राजा—मी कात्यायन, तो भगवान सधया खोटे आहे?

का.—तो भगवान परिनिर्वाण पावला.

राजा—तो भगवान हयात असता तर आम्ही त्याच्या दर्शनासाठी शंभर योजनेदेखील प्रवास केला असता. पण आता परिनिर्वाण पावलेल्या देखील त्या भगवंताला आम्ही शरण जातो, त्याचप्रमाणे त्याच्या धर्माला आणि भिक्षुसंघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण गेलेला मी उपासक हे, असे समजा.

बुद्धाच्या हयातीत मथुरेत बौद्ध धर्माचा फारसा प्रसार झाला नव्हता. हे दुसर्‍या प्रकरणात दिलेल्या अंगुत्तरनिकायातील सुत्तावरून दिसून येईलच. (पृ. १९) अवंतिपुत्र राजा बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर गादीवर आला असावा का की, तो जर बुद्धाच्या हयातीत गादीवर असता तर त्याला बुद्धासंबंधाने थोडाबहुत माहिती असतीच. वरील सुत्ताच्या शेवटल्या मजकुरावरून दिसून येईल की, बुद्ध परिनिर्वाण पावला हे देखील त्याला माहीत नव्हते. बुद्धाच्या हयातीत त्याचा बाप गादीवर होता व त्याला ब्राह्मणधर्माचे फार महत्त्व वाटत होते आणि त्यामुळे बुद्धाकडे त्याने दुर्लक्ष केले असावे. महाकात्यायन अवन्तीचा राहणारा, मूळचा ब्राह्मण आणि विद्वान असल्याकारणाने या तरुण अवंतिपुत्र राजावर त्याचा प्रभाव पडला, असे समजणे योग्य आहे.

श्रमणांना जातिभेद मोडता आला नाही

वर दिलेल्या चार सुत्तापैकी पहिल्या वासिष्ठासुत्ता जातिभेद नैसर्गिक कसा नाही हे बुद्ध भगवंताने स्पष्ट करून दाखविले आहे दुसर्‍या अस्सलायनसुत्तात ब्रह्मदेवाच्या मुखापासून ब्राह्मण झाले ही कल्पना खोडून काढली आहे. आणि तिसर्‍या एसुकारिसुत्तात ब्राह्मणांना इतर वर्णाची कर्तव्याकर्तव्ये ठरविण्याचा अधिकार कसा पोचत नाही, हे सिद्ध केले आहे, चौथ्या माधुरसुत्तात महाकात्यायनाने आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या जातिभेदाची कल्पना कशी निरर्थक ठरते. हे स्पष्ट केले आहे. या सर्व सुत्तांचा नीट विचार केला असता असे दिसून येते की, बुद्धाला किंवा त्याच्या शिष्यांना जातिभेद मुळीच पसंत नव्हता आणि तो मोडून टाकण्यासाठी त्यांनी बरीच खटपट केली. परंतु हे कृत्य त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. ब्राह्मणांनी मध्यहिंदुस्थानातच नव्हे, तर गोदावरीच्या तीरापर्यंत जातिभेदाची लागवड करून ठेवली होती. आणि तो सर्वस्वी उपटून टाकणे कोणत्याही श्रमणसंघाला शक्य झाले नाही.

श्रमणांत जातिभेद नव्हता

तथापि ऋषिमुनीच्या परंपरेला अनुसरून श्रमणांनी आपल्या संघात जातिभेदाला थारा दिला नाही. कोणत्याही जातीच्या मनुष्याला श्रमण होऊन एखाद्या श्रमणसंघात दाखल होता येत असे. हरिकेशिवल चांडाळ असून निर्गन्थाच्या (जैनाच्या) संघात होता हे नवव्या प्रकरणात सांगितलेच आहे. (पृ. १४२ पाहा) बुद्धाच्या भिक्षुसंघात तर श्वपाक नावाचा चांडाळ आणि सुनीत नावाचा भंगी यांच्यासारखे अस्पृश्य वर्गात जन्मलेले मोठे साधू होऊन गेले आपल्या संघात जे मोठे गुण आहेत त्यापैकी जातिभेदाला थारा नाही हा एक होय, असे बुद्ध भगवंताचे म्हणणे आहे. भगवान म्हणतो, “भिक्षुहो, गंगा, यमुना, अचिग्वतो, सरभू, शरयू, मही या महानद्या महासमुद्राला मिळाल्या म्हणजे आपली नावे टाकून महालमुद्र हे एकच नाव पावतात. त्याप्रमाणे क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शुद्र हे चार वर्ण तथागताच्या संघात प्रवेश केल्यावर पूर्वीची नामगोत्रे टाकून ‘शाक्यपुत्रीय श्रमण’ या एकाच नामाभिधानाने ओळखले जातात.” (उदान ५१५  अंगुत्तरनिकाय, अट्ठकनियात).

अशोककाली बौद्धसंघात जातिभेद नव्हता

अशोकसमकालीन बौद्ध संघ जातिभेद मुळीच पाळीत नव्हता, असे दिव्यावदानातील यश अमात्याच्या गोष्टीवरून दिसून येते.
अशोक राजा नुकताच बौद्ध झाला होता व तो सर्व भिक्षूंच्या पाया पडे. ते पाहून यश नावाचा याचा अमात्य म्हणाला, “महाराज या शाक्य श्रमणात सर्व जातीचे लोक आहेत, त्यापुढे आपले अभिषिक्त डोके नमवणे योग्य नव्हे.”

अशोकाने काही उत्तर दिले नाही आणि काही काळाने बकरे, मेंढे वगैरे प्राण्यांची डोकी मागवून तो विकायास लावली. यशाला मनुष्याचे डोके आणावयास लावून ते विकावयास लावले. बकरे, मेंढे वगैरे प्राण्यांच्या डोक्यांची काही किंमत आली; पण

माणसाचे डोके कोणी घेईना. तेव्हा अशोकाने ते कोणाला तरी फुकट द्यावे असे फर्मावले. परंतु ते फुकट घेणारा मनुष्य यश अमत्याला आढळला नाही. ही गोष्ट त्याने अशोकाला निवेदिली. तेव्हा अशोक म्हणाला, “हे मनुष्याचे डोके फुकट दिले तरी लोक का घेत नाहीत.?”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel