सुजातेने दिलेली भिक्षा

बोधिसत्त्वाला संबोधिज्ञान वैशाख पूर्णिमेच्या रात्रीं झालें. त्या दिवशीं दुपारीं सुजाता नांवाच्या कुलीन तरुण स्त्रीने त्याला उत्तम अन्नाची भिक्षा दिली.  याचा उल्लेख सुत्तपिटकांत क्वचित सापडतो*  आणि या प्रसंगाशिवाय सुजातेचें नांव आलेलें कोठे आढळत नाही.  तथापि बौद्ध चित्रकलेंत सुजातेला उत्तम स्थान मिळालें आहे; आणि बुद्धाच्या दृष्टीने देखील हा प्रसंग चिरस्मरणीय झाला.  चुंद लोहाराने दिलेली भिक्षा ग्रहण करून भगवान आजारी पडला.  त्यांत आपलें परिनिर्वाण होणार आहे असें त्याने ताडलें.  आणि आपल्या पश्चात चुंदाला लोकांनी दोष देऊं नये म्हणून भगवान आनंदाला म्हणाला, ''ज्या दिवशीं मला संबोधिज्ञान प्राप्‍त झालें, त्या दिवशीं मिळालेली व आज मिळालेली अशा दोन्ही भिक्षा समसमान आहेत, असें तुम्ही चुंदाला सांगा व त्याचें सांत्वन करा.''
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  अंगुत्तरनिकाय एककनिपात.  'बौद्धसंघाचा परिचय', पृ. २३६ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बोधिवृक्षाखाली आसन

सुजातेने दिलेली भिक्षा घेऊन बोधिसत्त्वाने नैरंजरा नदीच्या तीरीं भोजन केलें; आणि त्या रात्रीं तो एका पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसला.  हें झाड सध्या अस्तित्त्वांत नाही.  शशांक राजाने त्याचा विध्वंस केला, असें म्हणतात.  पण त्याच्याच जागीं लावलेला पिंपळ आणि त्यालाच टेकून बुद्धगयेचें प्रसिद्ध मंदिर आहे.  त्या झाडाखाली बोधिसत्त्व बसला, तेव्हा पुन्हा एकवार ललितविस्तरांत मारयुद्धाचा प्रसंग वर्णिला आहे.  संयुक्तनिकायांतील सगाथावग्गांत माराने बुद्धाला भुलविण्यासाठी बोधिवृक्षाखाली (त्या पिंपळाखाली) तृष्णा, अरति, आणि रगा या आपल्या तीन मुलींना पाठविलें असें वर्णन आढळतें.  जातकाच्या निदानकथेंत तर या प्रसंगीं मारसेनेने बुद्धावर चारी बाजूंनी कसा हल्ला चढविला, याचें सविस्तर वर्णन आहे.  माराचें सैन्य पाहून ब्रह्मादिक दे पळून जातात, बोधिसत्त्व तेवढा एकटा राहतो.  मग मार तें स्थान आपलें आहे, असें म्हणून बुद्धाला तेथून उठण्यास सांगतो; आणि त्या स्थानावर आपला हक्क शाबीत करण्यासाठी मारसेनेची साक्ष देतो.  सर्व देव पळून गेल्यामुळे त्या प्रसंगीं बुद्धाला कोणीच साक्षी सापडत नाही.  तेव्हा बुद्ध उजवा हात खाली करून, ही सर्वसहा वसुंधरा साक्ष आहे, असें म्हणतो; आणि पृथ्वी देवता, विराट्स्वरूप धारण करून मारसेनेचा पराभव करिते, इत्यादिक पुराणमय वर्णन जातकट्ठकथाकाराने केलें आहे.

बौद्ध चित्रकलेंत हा प्रसंग चित्रकारांनी छान रेखाटला आहे.  लोभ, द्वेष, मोह, मद, मत्सर इत्यादिक दुष्ट मनोवृत्तींना मूर्तिमंत स्वरूपें देण्याचा त्यांचा प्रयत्‍न वाखाणण्याला योग्य वाटतो.  प्रथमतः कवीने या प्रसंगाचें वर्णन केलें आणि तद्‍नुसार चित्रकारांनी त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्‍न केला, किंवा चित्रकारांनी हा प्रसंग रेखाटल्यावर त्यांच्या मागोमाग जाऊन कवींनी त्याचें वर्णन केलें, हें सांगतां येणें शक्य नाही.  तें कांही असो, पण एवढी गोष्ट खरी की, वर दिलेल्या मारसेनेला मूर्त स्वरूप देण्याचा हा प्रयत्‍न आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel