला नवीन धर्ममार्माचा बोध झाला तर त्याच मार्गाने आपण देखील जाऊ असा त्यांचा विचार होता. पण बोधिसत्त्वाने तपस्या आणि उपोषणे सोडून दिली तेव्हा त्यांचा विश्वास उडाला आणि ते वाराणसीला निघून गेले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel