मोनेय्यसुत्त

हे ‘नालकसुत्त’ या नावाने सुत्तनिपातात आढळते. याच्या प्रास्ताविक गाथा २० आहेत. त्यांचे भाषां येथे देत नाही. जिज्ञासूंनी जून १९३७ चा विविधज्ञानविस्ताराचा अंक पाहावा. त्यात या सुत्ताचे प्रास्तविक गाथांसह भाषांतर दिले आहे. नालक असित ऋषीचा भाचा. तो अल्पवयी होता तेव्हा गौतम बोधिसत्त्व जन्मला. असितऋषीने बोधिसत्त्वाचे भविष्य वर्तविले की, तो थोर मुनि होणार. आणि नालकाला गोतम बुद्धाच्या धर्माला अनुसरण्याचा त्याने उपदेश केला. नालक मामाच्या वचनावर श्रद्धा ठेवून गोतम बोधिसत्त्व बुद्ध होईपर्यत तापसी होऊन राहिला; आणि जेव्हा गोतमाला बुद्धप्रद प्राप्त झाले, तेव्हा त्याजपाशी येऊन त्याने मौनेयाबद्दल प्रश्न विचारले. त्या प्रश्नापासून या सुत्ताला सुरवात होते.

(तू श्रेष्ठ मुनि होणार) हे असिताचे वचन यथार्थ आहे असे मी जाणले. आणि म्हणून सर्व वस्तुजाताच्या पार गेलेल्या गोतमाला मी विचारतो. १

हे मुने, गृहत्याग करून भिक्षेवर उपजीविका करणार्याला उत्तम पद असे मौनेय कोणते हे विचारतो, ते मला सांग. २

मौनेय कोणते हे मी तुला सांगतो-असे भगवान म्हणाला--ते दुष्कर आणि दुरभिसंभव आहे. तथापि मी ते तुला सांगतो. संभाळून वाग व दृढ हो. ३

गावात कोणी निंदा केली किंवा स्तुति केली असता सर्वाविषयी समानभाव बाळगावा. मनातल्या मनात क्रोध आवरावा. शांत आणि निगर्वी व्हावे. ४

पेटलेल्या अरण्यातील अग्निज्वालांप्रमाणे गावात स्त्रिया फिरतात. या मुनीला भुलवितात. त्यांनी तुला मोहात पाडू नये याबद्दल सावध राहा. ५

लहानमोठे कामोपभोग सोडून स्त्रीसंगापासून विरत हो. स्थिरचर प्राण्यांचा विरोध आणि आसक्ति सोड. ६

जसा मी तसे हे, व जसे ते तसा मी, असे आपल्या उदाहरणाने जाणून कोणाला मारू नये व मारू नये. ७

ज्या इच्छेत आणि लोभात सामान्यजन बद्ध होतो, त्या इच्छेचा आणि लोभाचा राग करून चक्षुष्मन्ताने हा नरक तरून पार जावे. ८

पोटभर चापूत न खाणारा, मिताहारी, अल्पेच्छ व अलोलुप व्हावे. तोच इच्छा सोडून तृप्त झालेला अनिच्छ शांत होतो. ९

मुनीने भिक्षाटन करून वनात यावे व तेथे झाडाखाली आसनावर बसावे. १०

त्या ध्यानरत धीर पुरुषाने वनात आनंद मानावा. त्याने झाडाखाली बसून मनाला तोषवीत ध्यान करावे. ११

त्यानंतर रात्र संपल्यावर गावात यावे. तेथे मिळालेल्या आमंत्रणाने किंवा भेटीने उल्हसित होऊ नये. १२

मुनीने गावातील कुटुंबाशी सलगी करू नये. भिक्षेसंबंधी काही बोलू नये, सूचक व उच्चारू नयेत. १३

भिक्षा मिळाली तरी चांगले, न मिळाली तरी चांगले. दोन्हीविषयी तो समभाव होतो व (आपल्या राहण्याच्या) झाडापाशी येतो. १४

हातात भिक्षापात्र घेऊन फिरणार्‍याने त्याने मुका नसता मुक्यासारखे वागावे आणि मिळालेल्या अल्प भिक्षेचा तिरस्कार व दात्याचा अनादर करू नये. १५

श्रमणाने (बुद्धाने) हीन मार्ग कोणता व उत्तम मार्ग कोणता याचे स्पष्टीकरण केले आहे. संसाराच्या पार दोनदा जात नसतात, तरी पण ज्ञान एकाच प्रकारचे असते असे नाही. १६
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल