२७. चौथ्या संघाचा आचार्य पकुध कात्यायन हा होता. तो म्हणे कीं, “सात पदार्थ कोणीं केले किंवा करविले नाहींत. हे वंध्य, कूटस्थ व स्तंभाप्रमाणें अचल आहेत. ते हालत नाहींत; बदलत नाहींत; एकमेकांना त्रासदायक होत नाहींत; परस्परांना सुख-दुख देण्यास समर्थ नाहींत. पृथ्वी, आप, तेज, वायु, सुख, दु:ख व जीव, हे ते सात पदार्थ होत. त्यांच्यांत मारणारा मारविणारा, ऐकणारा, सांगणारा, जापणारा किंवा जाणविणारा असा कोणी नाहीं. जो तीक्ष्ण शस्त्रांनी दुसर्‍याचें डोकें कापतो, तो खून करीत नाहीं. त्यांचें तें शस्त्र सात पदार्थांच्या अवकाशांत शिरतें एवढेंच काय तें,” ह्या मताला त्र्प्रन्योन्यवाद म्हणत.
२८. जैन संघाचा पुढारी निगण्ठ नाथपुत्र हा होता. तो वर दिलेले चार याम१  प्रतिपादीत असे, व त्याच्या मताला चातुर्यामसंवरवाद म्हणत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ वि० २।२ व १० पहा.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२९. सहाव्या मोठ्या संघाचा आचार्य संजय बेलट्ठपुत्र हा होता. तो म्हणे, “परलोक आहे किंवा परलोक नाहीं असें मला वाटत नाहीं. परलोक आहे असेंहि नाहीं, परलोक नाही असेंहि नाहीं... चांगल्या व वाईट कर्मांचें फल आहे असेंहि मला वाटत नाहीं, नाहीं असेंहि मला वाटत नाहीं. तें असतेंहि असें नाहीं, किंवा नसतेंहि असें नाही. तथागत मरणोत्तर रहातो किंवा रहात नाही असें मला वाटत नाही. तो रहातोहि असें नाहीं व रहात नाहीं असेंहि नाही,” या संजय बेलट्ठपुत्राच्या वादाला वित्तेपवाद म्हणत.

३०. ह्या सहाहि संघांच्या पुढार्‍यांच्या मतांत सांख्यमताचा मागमूस दिसून येत नाहीं. पकुध कात्यायनाच्या मतांत जीव हा एक पदार्थ आहे. पण सांख्यमताप्रमाणे अनेक जीव आहेत, व ते प्रकृतीवर विरक्त झाले म्हणजे मुक्त होतात. “आत्मा मारणारा आहे असें तो मानतो, किंवा तो मारला जातो असें जो समजतो, त्या दोघांनाहि खरें ज्ञान नाहीं; हा मारीत नाहीं व मारलाहि जात नाही.” ह्या भगवद्‍गीतेंत ( अ० २/१९) प्रतिपादिलेल्या मताशीं मात्र पकुध कात्यायनाचें मत बरोबर जुळतें. पण त्याचा संबंध सांख्य मताशी नाहीं.

३१. कबंधी कात्यायन हाच पकुध कात्यायन आहे असें हेमचन्द्र रायचौधरी यांनी प्रतिपादिलें आहे.१   सुकेशा भारद्वाज, शैव्य सत्यकाम, सौर्यायणी गार्ग्य, कौशल्य आश्वलायन, भार्गव वैदर्भि आणि कबंधी कात्यायन, हे सहा तरुण ब्रह्मविद्या जाणण्याच्या हेतूनें पिप्पलाद ऋषीजवळ गेले. त्यांना ऋषि म्हणाला, “तुम्ही एक वर्षपर्यंत तपाचरणानें, ब्रह्मचर्यानें व श्रद्धेनें माझ्याजवळ रहा, आणि मग मला प्रश्न विचारा. मला माहीत असेल तें सर्व मी तुम्हाला सांगेन”. एका वर्षानंतर ह्या सहा जणांनी ऋषीला सहा प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची ऋषीनें उत्तरें दिली. ह्या प्रश्नोत्तरांना प्रश्नोपनिषद् म्हणतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ Political History of Ancient Indian, p.17.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३२. ह्यांत जो कबंधी कात्यायन आहे त्याच्याबरोबर असलेला आश्वलायन हाच मज्झिम निकायांतील अस्सलायन सुत्तांतील आश्वलायन होय, असें रायचौधरी यांचें म्हणणें. अस्सलायन जेव्हां बुद्धापाशीं गेला तेव्हां सोळा वर्षांचा होता (सोळसवस्सुद्येसिको जातिया). सोळा वर्षे त्याच्या मौंजीबन्धनापासून धरलीं, तरी तो चोवीस किंवा पंचवीस वर्षांचा असूं शकेल. पण पकुध कात्यायन बुद्धापेक्षां वयानें थोर, आणि एका मोठ्या संघाचा पुढारी. तेव्हां तो व अस्सलायन हे दोघेहि एकाच वेळीं पिप्पलाद ऋषीजवळ गेले हें म्हणणें बरोबर नाहीं. दुसरें असें कीं, कबंधी कात्यायनानें विचारलेल्या प्रश्नाचा व पिप्पलाद ऋषीनें त्याला दिलेल्या उत्तराचा पकुध कात्यायनाच्या मताशीं कांही एक संबंध नाहीं. तेव्हां पकुध कात्यायन व कबंधी कात्यायन हे एक नव्हत हें सांगणें नलगे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel