६. जो प्रकार बाबिलोनियांत, तोच सिंधूच्या प्रदेशांत घडून आला. तेथें लहान लहान शहरें वसलीं होतीं; व त्यांच्यामध्यें भयंकर चुरस होती, असें अनुमान करतां येतें. हीं शहरें इंद्रानें तोडून एकसत्ताक राज्य स्थापन केलें; म्हणून त्याला पुरंदर (शहरें तोडणारा) ही संज्ञा मिळाली, व त्याची इतर देवांप्रमाणेंच पूजा होऊं लागली, हें पहिल्या भागांत दर्शविलेंच आहे. १  तेव्हां इंद्रानें जरी कितीहि क्रूरपणा केला असला, तरी त्याच्या साम्राज्यामुळें अहिंसेचा विकास जास्त झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. बाराहि महिनें निरनिराळ्या शहरांत चालू असलेल्या मारामार्‍या बंद पडल्या, व लोकांना सुखासमाधानानें आजूबाजूच्या प्रदेशांत संचार करतां येऊं लागला. अर्थात् अशी सार्वभौम राजांना देव मानून लोक पूजा करूं लागले, यांत नवल नाहीं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ वि० १।४७ व ५८ पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
७. सार्वभौम राज्य झालें तरी तें निर्भय असणें शक्य नाहीं. एकादा मांडलिक हळू हळू आपली सत्ता वाढवून आपणच सार्वभौम होऊं शकतो. सार्वभौम राजाच्या मर्यादेबाहेर जे मागसलेले लोक असतात, त्यांच्यांत ह्या सुधारलेल्या लोकांच्या अनुकरणानें एकोपा घडून येतो, व शस्त्राशस्त्रांची अभिवृद्धि होते. साम्राज्याच्या छत्राखालीं रहाणारे क्षत्रिय संपत्तिमान् होत जातात; व ऐषआरामुळें निरुपयोगी बनतात. अशा परिस्थितींत सरहद्दीवरील उद्योन्मुख जंगली टोळ्यांना साम्राज्याचा विध्वंस करणें अगदीं सोपें जातें; व नवीन साम्राज्य उपस्थित होतें. त्यामुळें सुधारणा होतेच असें नाहीं; कधीं कधीं पिछेहाटहि होत असते. परंतु बहुदा नवीन साम्राज्य स्थापणारे मागसलेले लोक सुधारलेल्या लोकांपासून बराच धडा शिकतात. हा प्रकार बाबिलोनियांत हजारों वर्षें घडून आला.

८. प्रथमत:  दक्षिण बाबिलोनियांत सुमेरियनांचीं राज्ये उदयाला आलीं. ऐषआरामामुळें त्यांची अवनति होत चालली असतां मागसलेल्या अक्केडियन किंवा सेमेटिक लोकांनी त्यांना जिंकून साम्राज्य स्थापन केलें. ह्या सेमेटिकांची भाषा मात्र निराळी राहिली. बाकी सर्व संस्कृति त्यांनी जशीच्या तशी सुमेरियनांपासून घेतली. तोच प्रकार केशी लोकांचा. हे लोक घोड्यावर बसण्यांत तेवढे पटाईत होते; पण बाकी सुधारणेंत बाबिलोनियनांपेक्षां फारच मागसलेले. त्यांनी बाबिलोनियांत साम्राज्य स्थापन केल्यावर कांहीं काळानें तेथली सुधारणाच नव्हे, तर भाषा देखील उचलली. हाच प्रकार रोमन लोकांचा. ग्रीस देश पादक्रांत करून ग्रीक लोकांना त्यांनी आपले दास केलें. पण हे दासच त्यांचे गुरु होऊन बसले!

९. आमच्या इकडे शकांचा असाचा प्रकार घडला. त्यांचा तेवढा महादेव राहिला. बाकी सर्व बाबतींत त्यांनी हिंदूंची संस्कृति घेतली. शकांशिवाय हूण, गुर्जर, मालव इत्यादि जंगली लोकांच्या टोळ्या या देशांत शिरून त्यांनी आपलीं राज्यें स्थापन केलीं. पण त्यांच्या थोड्याशा आचारांशिवाय बाकी सर्व आचार व देवताहि नष्ट होऊन गेल्या. त्यांनी हिंदी संस्कृति सर्वतोपरि आत्मसात् केली. हूणांचा आणि गुप्त राजांचा फार खटका उडाला. हूणांनी उत्तर हिंदुस्थानांत फार अत्याचार केले. पण जेव्हां या लढाया संपून ते येथें स्थायी झाले, तेव्हां हूण १  या आडनांवाशिवाय त्यांच्यांत दुसरें कांहीं परकीयत्व राहिलें नाहीं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ हूण हें आडनांव पंजाबांतील कांही लोक अद्यापि लावतात.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel