गुप्तांच्या कारकीर्दीपासून जातिभेद बळावला

उपनिषदृषि जरी जातिभेद पाळीत असत, तरी जातीपेक्षा सत्याला ते विशेष मान देत हें सत्यकामाच्या गोष्टीवरून सिद्ध होतें.  परंतु त्याच उपनिषदांचा समन्वय करूं पाहणारे बादरायण व्यास आणि भाष्यकार शंकराचार्य जातिभेदाचें किती स्तोम माजवतात पाहा :-

श्रवणाध्ययनार्थप्रतिषेधात्स्मृतेश्च ।  अ. १।३।३८

इतश्च न शूद्रस्याधिकारः ।  यदस्य स्मृतेः श्रवणाध्ययनार्थप्रतिषेधो भवति ।  वेदश्रवणप्रतिषेधो वेदाध्ययनप्रतिषेधस्तदर्थानानुष्ठानयोश्चप्रतिषेधः शूद्रस्य स्मर्यते ।  श्रवणप्रतिषेधस्तावत् 'अथास्य वेदमुपशृण्वतस्त्रपुजतुभ्यां श्रोत्रप्रपूरणम्' इति ।  'पद्युह वा एतत् श्मशानं यच्छूद्रस्तस्माच्छूद्रेसमीपे नाध्येतव्यम्' इति च ।  अत एवाध्ययनप्रतिषेधः ।  यस्य हि समतीपेऽपि नाध्येतव्य भवति, स कथमश्रुतमधीयीत ।  भवति च वेदोच्चारणे जिह्वाच्छेदो धारणे शरीरभेद इति ।  अत एव चार्थादर्थज्ञानानुष्ठानयोः प्रतिषेधो भवति 'न शूद्राय मतिं दद्यात्' इति ।  (ब्रह्मसूत्रशांकरभाष्य अ. १।३।३८.)

''आणि म्हणूनच शूद्राला (ब्रह्मज्ञानाचा) अधिकार नाही.  कारण, स्मृतीने त्याला वेद ऐकण्याचा व अध्ययन करण्याचा प्रतिषेध केला आहे.  वेदश्रवणाचा प्रतिषेध, वेदाध्ययनाचा प्रतिषेध आणि त्याचें अर्थज्ञान व अनुष्ठान यांचा प्रतिषेध स्मृतीने शूद्राला केला आहे.  श्रवणप्रतिषेध असा, 'त्याने वेदवाक्य ऐकलें तर त्याचे कान लाखेने आणि शिशाने भरावे'.  'शूद्र म्हणजे पाय असलेलें स्मशान होय.  म्हणून शूद्राच्या जवळपास अध्ययन करूं नये.'  आणि म्हणूनच अध्ययनप्रतिषेध देखील होतो.  कारण ज्याच्या जवळपास देखील अध्ययन करतां कामा नये, तो स्वतः श्रुतीचें अध्ययन कसें करील ?  आणि त्याने वेदोच्चारण केलें असतां त्याचा जिव्हाच्छेद करावा, (वेदमंत्राचें) धारण केलें असतां ठार मारावें (शरीरभेद करावा), असें सांगितलें आहे.  यास्तव त्याने वेदाचें अर्थज्ञान आणि अनुष्ठान करूं नये, असें सिद्ध होतें.  'शूद्राला मति देऊं नये.' ''

शंकराचार्यांनी शूद्रांचा छळ करण्यासाठी घेतलेले आधार गौतमधर्मसूत्र इत्यादि गुप्‍त राजांच्या समकालीं झालेल्या ग्रंथांतील आहेत.  म्हणजे समुद्रगुप्तापासून (इ.स. च्या ४ थ्या शतकापासून) तहत शंकराचार्यांपर्यंत (इ.स. च्या ९ व्या शताकाच्या आरंभापर्यंत) आमच्या ब्राह्मण पूर्वजांचा शूद्रांना दाबून आपलें वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्‍न अव्याहत चालू होता असें दिसतें.  धर्मसूत्रकार आणि शंकराचार्य यांच्यामध्ये फरक एवढाच की, सूत्रकारांच्या वेळीं मुसलमान लोकांनी या प्रदेशांत प्रवेश केला नव्हता आणि शंकराचार्यांच्या वेळीं सिंध देश मुसलमानांच्या ताब्यांत गेला असून तेथे मुसलमानी धर्माचा एकसारखा प्रसार होत होता.  त्यांच्याकडून तरी आमच्या तरी आमच्या आचार्यांनी समानत्वाचा धडा शिकावयास पाहिजे होता.  तसें न करतां हे आचार्य आपलें जातिभेदाचें घोडें तसेंच दामटीत राहिले.  त्याचे परिणाम या हतभागी देशाला कसे भोगावे लागले, हें इतिहास सांगतच आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel