रामानंदी व वारकरी पंथ

२७०. सर्व वैष्णव पुढार्‍यांत सामान्य जनतेविषयीं कळकळ बाळगणारा असा पहिला पुढारी म्हटला म्हणजे रामानंद होय. रामानंद १२९९ किंवा १३०० सालीं प्रयाग येथें जन्मला. तो एकशें अकरा वर्षें जगला होता असें म्हणतात. म्हणजे तो १४११ सालीं मरण पावला असें समजण्यांत येतें. रामानंदाचा विशेष हा कीं, त्यानें आपल्या शिष्यवर्गांत सर्व जातींचा समावेश केला. त्याच्या शिष्यशाखेंत सर्वांत पुढें आलेला सुप्रसिद्ध संत कबीर हा जातीनें मुसलमान कोष्टी होता. दुसरी रामानंदाची मोठी कामगिरी म्हटली म्हणजे त्यानें वासुदेव कृष्णाला आणि गोपींना बाजूला गुंडाळून ठेवून एकपत्‍नीव्रती रामाला पुढें आणलें.

२७१. रामानंदाच्या ह्या प्रयत्‍नांचा सुपरिणाम महाराष्ट्रापर्यंत पोंचला असावा. पंढरपूरचा विठोबा वासुदेव कृष्ण खरा, तरी पण त्याच्या मागें गोपींचें लफडें न रहातां तो नुसता रुक्मिणीचा पति बनला. ह्या महाराष्ट्रीय वैष्णव संप्रदायांतहि नामदेव-तुकारामासारखे संत पुढें आले;  आणि त्यांनीहि आपली सर्व ग्रंथरचना सामान्य जनतेच्या भाषेंत केली.

२७२. उत्तरेकडील रामानंदी संप्रदाय व दक्षिणेकडील वारकरी संप्रदाय अशा या दोन वैष्णव संप्रदायांच्या उपदेशाचा आणि बुद्धाच्या उपदेशाचा पुष्कळच मेळ दिसतो. बुद्धाचा उपदेश सामान्य जनतेसाठीं असल्यामुळें तो त्यानें चालू भाषेंत केला; तसाच या संप्रदायांतील साधुसंतांनीहि आपला उपदेश चालू भाषेंत केला. बुद्धाची जी प्राणिमात्राविषयींची कळकळ, तशीच ती या संतांचीहि दिसून येते. बुद्धानें जसे ब्राह्मणांच्या आढ्यतेवर हल्ले चढवले, तसेच ते यांनीहि चढवले. इतकेंच नव्हे, साधनांच्या बाबतींतहि बुद्धानें जसें सत्संगाला महत्त्व दिलें, तसें तें यांनीहि दिलें, उदाहरणादाखल साधूंच्या संगतीविषयीं बौद्ध वाङ्मयांत सांपडणारा थोडासा काव्यात्मक उपदेश येथें देतों.

२७३. “एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत रहात असतां संतांचें गुणगान करणार्‍या वर्गापैकीं (सतुल्लपकायिका ) कांहीं देवता त्याजपाशीं आल्या, व त्यांतील एका देवतेनें ही गाथा म्हटली –

सब्भिरेव समासेथ सब्भि कुब्बेथ संथवं |
सतं सद्धम्ममञ्ञाय सेय्यो होति न पापियो ||
(संतांबरोबरच रहावें आणि संतांचीच संगति धरावी. संतांचा सद्धर्म जाणून कल्याण होतें, नुकसान होत नाहीं.)

२७४. “दुसर्‍या देवतेनें हीच गाथा म्हटली; मात्र तिचा चौथा चरण असा – “पञ्ञं लभति नाञ्ञतो. त्याचा अर्थ असा - संतांचा सद्धर्म जाणून प्रज्ञा मिळते; ती दुसर्‍या मार्गानें मिळत नाहीं. तिसर्‍याहि देवतेनें हीच गाथा म्हटली; मात्र चौथा चरण असा - सोकमज्झे न सोचति. त्याचा अर्थ - संतांचा सद्धर्म जाणून शोक करणार्‍या दुनियेंत मनुष्य शौकाकुल होत नाहीं. चौथ्या देवतेंनें पण हीच गाथा म्हटली; मात्र तिचा चौथा चरण असा – ञातिमज्झे विरोचति. त्याचा अर्थ - संतांचा सद्धर्म जाणून मनुष्य आपल्या ज्ञातिवर्गांत प्रकाशतो. पांचव्या देवतेनेंहि हीच गाथा म्हटली; मात्र तिचा चौथा चरण असा - सत्ता गच्छन्ति सुगतिं. याचा अर्थ - संतांचा सद्धर्म जाणून प्राणी स्वर्गाला जातात. सहाव्या देवतेनें हीच गाथा म्हटली; पण तिचा चौथा चरण असा – सत्ता तिठ्ठन्ति साततं. त्याचा अर्थ - प्राणी चिरकाल सुखी होतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel