अहिंसा टिकाव धरून राहिली

जुनी अहिंसात्मक अग्निहोत्रपद्धति मृतप्राय झाली खरी, तथापि ती अगदीच नाश पावली नाही. तिने राजदरबारांतलें आणि वरच्या दर्जांतील लोकांतलें आपलें वर्चस्व सोडून देऊन जंगलाचा आश्रय धरला. म्हणजे जे लोक अहिंसात्मक संस्कृतीला चिकटून राहिले, त्यांनी आपली तपश्चर्या जंगलांतील फळांमुळांवर निर्वाह चालवून कायम ठेवली. जातक-अट्ठकथेंत अशा लोकांच्या अनेक गोष्टी आल्या आहेत. नवीन स्थापन झालेल्या हिंसात्मक यज्ञपद्धतीला कंटाळून अनेक ब्राह्मण आणि इतर वर्णीय लोक देखील जंगलांत जात आणि आश्रम बांधून तपःसाधन करीत. वर्षांतून कांही दिवस हे लोक आंबट आणि खारट पदार्थ खाण्यासाठी लोकवस्तींत येत आणि पुन्हा आपल्या आश्रमांत परत जात. तात्पर्य, सप्‍तसिंधूंतील यतींप्रमाणें मध्यहिंदुस्थानांतील ॠषिमुनि नष्टप्राय न होतां जंगलाच्या आश्रयाने तपश्चर्या करीत कसे तरी बचाव धरून राहिले.

आधुनिक उदाहरण

याला आधुनिक इतिहासांतील एक उदाहरण देतां येण्याजोगें आहे. पश्चिम सिंहलद्वीप पोर्तुगीजांनी काबीज केलें, आणि तेथील बुद्धमंदिरें आणि भिक्षूंचे विहार जमीनदोस्त करून सर्वांना जबरदस्तीने रोमन कॅथॉलिक धर्माची दीक्षा दिली. या प्रसंगी सिंहलराजाने बुद्धाची दंतधातु बरोबर घेऊन क्यांडीच्या जंगलांत पळ काढला; आणि येथे डोंगराआड आपली नवीन राजधानी स्थापन केली. पश्चिम सिंहलद्वीपांतून पोर्तुगीजांच्या हातून बचावलेले भिक्षु शक्य तेवढे बौद्ध ग्रंथ बरोबर घेऊन डोंगराळ प्रदेशांत क्यांडीच्या राजाच्या आश्रयाला जाऊन राहिले. हाच प्रकार कांही अंशी गोव्यांत घडून आला. पोर्तुगीजांनी साष्टी, बार्देश आणि तिसवाडा हे तीन तालुके प्रथमतः जिंकले, आणि कांही वर्षांनी त्या तालुक्यांतील देवळें जमीनदोस्त करून लोकांना जबरदस्तीने रोमन कॅथॉलिक करण्याचा सपाटा चालविला. अशा वेळीं कांही हिंदूंनी आपल्या इस्टेटींवर पाणी सोडून आणि देवदेवतांना बरोबर घेऊन पळ काढला व जवळच्या संवदेकर संस्थानिकाच्या मुलखाचा आश्रय धरला. आजला पूर्वीचीं साष्टी प्रांतांतील हिंदूंची सर्व दैवतें या संवदेकर संस्थानांत आहेत. पुढे हा प्रान्त देखील पोर्तुगीजांनी जिंकला; पण पुन्हा हिंदूंच्या धर्मांत त्यांनी हात घातला नाही. तीच स्थिति कांही अंशी मध्यहिंदुस्थानांतील अहिंसात्मक संस्कृतीची झाली असें म्हणण्यास हरकत नाही.

अहिंसेचा प्रभाव

परीक्षित किंवा जनमेजय राजाने जोरजुलमाने बलिदानपूर्वक यज्ञयागांची प्रथा लोकांवर लादली नाही. पण त्या प्रथेला राजाश्रय मिळाल्याबरोबर ब्राह्मणांनी ती आपण होऊनच पत्करली आणि ज्यांना ती पसंत नव्हती, त्यांना जंगलाच्या व तपश्चर्येच्या आश्रयाने आपली जुनी परंपरा कायम ठेवणें भाग पडलें. पोर्तुगीजांनी ख्रिस्ती केलेल्या बौद्धांवर किंवा हिंदूंवर जसा आजलाही बौद्ध आणि हिंदू संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे, तसा मध्य हिंदुस्थानांतील प्राचीन अहिंसात्मक संस्कृतीचा देखील सामान्य जनतेवर थोडाबहुत प्रभाव टिकाव धरून राहिला. जंगलांत राहणारे ॠषिमुनि जेव्हा गावांत किंवा शहरांत येत, तेव्हा लोक त्यांची परमादराने पूजा करीत. बाकीच्या वेळीं यज्ञयाग आणि बलिदान हे पण प्रकार चालू असत.

यज्ञसंस्कृतीची वाढ

ॠषिमुनींचा मान बराच होता खरा, पण त्या संस्कृतीने कांहीच उन्नति केली नाही. सप्‍तसिंधूच्या प्रदेशांत तक्षशिलेसारखी जीं विश्वविद्यालयें स्थापन झालीं, तींच शिक्षणाची केन्द्रे होऊन बसली. जातक-अट्ठकथेंतील अनेक गोष्टींवरून दिसून येतें की, ब्राह्मणकुमार वेदाध्ययन करण्यासाठी आणि राजकुमार धनुर्विद्या शिकण्यासाठी तक्षशिलेसारख्या दूरच्या सप्‍तसिंधुप्रदेशांत जात असत.

सप्‍तसिंधूच्या प्रदेशांत काय किंवा मध्यहिंदुस्थानांत काय, इन्द्राच्यासारखें एक बलाढ्य साम्राज्य राहिलें नाही. परीक्षित किंवा जनमेजय यांच्या राज्याची इन्द्राच्या राज्याशीं तुलना करतां येत नाही. त्यांनी बलिदानपूर्वक यज्ञयागांना उत्तेजन दिलें, आणि त्यांच्या प्रयत्‍नामुळे गंगायमुनांच्या मधला प्रदेश आयावर्त झाला, एवढेंच काय तें. त्यांच्या कारकीर्दीनंतर सप्‍तसिंधु आणि मध्यहिंदुस्थान प्रदेशाचे लहानसहान भाग पडले असावे. तथापि आर्यांच्या आणि दासांच्या संघर्षापासून उत्पन्न झालेली बलिदानपूर्वक यज्ञयागांची संस्कृति मात्र दृढ होऊन बळावली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel