अधिकार लोकांनी दिला पाहिजे

ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ आहे आणि इतर वर्ण हीन आहेत, असें म्हणून ब्राह्मण जातीचे पुढारी स्वस्थ बसत नसत. ते चारही वर्णांचीं कर्तव्याकर्तव्यें कोणतीं हें सांगण्याचा अधिकार आपणाकडे घेत, असें मज्झिमनिकायांतील (नं.९६) एसुकारिसुत्तावरून दिसून येतें. त्यांतील मजकुंराचा सारांश असा :-

एके समयी बुध्द भगवान् श्रावस्ती येथे जेतवनांत अनाथपिंडिकांच्या आरामांत रहात होता. त्या वेळीं एसुकारी नांवाचा ब्राह्मण त्याजपाशीं आला, आणि कुशलसमाचारादिक विचारून एका बाजूला बसला व म्हणाला, '' भो गोतम, ब्राह्मण चार परिचर्या (सेवा) सांगतात. ब्राम्हणांची परिचर्या चारही वर्णांना करतां येते, क्षत्रियांची परिचर्या क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या तीन वर्णांनी करावी, वैश्याची परिचर्या वैश्य आणि शूद्र यांनीच करावी, आणि शूद्राची परिचर्या शूद्रानेच करावी. इतर वर्णाचा मनुष्य त्याची परिचर्या कशी करील? या परिचर्यांसंबंधाने आपलें म्हणणें काय आहे?''

भ.- हे ब्राह्मणा, या ब्राह्मणांच्या म्हणण्याला सर्व लोकांची संमति आहे काय? अशा परिचर्या सांगण्याला लोकांना त्यांना अधिकार दिला आहे काय?

एसु .- भो गोतम, असें नाही.

भ.- तर मग, एखाद्या मांस खाऊं न इच्छिणार्‍या गरीब माणसावर त्याचे शेजारी मांसाचा वाटा लादतील आणि म्हणतील की, हें मांस तू खा आणि याचीं किंमत दे! त्याचप्रमाणें लोकांवर ब्राह्मण ह्या परिचर्या लादीत आहेत, असें म्हणावें लागतें. माझें म्हणणें असें की, कोणत्याही वर्णाचा मनुष्य असो. ज्याची परिचर्या केल्याने कल्याण होतें, अकल्याण होत नाही, त्याचीच परिचर्या करणें योग्य आहे. चारी वर्णांच्या समंजस माणसांना विचारले असतां ते देखील असेंच मत देतील.

उच्चकुलांत, उच्चवर्णांत किंवा श्रीमंत घराण्यांत जन्म घेणें चांगलें किंवा वाईट असें मी म्हणत नाही. उच्च कुलांत, उच्च वर्णांत किंवा श्रीमंत घराण्यांत जन्मलेला मनुष्य जर प्राणघातादिक पापें करूं लागला, तर त्याची कुलीनता चांगली नव्हे. पण तो प्राणघातादिक पापांपासून विरत झाला तर त्याची कुलीनता वाईट नव्हे. ज्या माणसाची परिचर्या केली असतां, श्रध्दा, शील, श्रुतत्याग आणि प्रज्ञा यांची अभिवृध्दि होते, त्याची परिचर्या करावी असें मी म्हणतों.

एसु.- भो गोतम ब्राह्मण हीं चार धनें प्रतिपादितात. भिक्षाचर्या म्हणजे ब्राह्मणांचे स्वकीय धन होय, बाणभाता हें क्षत्रियांचें, शेती आणि गोरक्षा हें वैश्याचें आणि कोयता व टोपली हे शूद्राचें. चारही वर्णांनी आपापल्या स्वकीय धनाची हेळसांड केली, तर ते चोरी करणार्‍या राखणदाराप्रमाणें अकृत्यकारी होतात. यासंबधी आपले म्हणणें काय आहे?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel