संघाची संघटना

आपला संघ कार्यक्षम व्हावा, वास्तव बुद्ध भगवंताने फार काळजी घेतली. संघाची रचना त्याने अशी केली की, आपल्या पश्चात त्यात एकोपा राहावा आणि त्याच्याकडून लोकसेवा अव्याहत घडून यावी, वज्जींच्या गणराज्यातील पुढार्‍यांनी एकत्रित होऊन विचारविनिमय करण्याची आणि परस्परांच्या हिताचे नियम ठरविण्याची जी पद्धति, तीच थोडेबहुत फेरफार करून बुद्ध भगवंताने आपल्या भिक्षुसंघाला लागू केली असावी, असे महापरिनिव्वानसुत्ताच्या आरंभी आलेल्या मजकुरावरून दिसून येते.

वस्सकार ब्राह्मण बुद्धापाशी येतो आणि वज्जीवर स्वारी करण्याचा आपल्या धन्याचा– अजातशत्रूचा-- बेत भगवंताला कळवितो. आपण घालून दिलेल्या सात नियमांप्रमाणे जोपर्यंत वज्जी चालतील, तोपर्यंत त्यांना जिंकणे शक्य नाही, असे भगवान वस्साकार ब्राह्मणाला सांगतो. आणि वस्साकार निघून गेल्यावर भिक्षुसंघाला म्हणतो : ‘भिक्षूहो, मी तुम्हाला सात अभिवृद्धीचे नियम सांगतो (१) जोपर्यंत भिक्षु पुष्कळदा एके ठिकाणी जमतील, तोपर्यंत भिक्षूंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही. (२) जोपर्यंत भिक्षू एकमताने जमतील आणि आपल्या संघकर्माचा एकदिलाने विचार करून उठतील तोपर्यंत भिक्षूंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही. (३) जोपर्यंत संघाने न केलेला नियम केला होता, असे म्हणणार नाहीत आणि केलेला नियम मोडणार नाहीत, नियमाचे रहस्य जाणून त्याप्रमाणे वागतील, तोपर्यंत भिक्षूंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही. (४) जोपर्यंत भिक्षु बुद्ध, शीलवान पुढाऱयाचा मान ठेवतील, (५) जोपर्यंत भिक्षु पुन: पुन: उत्पन्न होणार्‍या तृष्णेला वश होणार नाहीत. (६) जोपर्यंत भिक्षु एकांतवासाची आवड धरतील. (७) तोपर्यंत भिक्षु, न आलेले सुज्ञ सब्रह्मचारी यावे आणि आलेले सुज्ञ सब्रह्मचारी सुखाने रहवे, यासाठी नेहमी जागृत राहतील, तोपर्यंत भिक्षुंची अभिवृद्धीच होईल, परिहानी होणार नाही.”

यावरून असे दिसून येईल की, संघाने एकत्रित जमण्याचे, एकमताने संघकृत्ये करण्याचे, बुद्ध शीलवान भिक्षूंना मान राखण्याचे वगैरे वन्यपिटकात सापडणारे नियम बुद्ध भगवंताने वज्जीसारख्या स्वतंत्र गणराज्यात प्रचलित असलेल्या पद्धतीवरून घेतले.

संघाचे काही नियम लोकरुढीवरून ठरविले

परंतु राज्यानुशासनचे सर्वच नियम संघाला लागू करता येणे शक्य नव्हते. संघात एखाद्या भिक्षूने काही अपराध केला तरी त्याला जास्तीत जास्त दंड म्हटला म्हणजे संघातून हाकून देणे हा होता; याच्या पलीकडे दुसरा कठोर दंड नव्हता. का की, संघाचे सर्व नियम अहिंसात्मक होते. यापैकी बरेचसे नियम केवळ चालू असलेल्या लोकरूढीवरून घेतले होते, उदाहरणार्थ, खालील नियम घ्या —

बुद्ध भगवान आळबी येथे अग्गाळव चेतियात राहत होता. त्या काळी आळवक भिक्षु बांधकाम करीत असता जमीन खोदीत. त्यांच्यावर लोक टीका करू लागले. ही गोष्ट समजली तेवहा भगवंताने त्याचा निषेध करून भिक्षूला नियम घालून दिला तो असा –
भिक्षूंनी लहानशी कुटी किंवा बेताचा विहार बांधून त्यात राहावे, एवढी परवानगी भगवंताने दिली होती, आणि त्या कामी जमीन स्वत: खोदणे किंवा दुसर्‍यास खोदावयास लावणे पाप आहे, असे नव्हते. तथापि हा नियम केवळ लोकांच्या समाधानार्थ करावा लागला. बहुतेक श्रमण लहानसहान जतूंचा नाश होऊ नये म्हणून खबरदारी घेत. ते रात्रीचा दिवा देखील पेटवीत नसत. का की, त्या दिव्यावर पतंग वगैरे प्राणी येऊन पडण्याचा संभव होता. आणि त्यांचे हे आचार लोकांच्या आंगवळणी पडले होते. एखादा श्रमण स्वत: कुदळ घेऊन जमीन खोदावयास लागला तर सामान्य जनांच्या मनाला धक्का बसणे अगदी साहजिक होते. त्यांच्याशी वादविवाद करून त्यांचा दृष्टिकोन बदलण्याची बुद्ध भगवंताला जरूर भासली नाही. तपश्चर्येत वृथा काल न घालविता भिक्षूंना जनतेला धर्मोपदेश करण्यास आणि ध्यानसमाधीच्यायोगे स्वचित्ताचे दमन करण्यास अवकाश मिळाला म्हणजे संघाचा कार्यभाग सुलभ होईल हो बुद्ध भगवान जाणून होता; आणि म्हणूनच ज्या रीतीभाती निरुपद्रवी होत्या त्या संघाला लागू करण्यास भगवंताला हरकत वाटली नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel