२८. “परंतु त्या बीजाला कोणत्याहि प्रकारें धक्का न लागल्यामुळें पावसाळ्यांत अंकुर फुटले, व त्या तरुण, मृदु आणि लुसलुशीत लतेनें त्या शालवृक्षाला आलिंगन दिलें. तेव्हां त्या शालवृक्षावर रहाणार्‍या देवतेला वाटलें कीं, ‘माझ्या आप्तमित्रांनी मला एवढें भयभीत करून कां सोडलें? मला तर ह्या तरुण लतेचा स्पर्श सुखकारक होतो!’ परंतु हळू हळू मालुवा लता वाढत गेली. तिनें त्या सर्व वृक्षाला वेढलें, व त्याच्या मोठमोठ्या फांद्यांत शिरून त्या खालीं पाडल्या. तेव्हां वृक्षदेवता आपल्याशींच म्हणाली, ‘अहाहा! हेंच तें भय जें माझ्या आप्तमित्रांना वाटत होतें! ज्याच्यामुळें आज मी अत्यंत दु:खकारक वेदना अनुभवीत आहें!”

२९. तृष्णेपासून उद्‍भवणार्‍या कार्यकारणपरंपरेचें पर्यवसान अत्यंत अपायकारक गोष्टींत कसें होतें, हें दीघनिकायांतील महनिदान सुत्तांत वर्णिलें आहे; तें असें ----

इति खो पनेतं आनन्द वेदनं पटिच्च तण्हा, तण्हं पटिच्च परियेसना,
परियेसनं पटिच्च लाभो, लाभं पटिच्च विनिच्छयो, विनिच्छयं
पटिच्च छन्दरागो, छन्दरागं पटिच्च अज्झोसानं, अज्झोसानं
पटिच्च परिग्गहो, परिग्गहं पटिच्च मच्छरियं, मच्छरियं
पटिच्च आरक्खो, आरक्खं पटिच्च आरक्खाधिकरणं दण्डा-दान-सत्थादान-कलह-विग्गह-विवाद-तुवंतुवं-पेसुञ्ञ-मुसावादा अनेके पापका अकुसला धम्मा संभवन्तीति ।।

(याप्रमाणें, हे आनन्द, वेदनेमुळें तृष्णा, तृष्णेमुळें पर्येषणा, पर्येषणेमुळें लाभ, लाभामुळें निश्चय, निश्चयामुळें आसक्ति, आसक्तीमुळें अध्यवसान, अध्यवसानामुळें परिग्रह, परिग्रहामुळें मात्सर्य, १  मात्सर्यामुळें आरक्षा, आरक्षेमुळें आरक्षा ठेवल्याकारणानें दण्डादान, शस्त्रादान, कलह, विग्रह, विवाद, तूंमी, पैशुन्य, असत्य भाषण इत्यादि अनेक पापकारक अकुशल गोष्टी उद्‍भवतात.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ मात्सर्य म्हणजे आपल्या संपत्तीचा किंवा ज्ञानाचा फायदा इतरांस मिळूं नये अशी बुद्धि.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३०. एकादी व्यक्ति जेव्हां विषयवासनांनी बद्ध होते तेव्हां त्या व्यक्तींत वर सांगितलेल्या तीन उतार्‍यांतील विकार स्पष्ट दिसून येतात. पुष्कळ मेहनत करून थोडाबहुत पैसा बँकेंत ठेवला, व जर ती बँक बुडाली, तर त्यामुळें मनुष्य खिन्न होतो, एवढेंच नव्हे, तर कधीं कधीं वेडा देखील होतो. या संपत्तीसाठीं क्षत्रिया-क्षत्रियांत, ब्राह्मणा-ब्राह्मणांत वगैरे मारामार्‍या कशा होतात हें कोणाला सांगवयाला नकोच. कुटुंबा-कुटुंबांत होणार्‍या भांडणांचें प्रदर्शन आजकालच्या कोर्टांत वारंवार होत असतें. तेव्हां वैयक्तिक तृष्णेमुळें किती घातपात होतात याच्यावर विशेष टीका करण्याचें कारण दिसत नाहीं. वरच्या उतार्‍यांत थोडाबहुत फेरफार करून तो मजकूर जशाच्या तसा आजकालच्या परिस्थितीलाहि लागू करतां येण्याजोगा आहे. परंतु ही तृष्णा किंवा विषयवासना जेव्हां सामाजिक स्वरूपांत परिणत होते, तेव्हां मात्र तिचें खरें स्वरूप जाणणें विद्वानांनाहि कठिण जातें; व ते देखील पर्यायानें सर्व घातक गोष्टींना कारणीभूत होतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel