धर्मचक्रप्रवर्तन

असें मी ऐकलें आहे.  एके समयीं भगवान वाराणसी येथे ॠषिपत्तनांत मृगवनांत राहत होता.  तेथे भगवान् पंचवर्गीय भिक्षूंना उद्देशून म्हणाला, ''भिक्षु हो, धार्मिक मनुष्याने (पब्बजितेन) या दोन अन्तांना जाऊं नये.  ते दोन अन्त कोणते ?  पहिला कामोपभोगांत सुख मानणें.  हा अन्त हीन, ग्राम्य, सामान्यजनसेवित, अनार्य आणि अनर्थावह आहे.  दुसरा देहदंडन करणें.  हा अन्त दुःखकारक, अनार्य आणि अनर्थावह आहे.  या दोन अन्तांना न जातां तथागण्ताने ज्ञानचक्षु उत्पन्न करणारा, उपशमाला, प्रज्ञेला, संबोधाला आणि निर्वाणाला कारणीभूत होणारा मध्यम मार्ग शोधून काढला आहे.  तो कोणता ?  सम्यक् दृष्टि, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति, सम्यक् समाधि, हा तो आर्य अष्टांगिक मार्ग होय.

''भिक्षुहो, दुःख नांवाचें पहिलें आर्यसत्य असें आहे.  जन्म दुःखकारक आहे.  जरा दुःखकारक आहे.  व्याधि दुःखकारक आहे.  मरण दुःखकारक आहे.  अप्रियांचा समागम आणि प्रियांचा वियोग दुःखकारक आहे.  इच्छिलेली वस्तु मिळत नसली म्हणजे तेणेंकरूनही दुःख होतें.  संक्षेपाने पांच उपादानस्कन्ध दुःखकारक आहेत.*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  स्कन्ध पांच आहेत.  ते वासनामय असले म्हणजे त्यांना उपादानस्कन्ध म्हणतात.  'बुद्ध, धर्म आणि संघ', पृ. ९०-९१ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
''भिक्षुहो, पुनः पुनः उत्पन्न होणारी आणि अनेक विषयांत रमणारी तृष्णा-जिला कामतृष्णा, भवतृष्णा आणि विनाशतृष्णा म्हणतात- ती दुःखसमुदय नांवाचें दुसरें आर्यसत्य होय.

''त्या तृष्णेचा वैराग्याने पूर्ण निरोध करणें, त्याग करणें, तिच्यापासून मुक्ति मिळविणें, हें दुःखनिरोध नांवाचें तिसरें आर्यसत्य होय. 

''आणि (वर सांगितलेला) आर्य अष्टांगिक मार्ग हें दुःख-निरोधगामिनी प्रतिपदा नांवाचेयं चौथें आर्यसत्य होय.

''(क) हें दुःख आहे असें समजलें तेव्हा मला अभिनव दृष्टि उत्पन्न झाली, ज्ञान उत्पन्न झालें, विद्या उद्‍भवली, आणि आलोक उत्पन्न झाला.  हें दुःख जाणण्याला योग्य आहे असें समजलें, तेव्हा मला अभिनव दृष्टि (इत्यादि)..... हें दुःख मी जाणलें, तेव्हा मला (इत्यादि).......

''(ख)  हें दुःखमय आर्यसत्य आहे असें मी जाणलें, तें त्याज्य आहे असें मी जाणलें, त्याचा त्याग केला असें मी जाणलें, तेव्हा मला अभिनव दृष्टि उत्पन्न झाली (इत्यादि पूवोक्त)........

''(ग)  हें दुःखनिरोध आर्यसत्य आहे असें मी जाणलें, त्याचा साक्षात्कार करणें योग्य आहे असें मी जाणलें, त्याचा साक्षात्कार मला झाला असें मी जाणलें, तेव्हा मला अभिनव दृष्टि (इत्यादि पूवोक्त).........

''(घ)  हें दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा नांवाचें आर्यसत्य आहे असें मी जाणलें, त्याचा अभ्यास करणें योग्य आहे असें मी जाणलें, त्याचा अभ्यास कला असें मी जाणलें, तेव्हा मला अभिनव दृष्टि उत्पन्न झाली, ज्ञान उत्पन्न झालें, विद्या उद्‍भवली आणि आलोक उत्पन्न झाला.  जोंपर्यंत प्रत्येकीं तीन व एकंदरींत बारा प्रकारचें या चार आर्यसत्यांविषयीं ज्ञान मला झालें नाही, तोंपर्यंत मला पूर्णसंबोधि लाभली नाही.''

बुद्धाने केलेले अनेक उपदेश सुत्तपिटकांत संगृहीत केले आहेत.  पण त्याच्या धर्माचा आधारभूत असा कोणता उपदेश असेल, तर तो हा आहे.  एका सच्चसंयुत्तांत या चार आर्यसत्त्यांसंबंधाने एकंदर १३१ सुत्तें आहेत.  याशिवाय इतर निकायांत यांचा उल्लेख वारंवार येत असतो.  बुद्धाचे इतर सर्व उपदेश या चार आर्यसत्यांना अनुसरून असल्यामुळे यांचें महत्त्व फार मोठें आहे.

वरील रूपान्तरांत (क) पासून (घ) पर्यंत आलेला मजकूर फक्त सच्चसंयुत्ताच्या एका सुत्तांत व महावग्गांत सापडतो.  त्याचा उल्लेख इतर ठिकाणीं नाही.  यावरून तो मागाहून दाखल केला असावा, अशी बळकट शंका येते.  तथापि चार आर्यसत्त्यांच्या स्पष्टीकरणाला त्याची मदत होण्यासारखी असल्यामुळे तो येथे देण्यांत आला आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel