भगवान बुद्ध
(पूर्वार्ध)


प्रस्तावना

पालि वाङ्‌मयांत तिपिटक (त्रिपिटक) नांवाचा ग्रंथसमुदाय प्रमुख आहे.  त्याचे सुत्तपिटक, विनयपिटक आणी अभिधम्मपिटक असे तीन भेद होत.  सुत्तपिटकांत बुद्धाच्या आणि त्याच्या अग्रशिष्यांच्या उपदेशाचा प्रामुख्यानें संग्रह केला आहे.  विनयपिटकांत भिक्षूंनी कसे वागावें यासंबंधाने बुद्धाने केलेले नियम, व ते करण्याची कारणें, वेळोवेळीं त्यांत केलेले फेरफार आणि त्यांच्यावर केलेली टीका, यांचा संग्रह केला आहे.  अभिधम्मपिटकांत सात प्रकरणें आहेत.  त्यांत बुद्धाच्या उपदेशांत आलेल्या कित्येक मुद्यांचा ऊहापोह करण्यांत आला आहे.

दीघनिकाय, मज्झिमनिकाय, संयुक्तनिकाय, अंगुत्तरनिकाय आणि खुद्दकनिकाय असे सुत्तपिटकाचे मोठे पांच विगाग आहेत.  दीघनिकायांत मोठमोठाल्या चौतीस सुत्तांचा संग्रह करण्यांत आला आहे.  दीर्घ म्हणजे मोठीं (सुत्तें).  त्यांचा यांत संग्रह असल्यामुळे याला दीघनिकाय म्हणतात. 

मज्झिमनिकायांत मध्यम प्रमाणाचीं सुत्तें संगृहीत केलीं आहेत, म्हणून त्याला मज्झिम-(मध्यम)-निकाय हें नांव देण्यांत आलें.  संयुत्तनिकायांत गाथामिश्रित सुत्तें पहिल्या भागांत आलीं आहेत आणि नंतरच्या भागांत निरनिराळ्या विषयांवरील लहानमोठीं सुत्तें संगृहीत केलीं आहेत.  यामुळे याला संयुत्तनिकाय, म्हणजे मिश्रनिकाय, असें नांव देण्यांत आलें.  अंगुत्तर म्हणजे ज्यांत एका एका अंगाची वाढ होत गेली तो.  त्यांत एकक निपातापासून एकादसक निपातापर्यंत अकरा निपातांचा संग्रह आहे.  एकक निपात म्हणजे एकाच वस्तुसंबंधाने बुद्धाने उपदेशिलेलीं सुत्तें ज्यांत आहेत तो.  त्याचप्रमाणें दुक-तिक-निपात वगैरे जाणावे.

खुद्दकनिकाय म्हणजे लहान प्रकरणांचा संग्रह.  त्यांत पुढील पंधरा प्रकरणें येतात - खुद्दकपाठ, धम्मपद, उदान, इतिवुत्तक, सुत्त-निपात, विमानवत्थु, पेतवत्थु, थेरगाथा, थेरीगाथा, जातक, निद्देस, पटिसंभिदामग्ग, अपदान, बुद्धवंस व चरियापिटक.  हा सुत्तपिटकाचा विस्तार.  विनयपिटकाचे पाराजिका, पाचितित्तयादि, महावग्ग, चुल्लवग्ग व परिवारपाठ असे पांच विभाग आहेत.

तिसरें अभिधम्मपिटक.  यांची धम्मसंगणि, विभंग, धातुकथा, पुग्गलपञ्ञत्ति, कथावत्थु, यमक व पट्ठान अशीं सात प्रकरणें आहेत.

बुद्धघोषाच्या समकालीं म्हणजे इसवी सनाच्या सरासरी चौथ्या शतकांत या सर्व ग्रंथसमुदायांतील वाक्यांना किंवा उतार्‍यांना पालि म्हणत असत.  बुद्धघोषाच्या ग्रंथांत तिपिटकांतील वचनांचा निर्देश 'अयमेत्थ पालि (ही येथे पालि)' किंवा 'पालियं वुत्तं (पालींत म्हटलें आहे)' अशा शब्दांनीं केला आहे.  पाणिनि जसा 'छंदसि' या शब्दाने वेदांचा आणि 'भाषायाम्' या शब्दाने स्वसमकालीन संस्कृत भाषेचा उल्लेख करतो, तसाच बुद्धघोषाचार्य 'पालियं' या शब्दाने तिपिटकांतील वचनांचा आणि 'अट्ठकथायं' या वचनाने त्या काळीं सिंहली भाषेंत प्रचलित असलेल्या 'अट्ठकथां'तील वाक्यांचा उल्लेख करतो.

अट्ठकथा म्हणजे अर्थासहित कथा.  त्रिपिटकांतील वाक्यांचा अर्थ सांगावयाचा व जरूर असेल तेथे एखादी गोष्ट द्यावयाची असा परिपाठ सिंहलद्वीपांत होता.  कालांतराने ह्या अट्ठकथा लिहून ठेवण्यांत आल्या.  पण त्यांत बरेच पुनरुक्तिदोष होते; आणि पुन्हा त्या सिंहलद्वीपाबाहेरील लोकांना फारशा उपयोगी पडण्याजोग्या नव्हत्या.  यास्तव बुद्धघोषाचार्यानें त्यांपैकी प्रमुख अट्ठकथांचें संक्षिप्‍त रूपान्तर त्रिपिटकाच्या भाषेंत केलें.  तें इतकें चांगलें वठलें की, त्याचा मान त्रिपिटक ग्रंथाइतकाच होऊं लागला.  ('पालिं विय तमग्गहुं').  अर्थात् त्या अट्ठकथांना देखील पालिच म्हणूं लागले.  खरें म्हटलें तर 'पालि' हें भाषेचें नांवच नव्हे.  या भाषेचें मूळचें नांव मागधी असें आहे; आणि हें नवें नांव अशा रीतीने तिला मिळालें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel