श्रमणांनी केलेले मांसाहाराचे समर्थन

हे सुत्त फार प्राचीन आहे. पण ते खास काश्यप बुद्धाने उपदेशिलेले होते, असे समजण्याला बळकट आधार नाही. बुद्धसमकालीन भिक्षु  मांसाहाराचे समर्थन येणेप्रमाणे करीत, एवढेच समजावे.

या सुत्तात तपश्चर्या निर्थक गणली आहे हे मत जैन श्रमणांना पसंत पडले नसते. का की, ते वारंवार तपश्चर्या करीत असत. तथापि मांसाहाराचे त्यांनी अशाच प्रकारे समर्थन केले असते. कारण, ते पूर्वकालीन तपस्व्यांप्रमाणे जंगलातील फळामुळांवर निर्वाह करून न राहता लोकांनी दिलेल्या भिक्षेवर अवलंबून राहत; आणि त्या काळी निर्मासमत्स्य भिक्षा मिळणे अशक्य होते. ब्राह्मण यज्ञांत हजारो प्राण्यांना वध करून त्यांचे मांस आजूबाजूच्या लोकांना वाटीत. खेड्यातील लोक देवतांना प्राण्यांचे बलिदान करून त्यांचे मांस खात. याशिवाय खाटीक लोक भर चौकात गाईला मारून तिचे मांस विकावयास बसत. अशा परिस्थितीत पक्व अन्नाच्या भिक्षेवर अवलंबून राहणार्‍या श्रमणांना मांसाशिवाय भिक्षा मिळणे कसे शक्य होते?

जैनांच्या समजुतीप्रमाणे पृथ्वीकाय, अप्काय, वायुकाय, अग्निकाय, वनस्पतिकाय आणि त्रसकाय असे सहा जीवभेद आहेत (पृ. १४२). पृथ्वीकाय म्हणजे पृथ्वीपरमाणु त्याचप्रमाणे जल, वायु आणि अग्नि यांचे परमाणु सजीव आहेत. वनस्पतिकाय म्हणजे वृक्षादिक वनस्पति. ते सजीव आहेत, हे सांगावयाला नकोच. त्रसकाय म्हणजे किडामुंगीपासून तहत हत्तीपर्यंत लहानमोठे सर्व प्राणी. या सहा कार्यापैकी कोणत्याही प्रश्नण्याची हिंसा करणे जैन श्रमण पाप समजतात. म्हणून ते रात्रीचा दिवा लावीत नसत, थंड पाणी पीत नसत आणि पृथ्वीपरमाणु आदिकांचा संहार होऊ नये, याबद्दल फार काळजी घेत.

परंतु जैन उपासक शेत नांगरीत, धान्य पेरीत आणि ते शिजवून अन्न तयार करीत. या कृत्यात पृथ्वी, अप्, तेज, वायु, वनस्पति आणि त्रस या सहाही प्रकारच्या जीवांचा संहार होत असे. पृथ्वी नांगरीत असता पृथ्वीपरमाणुच नष्ट होतात असे नव्हे, तर किडे, मुंग्या इत्यादिक बारीकसारीक लाखो प्राणी मरतात. धान्य शिजवताना वनस्पतिकाय, अप्काय. अग्निकाय व वायुकाय या सर्व प्रश्नण्यांचा उच्छेद होतो. असे असता त्या अन्नाची भिक्षा जैन साधु घेतातच. तर मग एखाद्या जैन उपासकाने तयार केलेली मांसभिक्षा घेण्याला प्राचीन जैन श्रमणांना हरकत कोणती होती? आणि त्या कृत्याचे समर्थन त्यांनी आमगंधसुत्ताच्या धर्तीवरच केले नसते काय?

गोमांसाहाराविरुद्ध चळवळ

आता मांसाहाराविरुद्ध चळवळ कशी सुरू झाली याविषयी थोडक्यात विचार करू. सर्वात प्रथम गोमांसाहाराच्या निषेधाबद्दल बौद्धांनीच चळवळ सुरू केली असावी. नवव्या प्रकरणात (पृ. १४७-१४८) गायींची योग्यता दर्शविणार्‍या ब्राह्मण-धम्मिक-सुत्तांतील दोन गाथा दिल्या आहेत; त्याशिवाय ह्या गाथा पाहा.

न पादा न विसाणेन नास्सु हिंसन्ति केनचि।
गावो एळकसमाना सोरता कुम्भदूहना।
ता विसाणे गहेत्वान राजा सत्येन घातयि।।
ततो च देवा पितरो इन्दो असुररक्खसा।
अधम्मो इति पक्कन्दुं यं सत्थं निपती गवे।।


‘मेंढराप्रमाणे नम्र आणि घडाभर दूध देणार्‍या गाई पायाने, शिंगाने किंवा दुसर्‍या कोणत्याही अवयवाने कोणाचीही हिंसा करीत नाहीत. त्यांना (ब्राह्मणाच्या सांगण्यावरून) इक्ष्वाकु राजाने शिंगांना धरून ठार मारले. तेव्हा गाईंवर शस्त्रप्रहार झाल्यामुळे देव, पितर, इंद्र, असुर आणि राक्षस अधर्म झाला म्हणून आक्रोश करते झाले!’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel