उपनिषदृषि

कांही ब्राह्मणांना अशा रीतीने उघडपणें श्रवणधर्म स्वीकारण्याचें धाडस नव्हतें.  ते वैदिक यज्ञयाग आणि श्रमणांचें तत्त्वज्ञान यांच्या दरम्यान हेलकावे खात असत; अश्वमेधावर वगैरे रूपकें रचून त्यांतूनच आत्मतत्त्व काढण्याचा प्रयत्‍न करीत.  उदाहरणार्थ, बृहदारण्यकोपनिषदाच्या पहिल्या अध्यायांतील दुसर्‍या ब्राह्मणाच्या आरंभीं आलेली कथा पाहा.  तेथे ॠषि म्हणतो, ''या जगांत उत्पत्तीच्या पूर्वी कांही एक नव्हतें.  मृत्यूने हे सर्व झाकलें होतें, तें कां तर खाण्याच्या इच्छेने.  कारण, खाण्याच्या इच्छेलाच मृत्यु म्हणतात.  त्याला आत्मवान् व्हावें असें वाटलें....मोठ्या यज्ञाने मी पुनरपि यजन करावें अशी तो मृत्यु कामना करता झाला.  अशी कामना करून तो श्रांत झाला; तप करूं लागला.  त्या श्रांत व तपाने तप्‍त झालेल्या मृत्यूपासून यश व वीर्य उत्पन्न झालें.  प्राण हें यश आणि हेंच वीर्य आहे.  याप्रमाणे ते प्राण शरीर सोडून निघून गेले असतां तें प्रजापतीचें शरीर फुगलें.  तथापि त्याचे मन त्या शरीरांत होतें.  माझें हें शरीर मेध्य (यज्ञिय) व्हावें व त्यायोगें मी आत्मवान् (आत्मन्वी) व्हावें, अशी तो कामना करता झाला.  ज्याअर्थी तें शरीर माझ्या वियोगाने यश आणि वीर्य यांनी विरहित होत चाललें, फुगलें, त्याअर्थी तो अश्व (फुगलेला) झाला.  आणि ज्याअर्थी तें मेध्य झालें त्याअर्थी तेंच अश्वमेधाचें अश्वमेधत्व आहे.  जो या अश्वाला याप्रमाणे जाणतो तोच अश्वमेधाला जाणतो.''

यांत अश्वमेधाच्या मिषाने तपश्चर्याप्रधान अहिंसाधर्म सांगण्याचा प्रयत्‍न दिसतो.  खाण्याची इच्छा हाच मृत्यु.  तो आत्मवान् झाला म्हणजे त्याला व्यक्तित्व आलें आणि क्रमशः त्याला यज्ञाची इच्छा उद्‍भवली.  त्या इच्छेपासून यश आणि वीर्य हे दाने गुण निघाले, ते खरे प्राण होते.  ते जर निघून गेले, तर शरीर मरून फुगल्यासारखे (अश्वयित) समजावें.  आणि तें जाळून टाकण्याला योग्य आहे.  हें तत्त्व जो जाणतो तोच अश्वमेध जाणतो.

छांदोग्य उपनिषदांत प्रवाहण जैवलि अरुणाच्या पुत्राला म्हणतो, ''हे गौतमा, द्युलोक हाच अग्नि आहे.  त्याची आदित्य हीच समिधा, किरण हा धूम, दिवस ही ज्वाला, चन्द्रमा हे निखारे, आणि नक्षत्रें किटाळें (विस्फुलिंग) आहेत.'' (छां. उ. ५।४)

यावरून असें दिसून येईल की, या ब्राह्मण ॠषींच्या मनावर श्रमण संस्कृतीचा पूर्ण पगडा बसला होता; पण व्यवहारांत तीं तत्त्वें उघड उघड प्रतिपादणें त्यांना इष्ट वाटत नव्हतें; आणि म्हणूनच अशा रूपकात्मक भाषेचा ते प्रयोग करीत.

उपनिषदृषि देखील जातिभेद मानीत नव्हते

पूर्वीचे ॠषिमुनि, श्रमण आणि उपनिषदृषि यांच्यामध्ये एका बाबतींत एकवाक्यता होती.  ही बाब म्हटली म्हणजे जातिभेदाची होय.  मातंग ॠषीची गोष्ट वर आलीच आहे.  तिजवरून ॠषिमुनींत जातिभेद नव्हता हें स्पष्ट होतें.  श्रमणसंघांत तर जातिभेदाला मुळीच थारा नव्हता आणि उपनिषदृषि देखील जातीला फारसें महत्त्व देत नसत हें खालील गोष्टीवरून दिसून येईल.

सत्यकाम आपली आई जबाला हिला म्हणाला, ''आई, मी ब्रह्मचर्याचें आचरण करूं इच्छितों.  (ब्रह्मज्ञान मिळवण्याची इच्छा करतों.)  माझें गोत्र कोणतें हें सांग.''  ती त्याला म्हणाली, ''बाळ, हें मला माहीत नाही.  तरुणपणीं मी पुष्कळांपाशीं राहिलें (बह्वहं चरन्ती) आणि तूं जन्मलास.  तेव्हा तुझें गोत्र मी जाणत नाही.  माझें नांव जबाला आणि तुझें नांव सत्यकाम आहे.  म्हणून तूं सत्यकाम जाबाल आहेस असें सांग.''

तो (सत्यकाम) हारिद्रुमत गौतमाला म्हणाला, ''आपणापाशीं ब्रह्मज्ञान शिकण्याच्या उद्देशाने मी आलों आहें.''

गौतम म्हणाला, ''तुझें गोत्र कोणेतें ?''

सत्यकाम म्हणाला, ''तें मला माहीत नाही.  आईला मी विचारलें.  पण ती मला म्हणाली की, तारुण्यांत पुष्कळ पुरुषांशीं संबंध आल्यामुळे आपणाला गोत्र माहीत नाही.  तेव्हा तूं सत्यकाम जाबाल आहेस असें सांग.''

त्याला गौतम म्हणाला, ''तूं सत्यापासून च्युत झाला नाहीस.  अब्राह्मणाला हें शक्य नव्हे.  म्हणून समिधा घेऊन ये.  तुझें उपनयन करतों.''  असें म्हणून या ॠषीने त्याचें उपनयन केलें.  (छां.उ. ४।४).
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel