'' राहुल, आरशाचा उपयोग कोणता?''

'' प्रत्यवेक्षण (निरीक्षण) करण्यासाठी, भदन्त'' राहुलाने उत्तर दिलें.

''त्याचप्रमाणें, राहुल, पुन:पुन: प्रत्यवेक्षण (नीट विचार) करून कायेने, वाचेने आणि मनाने कर्में करावीं.

''जेव्हा तूं, राहुल, कायेने, वाचेने अथवा मनाने एखादें कर्म करूं इच्छिशील, तेव्हा प्रथमत: त्यांचें प्रत्यवेक्षण कर आणि तें जर आत्मपरहिताच्या आड येणारे व परिणामीं दु:खकारक असें दिसून आलें तर तें मुळीच अमलांत आणूं नकोस. पण तें आत्मपरहिताच्या आड येणारें नसून परिणामीं सुखकारक आहे असें दिसून आलें, तर तें आचर.

''कायेने, वाचेने अथवा मनाने कर्म आरंभिले असतांही त्याचें प्रत्यवेक्षण कर आणि ते आत्मपरहिताच्या आड येणारें असून परिणामीं दु:खकारक आहे असें दिसून आल्यास तेवढयावरच सोडून दे. पण ते आत्मपरहिताच्या आड येणारें नसून परिणामी सुखकारक आहे असें दिसून आल्यास, वारंवार करीत जा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* असत्य राखून इतर पापांचा त्याग केला, तर श्रमण खरा योध्दा नव्हे; त्याने श्रमणाला आपलें जीवित अर्पण केलें नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'' कायेने, वाचेने अथवा मनाने कर्म केल्यानंतर देखील तूं त्याचें प्रत्यवेक्षण कर आणि तें कायिक अथवा वाचसिक कर्म आत्मपरहिताच्या आड येणारें व परिणामी दु:खकारक होतें असें दिसून आल्यास शास्त्यापाशीं किंवा विद्वान सब्रह्मचार्‍यांपाशीं तूं त्या पापाचा आविष्कार कर (तें कबूल करावें), आणि पुन: आपणाकडून तसें कर्म घडू नये अशी काळजी बाळग. तें मन:कर्म असेल, तर त्यांबद्दल पश्चाताप कर, लाज धर, व पुन: तो विचार मनांत येऊ देऊं नकोस. पण कायेने, वाचेने अथवा मनाने केलेलें कर्म आत्मपरहिताच्या आड येणारें नसून परिणामीं सुखकारक होतें असें दिसून आल्यास मुदित मनाने तें कर्म पुन:पुन: करण्याला शीक.

''हे राहुल, अतीतकालीं ज्या श्रमणब्राह्मणांनी आपलीं कायिंक, वाचसिक आणि मानसिक कर्में परिशुध्द केलीं, त्यांनी तीं पुन:पुन: प्रत्यवेक्षण करूनच परिशुध्द केलीं भविष्यकालीं जे श्रमणब्राह्मण हीं कर्मे परिशुध्द करितील, ते पुन:पुन: प्रत्यवेक्षण करूनच हीं कर्में परिशुध्द करितील. सांप्रत जे श्रमणब्राह्मण हीं कर्मे परिशुध्द करतात, ते पुन:पुन: प्रत्यवेक्षण करूनच हीं कर्मे परिशुध्द करितील. म्हणूनचे हे राहुल, पुन:पुन: प्रत्यवेक्षण करून कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्मे परिशुध्द करण्यास शीक.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel