विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति

ग्रीक व रोमन लोक


१. पाश्चात्य संस्कृतीचा पाया ग्रीक लोकांनी घातला. इजिप्त आणि बाबिलोनिया येथील हजारो वर्षें चालत आलेल्या साम्राज्यशाह्या संपुष्टांत आल्यावर ग्रीक लोकांचा उदयकाळ सुरू झाला. त्यांत विशेष हा होता कीं, ग्रीक लोकांमध्यें सार्वभौम राजाची पूजा राहिली नाहीं. सामान्य जनतेला राजाच्या मदतीवांचून राज्य करतां येतें, हें इतिहासांत प्रथमत: ग्रीक लोकांनीच सिद्ध करून दाखविलें असें म्हणतां येईल. त्यांच्यामध्यें दास पुष्कळ होते; आणि ह्या दासांना आपल्या मालकांप्रीत्यर्थ काबाडकष्ट करावे लागत. हा जरी ग्रीक लोकांच्या संस्कृतींत मोठाच दोष होता, तरी मध्यमवर्गीय सामान्य माणसाला देखील आपले पुढारी निवडण्याचा हक्क त्यांनीच प्रथमत: शाबीत केला.

२. आमच्या इकडे वज्जी, मल्ल, इत्यादिकांचीं गणसत्ताक राज्यें बुद्धाच्या वेळीं अस्तित्वांत होतीं. तरी त्यांची बरोबरी ग्रीक प्रजासत्ताक राज्यांशीं करतां येत नाहीं. ह्या गणसत्ताक राज्यांत दास तर होतेच, पण त्याशिवाय मध्यमवर्गांतील लोकांनाहि राज्यशासनाचे हक्क मुळींच नव्हते. एका किंवा अनेक गांवचे सर्वाधिकारी जमीनदार-ज्यांना राजे म्हणत - एकत्र होऊन आपणांपैकीं एक महाराजा निवडीत, व त्याच्या अनुरोधानें आपलें राज्य चालवीत. विशेष प्रसंगीं महाराजाला सर्व राजांची अनुमति घ्यावी लागत असे. शाक्यांचें राज्यहि अशाच प्रकारचें होतें. परंतु त्यांना वज्जींप्रमाणें किंवा मल्लांप्रमाणें सर्वाधिकार नव्हते. कोसलराजानें शाक्यांचा पराजय करून हे अधिकार आपल्या हातांत घेतले होते. कोणाला फांशी द्यावयाचें किंवा हद्दपार करावयाचें असेल, तर त्यासाठीं कोसल-राजाची परवानगी घ्यावी लागत असें. बाकीच्या बाबतींत शाक्यांना होमरूलचे अधिकार होते.

३. ग्रीसमधील प्रजासत्ताक राज्यें याहून फारच भिन्न तर्‍हेचीं होतीं. एक शहर व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश यांतील मध्यमवर्गीय सर्व लोकांना आपले पुढारी निवडण्याचा पूर्ण अधिकार होता. याशिवाय दुसरा एका मोठा भेद हा कीं, आमच्या गणसत्ताक राज्यांच्या संघटनेचा इतिहास विस्तृतपणें ठेवण्यांत आला नाहीं. गणसत्ताक राजे होते, व वर सांगितल्याप्रमाणें त्यांची संघटना असावी, असें बौद्ध आणि जैन वाङ्मयांत सांपडणार्‍या त्यांच्या उल्लेखांवरून दिसून येतें. पण हे राजे कोणत्या वेळीं एकत्र होते, मतदान कशा रीतीनें करीत, महाराजाला कसें व किती वर्षांसाठीं निवडीत, यासंबंधी माहिती कोठेंच सांपडत नाही. पण ग्रीक लोकांचें वाङ्मय त्यांच्या प्रजासत्ताक राज्यांच्या वर्णनानें भरलें आहे. हीं राज्यें आपला कारभार कसा चालवीत, हें तर त्यांत आहेच; पण आणखी एक विशेष हा कीं, त्या काळच्या परिस्थितींत नुमनेदार प्रजासत्ताक राज्याची कशी स्थापना करावी, ही देखील कल्पना त्यांत सांपडते. यासंबंधीं प्लेटोचें रिपब्लिक प्रसिद्धच आहे; आणि ज्यांना पाश्चात्य संस्कृतीचें ज्ञान करून घ्यावयाचें असेल, त्यांना ह्या ग्रंथाचें वाचन अत्यावश्यक आहे.

४. ग्रीक लोकांनी केवळ प्रजासत्ताक राज्यें स्थापण्यांतच नव्हे, तर कलाकौशल्याच्या, तत्त्वज्ञानाच्या व शास्त्रीय शोधांच्या बाबतींतहि फार आघाडी मारली होती. पण कालान्तरानें ग्रीक लोकांचा अस्त व रोमन लोकांचा उदय होत गेला. रोमन लोक ग्रीक लोकांइतके बुद्धिमान् खात्रीनें नव्हते. ग्रीक लोकांना त्यांनी पकडून आणून आपले दास केलें. पण हे दासच त्यांचे गुरु बनले!  कलाकौशल्य, तत्त्वज्ञान इत्यादि जें काहीं रोमन लोक शिकले, तें ह्या दासांपासूनच. ह्या रोमन लोकांचे हाडवैरी म्हटले म्हणजे कार्थेजमधील लोक. भूमध्य समुद्राच्या स्वामित्वासाठीं त्यांच्यांत व ह्यांच्यांत पुष्कळ लढाया झाल्या; आणि अखेरीस त्यांत रोमचा विजय झाला. हळू हळू रोमन बादशाहीचा मोठा विस्तार होत गेला. तरी रोममध्यें प्रजास्ताक पद्धतीच अमलांत होती. आजला इंग्लंडांत किंवा फ्रान्सांत एक प्रकारची प्रजासत्ताक पद्धति सुरू असतां हिंदुस्थानांत आणि इंडोचायनांत जशी ह्या लोकांची सत्ता अरेरावीची आहे, त्याच प्रमाणें रोमन लोक रोममध्यें प्रजासत्ताक पद्धतीनें चालत असतां बाहेरच्या प्रदेशांवर अरेरावीच करीत असत.

५. परंतु ही अरेरावी त्यांना बाधल्याशिवाय राहिली नाहीं. तिचा परिणाम खुद्द रोममध्येंच साम्राज्यशाही स्थापण्यांत झाला. तरी पण रोमन प्रजासत्ताकपद्धतीच्या कारकीर्दींत विकास पावलेला रोमन कायदा बाकी राहिला. ह्या रोमन कायद्याची अद्यापि चहा होत आहे;  आणि त्यापासूनच पाश्चात्य राष्ट्रांतील बहुतेक आधुनिक कायद्यांचा विकास झाला आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel