२३. त्याकाळीं राजगृहांत भिक्षूंना आमंत्रणपरंपरा होती. तेव्हा एका ब्राह्मणाच्या मनांत असा विचार आला कीं, हे शाक्यपुत्रीय श्रमण मोठ्या चैनीनें राहतात; चांगले जेवण जेवून चांगल्या विहारांत राहतात; ह्यांच्या संघांत मला प्रव्रज्या मिळाली तर बरें. त्यानें भिक्षूंजवळ प्रव्रज्येची याचना केली, व भिक्षूंनी त्याला प्रव्रज्या दिली. तो भिक्षु झाल्यावर आमंत्रण-परंपरा संपली. भिक्षूंनीं त्याला आपल्याबरोबर भिक्षाचर्येसाठीं बोलाविलें. तेव्हां तो म्हणाला, “मी भिक्षाचर्येसाठीं भिक्षु झालों नाहीं. मला जर जेवायला द्याल तर राहीन, न द्याल तर चालता होईन.” “तूं केवळ पोटासाठीं भिक्षु झालास काय?” असें भिक्षूंनीं विचारल्यावर त्यानें होय असें उत्तर दिलें. ही गोष्ट भगवंताला समजली तेव्हां त्या ब्राह्मणाची निंदा करून तो म्हणाला, “हे मोघपुरुषा, अशा ह्या उत्तम धर्मविनयांत केवळ पोटासाठीं प्रव्रज्या घेतोस हें कसें?” नंतर भगवान् भिक्षूंना म्हणाला, “प्रव्रज्या दिल्यावर भिक्षूंचे चार आश्रय सांगावे. (१) भिक्षाचर्येसवर अवलंबून तुझी प्रव्रज्या, त्यासाठीं जन्मभर तूं उत्साह करावा. संघामंत्रणादिक आमंत्रणे मिळालीं तर तो विशेष लाभ आहे असें समज. (२) रस्त्यांतील चिंध्या गोळा करून केलेल्या चीवरावर तुझी प्रव्रज्या, त्यासाठीं जन्मभर उत्साह बाळग. कार्पासादिकांची चीवरें मिळालीं तर तो विशेष लाभ समज. (३) झाडाखालच्या शयनासनावर अवलंबून तुझी प्रव्रज्या. तेथें राहण्यासाठीं जन्मभर तूं उत्साह करावा. विहारादिक मिळाले तर तो विशेष लाभ समज. (४) गोमूत्राच्या औषधावर तुझी प्रव्रज्या त्याविषयीं जन्मभर तूं उत्साह बाळगावा. तूप, लोणी इत्यादी पदार्थ औषधासाठी मिळाले तर तो विशेष लाभ समज.”

२४.नंतर उपसंपदेसंबंधानें कांही नियम करण्यांत आले ते असे:- हे चार आश्रय प्रव्रज्येपूर्वी न सांगतां, प्रव्रज्या दिल्याबरोबर सांगण्यांत यावे. उपसंपदेच्या वेळीं कमींत कमी दहा भिक्षु हजर असेल पाहिजेत. उपाध्याय कमींत कमी दहा वर्षे संघांत भिक्षु होऊन राहिला असला पाहिजे व समर्थ असला पाहिजे.

२५. त्या काळीं दुसर्‍या पंथाचा एक परिव्राजक संघांत आला व आपल्या उपाध्यायाला वादांत हरवून पुन्हां पूर्वीच्या पंथांत गेला; व कांही कालाने परत येऊन उपसंपदा मागूं लागला. अशा प्रकारच्या माणसाला उपसंपदा देण्याची भगवंतानें मनाई केली; व भगवान् भिक्षूंना म्हणाला, “दुसरा कोणी इतर पंथांतून ह्या संघांत येण्याची इच्छा करीत असेल तर त्याला चार महिने परिवास द्यावा (उमेदवार म्हणून ठेवावें.)” तो परिवास असा:- प्रथम त्याचें क्षौर करावें व काषाया वस्त्रें नेसावयास द्यावीं. एका खांद्यावर उत्तरासंग करावयास लावून, भिक्षूंना नमस्कार करण्यास लावावा; व हात जोडून, उकिडव्यानें बसावयास लावून खालील वचनें त्रिवार उच्चारावयास सांगावीं:-

बुद्धं सरणं गच्छामि । धम्मं सरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि ।

नंतर त्यानें असें म्हणावें, ‘भदंत, मी अमुक नांवाचा दुसर्‍या पंथांतून आलेला ह्या संघांत उपसंपदेची इच्छा करीत आहें. त्या मला भदन्त संघाने चार महिने परिवास द्यावा.’ अशी त्रिवार याचना करावी. मग हुशार आणि समर्थ भिक्षूनें संघाला विज्ञाप्ति करावी, ‘भदंत संघाने माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावें, हा अमुक दुसर्‍या पंथांतून आलेला, ह्या संघात उपसंपदेची इच्छा करीत आहे. तो चार महिने परिवास मागत आहे. जर संघाला योग्य वाटत असेल तर संघाने त्याला चार महिने परिवास द्यावा.’ ही विज्ञाप्ति झाली. नंतर त्याला परिवास दिल्याबद्दल त्या भिक्षूंने त्रिवार जाहीर करावें, व कोणी हरकत घेतली नाहीं म्हणजे त्याला परिवास दिला असें समजावें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel