तेव्हा भगवान वस्सकार आमात्याला म्हणाला,''हे ब्राह्मणा, एके वेळीं मी वैशालीमध्ये राहत असतां हे सात अभ्युन्नातीचें नियम वज्जीनां उपदेशिले. जोंपर्यंत या नियमांना अनुसरून वज्जी वागतील, तोंपर्यंत त्याची उन्नतीच होईल, अवनति होणार नाही.''

वस्सकार म्हणाला,'' भो गोतम, यापैकी एका नियमाला जरी वज्जी अनुसरले तरी त्यांची उन्नति होईल, अवनति होणार नाही. तर मग त्यांनी सातही नियम पाळले, तर त्यांची उन्नति होईल हें सांगावयालाच नको.''

सात नियमांवरील टीका


ह्मा सात नियमांवरील बुध्दघोषाचार्यकृत अट्ठकथेचा गोषवारा-

(१) वारंवार एकत्रित होंतात. काल जमलों होतों, परवाही जमलों होतो, तेव्हा आज आणखी कशाला जमा, असें न म्हणता एकत्र जमतात. अशा रीतीने एकत्र न झाले तर चोहोंकडून आलेल्या बातम्या समजून घेतां येत नाहीत. अमुक गावाच्या किंवा शहराच्या सीमेबद्दल विवाद उपस्थित झाले आहेत, किंवा चोर बंड करीत आहेत, इत्यादिक वर्तमान ध्यांनात येत नाही. राज्यकर्ते बेसावध आहेत असें जाणून चोर देखील लूटफाट करतात. याप्रमाणे राज्यकर्त्यांची अवनति होते. वारंवार एकत्र जमल्याने सगळया बातम्या ताबडतोब समजतात, आणि फौज पाठवून बंदोबस्त ठेवतां येतो. राज्यकर्ते सावध आहेत असे जाणून चोर देखील टोळया करून राहत नाहीत; टोळया मोडून पळ काढतात. याप्रमाणे राज्यकर्त्यांची उन्नति होते.

(२) समग्र एकत्र होतात इत्यादि. आज काही काम आहे, किंवा मंगलकार्य आहे, असें म्हणून चुकारपणा न करंता एकत्र होण्यासाठी नगार्‍याचा शब्द कानीं पडतांच एकत्र होतात. एकत्र झाल्यावर विचारपूर्वक सर्व कामांचा निकाल लावल्यावाचून जाऊं लागले, तर त्यांना 'समग्र उठतात' असें म्हणतां येत नाही. तसें न करता सर्व कृत्यें आटपून एकत्र उठतात, समग्रपणें आपलीं कामें करतात, म्हणजे जर एखाद्या राजाला कांही काम पडलें, तर इतर सर्व राजे त्याच्या मदतीला जातात. किंवा दुसर्‍या राज्यांतील कोणी पाहुणा आला तर त्याच्या आदरसत्काराला सगळेच हजर असतात.

(३) न केलेला कायदा इत्यादिक. म्हणजे न ठरलेली जकात, कर वगैरे घेत नाहीत, पूर्वी ठरल्याप्रमाणे घेतात. केलेल्या कायद्याचा भंग करीत नाहीत, कायद्याला अनुसरून वागतात. म्हणजे चोर म्हणून कोणाला धरून आणलें तर त्याला चौकशी केल्यावाचून शिक्षा देत नाहीत. अशा रीतीने राज्यकर्ते वागले नाहीत, तर लोक उपद्रुत होतात. आणि सरहद्दीवर जाऊन स्वत: बंडखोर होतात किवा बंडखोराच्या टोळयात सामील होतात आणि राज्यावर हल्ला करतात. ह्याप्रमाणे राज्यकर्त्यांची अवनति होते. कायदेशीरपणे वागल्याने वेळेवर कर वसूल होतो, तिजोरी वाढते आणि त्यायोगे सैन्याचा व खासगी खर्च व्यवस्थित चालतो.

वज्जींचा कायदा म्हणजे, जर चोर म्हणून कोणाला पकडून आणले, तर वज्जी राजे त्याला एकदम शिक्षा न देता विनिश्चय महामात्यांच्या स्वाधीन करीत. ते अधिकारी तो चोर आहे किंवा नाही याची नीट चौकशी करून चोर नसला तर त्याला सोडून देत, आणि चोर असला तर आपण कांही एक मत न देतां व्यावहारिकांच्या स्वाधीन करीत. ते देखील तशीच चौकशी करून चोर नसला तर त्याला सो़डून देत, आणि चोर असला तर अंत:कारिक नांवाच्या अधिकार्‍यांच्या हवालीं करीत. ते देखील चौकशी करून चोर नसला तर सोडून देत, आणि चोर असला तर अष्टकुलिकांच्या स्वाधीन करीत. ते पूर्वीप्रमाणेंच चौकशी करून चोर ठरला तर सेनापतीच्या, सेनापति उपराजाच्या, आणि उपराजा राजाच्या स्वाधीन करी. राजा चोर नसला तर त्यांला सोडून देई, पण चोर ठरला तर प्रवेणीपुस्तक (कायदयाचें पुस्तक) वाचावयाला लावी. त्याला अनुसरून त्या चोराला राजा दण्ड करी. असा हा प्राचीन वज्जींचा कायदा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel