प्रकरण नववे

यज्ञयाग
पौराणिक बुद्ध

हिंदु लोक बुद्धाला विष्णुचा नववा अवतार मानतात. विष्णूने बुद्धावतार धारण करून असुरांना मोह पाडला व देवांकडून त्यांचा उच्छेद केला. अशी कथा विष्णुपुराणात आली आहे. तिचा सारांश भागवतातील खाली श्लोकात सापडतो—

तत: कलो संप्रयाते संमोहाय सुरद्विषाम्।
बुद्धो नामाडनसुत: कीकटेषु भविष्यति।।

‘त्यानंतर कलियुग आले असता, असुरांना मोह पाडण्यासाठी बुद्ध नावाचा अजनाचा पुत्र कीकट देशात उत्पन्न होईल.’
सामान्य हिंदु लोकांना बुद्धावताराची विशेष माहिती नाही. शास्त्रीपंडितांना आणि पुराण श्रवण करणार्‍या भाविक हिंदूंना बुद्धासंबंधी जी काही माहिती आहे. ती विष्णुपुराणावरून किंवा भागवतावरून मिळालेली.

विष्णुशास्त्री यांची कल्पना


पाश्चात्त्य देशात मॅक्सम्युलर याचे गुरू प्रसिद्ध फ्रेंच पंडित बर्नुफ यांचे लक्ष प्रथमत: बौद्ध धर्माकडे वेधले, परंतु भरपूर सामग्री न मिळाल्यामुळे त्यांना या धर्माची सांगोपांग माहिती पाश्चात्त्यांसमोर मांडता आली नाही. तथापि, बौद्ध धर्म केवळ त्याज्य असून विचारात घेण्याला योग्य नाही, अशी जी पाश्चात्त्य लोकांची समजूत होती. तिला बर्नुफच्या प्रयत्नाने बराच आळा बसला; आणि त्याचा परिणाम असा झाला की, डॉ. विल्सनसारखे ख्रिस्तभक्त देखील बौद्ध धर्माचा अभ्यास करू लागले, आणि त्यांच्या सहवासामुळे आमच्या इकडील कॉलेजातून शिक्षण घेऊन निघालेल्या तरुण मंडळींची बौद्ध धर्माविषयी कल्पना बदलत चालली.
विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या बाण कवीवरील निबंधात म्हणतात –

“आर्य लोकांचा मूळचा जो वैदिक धर्म त्यावर पहिला मतभेद बुद्ध याने काढला. त्याच्या मतास कालगत्या पुष्कळ लोक अनुसरून धर्मात दुफळी झाली व हे नवे लोक आपणास बौद्ध असे म्हणवू लागले. यांची नवी मते कोणती होती, याचा उदय, प्रसार व लय केव्हा झाला व कशामुळे झाला, वगैरे गोष्टी इतिहासाकारास मोठा मनोरंजक विषय होता, पण आता बोलून उपयोग काय? मागलीच दिलगिरीची गोष्ट पुन: एकवार येथे सांगितली पाहिजे की, इतिहासाच्या अभावास्तव या महालाभास आपण एकंदर जगासह अवतरलो. असो, बुद्धाविषयी जरी आपणास काही माहिती नाही, तरी एवढी गोष्ट स्पष्ट दिसते की, त्याची बुद्धि लोकोत्तर असावी. का की, त्याच्या प्रतिपक्षांनी म्हणजे ब्राह्मणांनीही त्यास ईश्वराच्या साक्षात नववा अवतार गणला! जयदेवाने ‘गीतगोविंदा’च्या आरंभी म्हटले आहे –

निंदसि यज्ञविधेरहह श्रुतिजातं।
सदयहृदयदर्शितपशुघातं।
केशव धृतवृद्धशरीर जय जगदीश हरे (ध्रुवपद)

...ख्रिस्ती शतकाच्या आरंभाच्या सुमारास बुद्धाचे व ब्राह्मणांचे मोठे वाद होऊन त्यात शंकराचार्यांनी बौद्धधर्माचे खंडन केले, व पुन्हा ब्राह्मण धर्माची स्थापन केली. याप्रमाणे बौद्धांचा मोड झाल्यावर ते आपल्या खुषीने म्हणा किंवा राजाज्ञेने देशत्याग करून कोणी तिबेटांत, कोणी चीनांत, तर कोणी संकेत असे जाऊन राहिले.” या उतार्‍यावरून त्या काळच्या इंग्लिश भाषाभिज्ञ हिंदूंची बौद्धधर्मविषयक कल्पना कशा प्रकारची होती याचे अनुमान करता येते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel