१०३. ह्या वरील पांच संप्रदायांच्या उपासकांचीं नांवें आल्यानंतर हस्तिव्रतिक इत्यादिकांचीं नांवें येतात. हत्तीचें व्रत पाळणारे ते हस्तिव्रतिक. ह्या हस्तिव्रतिकांतूनच सध्याचा गणपतिपूजेचा पंथ निघाला असला पाहिजे. अश्वांचे व्रत करणारे ते अश्वव्रतिक. घोड्याची पूजा ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळाच्या १६३ व्या सूक्तांत सांपडते. तेव्हां घोड्याचें व्रत पाळणारे वेदकालापासूनच अस्तित्वांत होते असें समजण्याला हरकत नाहीं. गोव्रतिक आणि कुक्कुरव्रतिक यांची माहिती मज्झिम निकायांतील कुक्कुरोवाद सुत्तांत आली आहे.

१०४. “एके समयीं भगवान् कोलिय १  देशांत हरिद्रवसन नांवाच्या शहरापाशीं रहात होता. त्या वेळीं गोव्रतिक पूर्ण कोलियपुत्र व सेनिय नांवाचा नग्न कुक्कुरव्रतिक भगवंतापाशीं आले. पूर्णानें भगवंताला सेनियाची पुढें गति काय होणार असा प्रश्न केला. त्याचें उत्तर देण्याचें भगवंतानें तीनदां नाकारलें. तरी पुन्हा पूर्णानें प्रश्न विचारला, तेव्हां भगवान् म्हणाला कीं, ‘असें व्रत संपन्न झालें तर मनुष्य कुत्र्यांच्या सायुज्यतेला जाईल. पण अशा व्रतानें आपण देव होईन असें त्याला वाटत असेल, तर तशा मिथ्यादृष्टीनें तो नरकांत जाईल.’ हें ऐकून सेनिय रडूं लागला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ कोलिय हे शाक्यांचे नातेवाईक असून त्यांचे शाक्यांच्या राज्याजवळच राज्य होतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१०५. “तेव्हां भगवान् म्हणाला, ‘हे पूर्णा, हा प्रश्न मला विचारूं नकोस असें मी तुला पूर्वींच सांगितलें नव्हतें काय?”  त्यानंतर सेनियानें पूर्णासंबंधानें प्रश्न विचारला. भगवंतानें त्या प्रश्नाचें उत्तर देण्याचें तीनदां नाकारलें. तरी चौथ्यांदा तोच प्रश्न विचारण्यांत आला, तेव्हां वरच्याप्रमाणेंच म्हणजे ‘गाईच्या व्रतानें मनुष्य एक तर गाईंच्या सायुज्यतेला जाईल, किंवा देव होईन अशी मिथ्थादृष्टि असली, तर तो नरकांत जाईल,’ असें भगवंतानें उत्तर दिलें, तें ऐकून पूर्ण रडूं लागला. त्यानंतर भगवंतानें त्या दोघांनाहि उपदेश केला. पूर्ण भगवंताचा उपासक बनला. सेनियानें प्रव्रज्या घेतली. त्याला चार महिनेपर्यंत परिवास देण्यांत आला, व त्यानंतर भिक्षुसंघांत दाखल करून घेण्यांत आलें. नंतर लवकरच तो अरहन्त झाला.”

१०६. यापुढें निद्देसाच्या वरील उतार्‍यांत कावळ्यांचें व्रत येतें. अद्यापि बलिदानाच्या रूपानें तें चालू आहे. कावळ्यानें जर बलि स्वीकारला नाहीं, तर पितरांना अन्न पोहोंचत नाहीं, अशी समजूत अद्यापिहि प्रचलित आहे यावरुन काकव्रतिक कशा त-हेने होते, याची कल्पना करतां येते.

१०७. वासुदेवव्रतिक हे कशा प्रकारचे होते, याची थोडीशी कल्पना महाराष्ट्रांतील पुणें वगैरे जिल्ह्यांत वासुदेव नांवाचे सकाळच्या प्रहरीं भिक्षा मागणारे जे लोक आहेत त्यांच्यावरून करतां येण्याजोगी आहे. हे लोक एक उंच, वर टोंक असलेली मोरांच्या पिसांची टोपी व लांब झगा घालतात. त्या टोपीवर व झग्यावर कवड्या लावलेल्या असतात. ते सकाळच्या प्रहरीं वासुदेवाचीं गाणीं गात भिक्षा मागतात. ह्या लोकांवरून प्राचीन काळचे वासुदेवव्रतिक कसे होते याची कल्पना करतां येणें शक्य आहे. बलदेवव्रतिक, पूर्णभद्रव्रतिक, व मणिभद्रव्रतिकहि अशाच तर्‍हेचे असावेत. मात्र त्यांचीं चिन्हें निरनिराळीं असलीं पाहिजेत. १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ वि० ३।११८ पहा.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel