सत्याग्रह

६६. सत्याग्रह म्हणजे अहिंसा आणि सत्य ह्या दोन यामांच्या पायावर उभें राहून दुष्ट कायद्यांचा प्रतिकार करावयाचा, व त्यासाठीं ज्या आपत्ति भोगाव्या लागतील त्या संतोषानें भोगावयाच्या. परंतु ह्या सत्याग्रहाच्या द्वारें आम्ही जें स्वराज्य मिळवणार आहोंत तें कशा प्रकारचें, हें बहुतेकांना माहीत नाहीं; आणि सत्याग्रहाचे अधिनायक महात्मा गांधीहि या संबांधानें विशदपणें खुलासा करीत नाहींत. त्यामुळें पुष्कळ लोक मोहांत पडले आहेत; व ते वेळोवेळीं महात्मा गांधीना खुलासा विचारतात. उदाहरणार्थ, गेल्या सालच्या (१९३४) जुलै महिन्यांत महात्मा गांधी संयुक्त प्रांतांत प्रवास करीत असतां तेथल्या जमीनदार लोकांनी त्यांना असा प्रश्न केला कीं, आपण जें स्वराज्य मिळवूं पहातां त्यांत आमचें काय होणार ?  त्यावर महात्माजींनी उत्तर दिलें कीं, ‘तुम्ही जनतेचे पालक अहांत असें समजून वागलांत, तर स्वराज्यांत तुम्हाला कोणाचें भय बाळगावयाला नको.’ त्याचप्रमाणें गांधीजी जेव्हां प्रसंगवशात् एकाद्या संस्थानिकाचे पाहुणे होतात, तेव्हां ‘संस्थानिकांनी रामराज्याचें उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून वागावें’ असा उपदेश करतात.

६७. महात्माजींच्या या उपदेशानें बड्या लोकांचें समाधान होत असेल. परंतु आमच्या सारख्या सामान्य माणसाला तो पटत नाहीं. इतिहासाच्या परिशीलनानें आमची समजूत अशी झाली आहे कीं, वर वर्णिलेल्या अपरिग्रहावांचून सत्य आणि अहिंसा कधींही टिकाव धरून रहाणार नाहीं. राजे किंवा जमीनदार यांचा आम्ही द्वेष करीत नाहीं. परिस्थितीनें त्यांना उत्पन्न केलें आहे. पण त्यांना आमचे पालक म्हणणें सर्वथैव अयोग्य आहे. त्यांच्या पूर्वजांनी केवळ हिंसात्मक बुद्धिबळानें संपत्ति कमावली; आणि हिंसेच्या बळावरच तिचें रक्षण होत आहे. अशा प्रकारें हिंसेंत मुरलेल्या सत्याचे आणि अहिंसेचे पालक बनवणें म्हणजे चोराच्या हातांतच तिजोरीच्या किल्ल्या देण्यासारखें हास्यास्पद होईल !

६८. ख्रिस्ताजवळ एक तरुण संपन्न गृहस्थ आला आणि म्हणाला, ‘सद्‍गुरुजी, मी चिरंजीव होण्यासाठीं कोणत्या चांगल्या गोष्टींचें आचरण करावें ?’ ख्रिस्त म्हणाला, ‘मला तूं सद्‍गुरु कां म्हणतोस ? परमेश्वर तेवढा सत् आहे. तथापि तुला जर जीवनांत प्रवेश करावयाचा असेल, तर परमेश्वराच्या आज्ञा पाळ.’ तेव्हां त्या तरुणानें विचारलें, ‘त्या कोणत्या ?’ ख्रिस्त म्हणाला, ‘हत्या करूं नकोस, परदारागमन करूं नकोस, चोरी करूं नकोस, व असत्य बोलूं नकोस. आईबापांचा मान ठेव आणि शेजार्‍यावर प्रेम कर.’ तेव्हां तो तरुण म्हणाला, ‘हे सर्व नियम मी लहानपणापासून पाळीत आहें. आतां माझ्यामध्यें उणीव ती कोणती ?’ ख्रिस्त म्हणाला, ‘तूं निर्दोष होऊं इच्छितोस, तर जा, आणि तुझी संपत्ति विकून जी किंमत येईल ती गरिबांना वांटून दे. त्यामुळें तुला दिव्य निधि मिळेल. आणि मजपाशीं येऊन माझा अनुयायी हो.’ तें ऐकून तो तरुण खजील होऊन तेथून चालता झाला. कां कीं, त्याचा परिग्रह फार मोठा होता. तेव्हां ख्रिस्त आपल्या अनुयायांना म्हणाला, ‘मी म्हणतों कीं, श्रीमंत माणसाला स्वर्गांत प्रवेश मिळणें कठिण आहे. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतों, उंट सुईच्या छद्रांतून जाऊं शकेल, पण श्रीमंत मनुष्य ईश्वरी राज्यांत प्रवेश करूं शकणार नाहीं.’ (Matthew 19, 16-24)

६९. महात्माजींनी अशाच प्रकारचा उपदेश आजकालच्या आमच्या राजे लोकांना आणि जमीनदारांना करणें योग्य आहे; आणि तो उपदेश करण्याला ते समर्थ आहेत. “बाबांनो तुमच्या पूर्वजांनी ही संपत्ति हिंसात्मक बुद्धिबळानें मिळविली, व आज तिचें रक्षण हिंसात्मक बळाच्याच आश्रयानें तुम्ही करीत अहां. हिंसात्मक बळ इंग्रजांच्या हातांत एकवटलें आहे; आणि त्यासाठीं इंग्रजांचा आश्रयकरणें तुम्हाला भाग पडत आहे. अशी संपत्ति बरोबर घेऊन अहिंसेच्या आणि सत्याच्या साम्राज्यांत तुम्ही कसे याल ? उंट सुईच्या छेदांतून जाईल, पण तुम्हाला अहिंसात्मक साम्राज्यांत प्रवेश करतां येणे नाहीं. तथापि आजच तुमची संपत्ति विकून टाकून ती गरिबांना वांटून दिली पाहिजे, असा आमचा आग्रह नाहीं. मात्र वेळ येईल तेव्हां अहिंसेचें आणि सत्याचें साम्राज्य स्थापण्यासाठीं सर्व संपत्तीचा त्याग करण्यास तुम्ही एका पायावर उभें असलें पाहिजें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel