सारथ्याकडून बंधुमा राजाला हे वर्तमान समजले, तेव्हा त्याने विपस्सीकुमाराची सुखसाधने आणखीही वाढविली, का की राज्य सोडून कुमाराने प्रव्रज्या न घ्यावी.

आणि भिक्षुहो, शेकडो हजारो वर्षानंतर विपस्सीकुमार तयारी करून उद्यानाकडे निघाला. वाटेत मोठय़ा लोकांचा समूह रंगीबेरंगी वस्त्रांची पालखी तयार करीत असलेला त्याने पाहिला आणि तो सारथ्याला म्हणाला, ‘‘हे लोक रंगीबेरंगी वस्त्रांची पालखी का तयार करतात?’’

सा॰- महाराज, हा येथे मेलेला मनुष्य आहे (त्यासाठी).
वि॰- तर मग त्या मृत मनुष्याकडे रथ ने.
त्याप्रमाणे सारथ्याने तिकडे रथ नेला आणि त्या मनुष्याला पाहून विपस्सी म्हणाला, ‘‘मित्रा सारथे, मृत म्हणजे काय?’’
सा॰- तो आता आईबाप व दुसरे नातेवाईक यांच्या दृष्टीस पडणार नाही, किंवा तो त्यांना पाहू शकणार नाही.
वि.— मित्रा सारथे, मी देखील मरणधर्मी आहे काय? राजा, राणी आणि दुसरे नातेवाईक यांच्या दृष्टीस मी पडणार नाही काय? आणि त्यांना मी पाहू शकणार नाही काय?
सा॰- नाही महाराज.
वि॰- तर मग आता उद्यानाकडे जाणे नको. अंत:पुराकडे रथ फिरव.
त्याप्रमाणे सारथ्याने अंत:पुराकडे रथ नेला॰ तेथे विपस्सीकुमार दु:खी आणि उद्विग्न होऊन विचारात पडला की, ज्याच्या योगे जरा, व्याधि, मरण प्राप्त होतात त्या जन्माला धिक्कार असो!
सारथ्याकडून बंधुमा राजाला हे वर्तमान समजले, तेव्हा त्याने कुमाराची सुखसाधने आणखीही वाढविली. इ.
आणि भिक्षुहो, शेकडो हजारो वर्षानंतर पुन्हा सर्व सिद्धता करून विपस्सीकुमार सारथ्याबरोबर उद्यानाकडे निघाला. वाटेत एका परिव्राजकाला पाहून तो सारथ्याला म्हणाला, ‘‘हा पुरुष कोण आहे? याचे डोके आणि वस्त्रे इतरांसारखी नाहीत.’’
सा॰- महाराज, हा प्रव्रजित आहे.
वि॰- प्रव्रजित म्हणजे काय?
सा॰- प्रव्रजित म्हणजे, धर्मचर्या चांगली, समचर्या चांगली, कुशल क्रिया चांगली, पुण्य क्रिया चांगली, अविहिंसा चांगली, भुतदया चांगली, असे समजणारा.
वि॰- तर मग त्याच्याकडे रथ ने.
त्याप्रमाणे सारथ्याने प्रव्रजिताकडे रथ नेला, तेव्हा विपस्सीकुमार त्याला म्हणाला, ‘तू कोण आहेस? तुढे डोके आणि वस्त्रे इतरांसारखी नाहीत.’’
प्र॰- महाराज, मी प्रव्रजित आहे. धर्माचर्या, समचर्या, कुशलक्रिया, पुण्यक्रिया, अविंहिंसा, भूतानुकंपा चांगली, असे मी समजतो.
‘ठीक आहे’, असे म्हणून विपस्सीकुमार सारथ्याला म्हणाला, ‘‘मित्रा सारथे, तू रथ अंत:पुराकडे परत जा. मी केस व दाढीमिशा काढून, काषाय वस्त्रे धारण करून अनागारिक (गृहवियुक्त) प्रव्रज्या घेतो.’’
सारथी रथ घेऊन अंत:पुराकडे गेला. पण विपस्सीकुमाराने तेथेच प्रव्रज्या घेतली.


आणि भिक्षुहो, विपस्सी बोधिसत्त्व एकांतात विचार करीत असता त्याच्या मनात विचार आला की, लोकांची अत्यंत वाईट स्थिति आहे. ते जन्माला येतात, म्हातारे होतात आणि मरतात; च्युत होतात आणि उत्पन्न होतात; तरी या दु:खापासून सुटका कशी करू घ्यावी हे जाणत नाहीत. ते हे कधी जाणतील?
आणि भिक्षुहो, जरामरण कशाने उत्नन्न होते याचा विपस्सी बोधिसत्त्व विचार करू लागला. तेव्हा त्याने प्रज्ञालाभाने जाणले की, जन्म आला म्हणजे जरामरण येते. आणि जन्म कशामुळे येतो? भवामुळे. भव कशामुळे? उपादानामुळे. उपादान तृष्णेमुळे, तृष्णा वेदनेमुळे, वेदना स्पर्शामुळे, स्पर्श षडायतनामुळे, षडायतन नामरूपामुळे, नामरूप विज्ञानामुळे उत्पन्न होते. ही कारणपरंपरा विपस्सी बोधिसत्त्वाने अनुक्रमाने जाणली. त्याचप्रमाणे जन्म नसला तर जरामरण येत नाही. भव नसला तर जन्म होत नाही.. विज्ञान नसले तर नामरूप होत नाही, हे देखील त्याने जाणले. आणि तेणेकरून त्याच्या मनात धर्मचक्षु, धर्मज्ञान, प्रज्ञा, विद्या आणि आलोक उत्पन्न झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel