अक्रियवाद व संसारशुध्दिवाद

या अक्रियवादापासून मक्खलि गोसालाचा संसारशुध्दिवाद फार दूर नव्हता. त्याचें म्हणणें असें दिसतें की, आत्मा जरी प्रकृती पासून अलिप्त आहे तरी त्याला ठराविक जन्म घ्यावे लागतात आणि त्यानंतर तो आपोआप मुक्त होतो. लक्ष चौ र्‍यांशी जन्म घेऊन प्राणि उन्नत दशेला जातो, ही कल्पना अद्यापिही हिंदु समाजांत आढळते. मक्खलि गोसालाच्या काळीं ती फार प्रचलित होती, असें दिसतें.

कांही काळाने पूरण काश्यपाचा संप्रदाय मक्खलि गोसालाच्या आजीवक पन्थांत सामील झाला असें अंगुत्तरनिकायांतील छ्क्क निपाताच्या एका ( नं ५७) सुत्तावरून असे दिसून येतें. त्यांत आनंद भगवन्ताला म्हणतो,'' भदंत, पूरण कस्सपाने कृष्ण, नील, लोहित, हरिद्र, शुक्ल आणि परमशुक्ल अशा सहा अभिजाति सांगितल्या आहेत. खाटीक, पारधी, वगैरे लोकांचा कृष्णाभिजातींत समावेश होतो, भिक्षु वगैरे कर्मवादी लोकांचा नील जातींत; एक वस्त्र वापरणार्‍या निर्ग्रंन्थांचा लोहिताभिजातींत, सफेत वस्त्र वापरणार्‍या अचेलेक श्रावकांचा (आजीवकांचा) हरिद्राभिजातींत, आजीवकांचा आणि आजीवक भिक्षुणींचा शुक्लाभिजातींत, आणि नन्द वच्छ, किस संकिच्च व मक्खलि गोसाल, यांचा परमशुक्लभिजातींत समावेश होतो.''
हयावरून पूरण कस्सपाचा संप्रदाय आणि आजीवकांचा संप्रदाय एकत्र झाले, असें स्पष्ट दिसतें. नंद, वच्छ वगैरे तीन आचार्य आजीवक परंपरेंतील पुढारी होते. कस्सपाच्या आणि त्यांच्या आत्मवादांत फरक नव्हता व कस्सपाला त्यांचा देहदंडनाचा मार्ग पसंत होता, हेही यावरून सिद्व होतें.

अजित केसकंबलाचा नास्तिकवाद

अजित केसकंबल पूर्ण नास्तिक होता, हें त्याचा उच्छेदवाद पाहिल्याबरोबर लक्षांत येतें. सर्वदर्शनसंग्रहांत सापडणार्‍या चार्वाक मताचा तो संस्थापक नसला तरी एक प्रसिध्द पुरस्कर्ता असावा. त्याला ब्राह्मणांचे यज्ञयाग जसे पसंत नव्हते, तशीच आजीवकादिक श्रमणांची तपश्चर्याही मान्य नव्हती. सर्वदर्शनसंग्रहांत म्हटलें आहे की, अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम् | बुध्दिपौरूषहीनानां जीविका धातृनिर्मिता || अग्निहोत्रं, तीन वेद, त्रिदण्ड धारण, आणि भस्म लावणें ही ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेली बुध्दिहीन आणि पौरूषहीन पुरूषांची उपजीविका आहे.' असें असलें तरी अजिताची गणना श्रमणांत होत असे. याचें कारण वैदिक हिंसा त्याला मुळीच पसंत नव्हती. आणि जरी तो तपश्चर्या करीत नसला, तरी श्रमणांचे आचारविचार पाळीत होता श्रमणांच्या आत्मवादापासून देखील तो अलिप्त नव्हता. त्याची आत्म्याची कल्पना म्हटली म्हणजे, चार महाभूतांपासून आत्मा उत्पन्न होतो, आणि मेल्यावर तो पुन्हा चार महाभूतांत जाऊन मिसळतो, अशी होती. तेव्हा -

यावज्जीवं सुखं जीवेन्नास्ति मृत्योरगोचर:।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:॥

'जिवंत असेपर्यंत सुखाने राहावें; कारण मृत्यूच्या तडाक्यांत न सापडणारा प्राणी नाही, आणि देहाची राख होऊन गेल्यावर तो परत कोठून येणार ?' असें त्याचें मत असणें साहजिक होतें.

ह्वा केसकंबलाच्या तत्वज्ञानांतूनच लोकायत अर्थशास्त्र निघालें, आणि त्याचा विकास कौटिल्यासारख्या आर्चायांनी केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel