विक्षेपवाद

संजय बेलट्ठपुत्त विक्षेपवादी होता. तो म्हणे,'' परलोक आहे काय, असें मला विचारलें, आणि तसें मला वाटत असलें, तर मी परलोक आहे असें म्हणेन. परंतु तसें मला वाटत नाही. परलोक नाही, असें देखील वाटत नाही. औपपातिक प्राणी आहेत किंवा नाहीत, चांगल्या वाईट कर्माचें फळ असतें किंवा नसतें, तथागत मरणानंतर राहतो किंवा राहत नाही, यांपैकी कांही देखील मला वाटत नाही.''*
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*सामञ्ञाफलसुत्तांत निगण्ठ नाथपुत्ताचा चातुर्यामसंवरवाद विक्षेपवादापूर्वी घातला आहे. परंतु मज्झिमनिकायांतील चूळसारोपमसुत्तांत व इतर अनेक सुत्तांत नाथपुत्तांचें नांव शेवटी येतें.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चातुर्यामसंवरवाद

निगण्ठ नाथपुत्त चातुर्यामसंवरवादी होता. या चार यामांची जी माहिती सामञ्ञफलसुत्तांत सापडते ती अपुरी आहे. जैन ग्रंथांवरून असें दिसून येतें की, अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह हे चार याम पार्श्वमुनीने उपदेशिले. त्यांत ब्रह्वचर्याची महावीरस्वामीने भर घातली. तथापि बुध्दसमकालीन निर्ग्रंथांत ( जैन लोकांत) वरील चार यामांचीच महती होती. चार यामांच्या व तपश्श्चर्येच्या योगाने पूर्वजन्मीं केलेल्या पातकांचें निरसन करून कैवल्य ( मोक्ष) मिळवावें, हा जैनधर्माचा मथितार्थ होता.

अक्रियवाद व सांख्यमत

पूरण काश्यपाचा अक्रियवाद सांख्य तत्त्वज्ञानासारखा दिसतो. आत्मा प्रकृतीपासून भिन्न आहे, आणि मारणें, मारविणें इत्यादि कृत्यांचा परिणाम त्याच्यावर होत नसतो, असें सांख्य मानतात. याचाच प्रतिध्वनि भगवद्भतेंत निरनिराळया ठिकाणीं उमटला आहे. 

प्रकृते: क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वश:।
अहंकारविमूढात्मा कर्ता हमिति मन्यते॥

प्रकृतीच्या गुणांनी सर्व कर्मे केलीं जात असतां अहंकाराने मोहित झालेला आत्मा मी कर्ता आहें, असें मानतो.( अ. ३ श्लो. २७)

य एनं वेत्ती हन्तांर यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ती न हन्यते॥

हा (आत्मा) मारणारा आहे असें जो मानतो, किंवा हा मारला जातो असें जो समजतो, त्या दोघांनाही सत्य समजलें नाही. कारण, हा मारीत नाही, किंवा कोणाकडून मारला जात नाही.
( अ. २ श्लो .२१ )

यस्य नाहंकृतो भावो बुध्दिर्यस्य न लिप्यते ।
हत्वाऽपि स इमाँल्लोकान्ना हन्ति न निबध्यते॥

ज्याला अंहभाव नाही, ज्याची बुध्दि (त्यापासून) अलिप्त राहते, त्याने या लोंकाना मारलें, तरी तो त्यांना मारीत नाही; त्यांत बध्द होत नाही. ( अ १८, श्लो. १७)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel