६५.त्या काळीं कोसल देशांत दोन भिक्षु प्रवास करीत होते. ते एका विहारांत आले. तेथें एक भिक्षु आजारी होता. भगवंतानें आजार्‍याचें उपस्थान करणें चांगले, असें म्हटलें आहे म्हणून त्या दोन भिक्षूंनीं त्या आजारीं भिक्षूचें उपस्थान केलें. पण तो बरा न होतां मरण पावला. तेव्हां त्याचें शरीरकृत्य करून व त्याचें पात्र व चीवरें घेऊन ते दोघे भिक्षु श्रावस्तीला आले; व भगवंताला त्यांनीं झालेलें वर्तमान सांगितलें. तेव्हां भगवान् भिक्षूंला म्हणाला, “मरण पावलेल्या भिक्षूच्या पात्राचा व चीवरांचा मालक संघ होय. तथापि आजार्‍याला उपस्थायक भिक्षु फार उपयोगी पडतात. म्हणून मृताचे जे उपस्थापक असतील त्यांना मृताच्या मालकीचीं तीन चीवरें व पात्र देण्यास मी संघाला अनुमती देतों. ती देण्याची पद्धती अशी:- आजार्‍याचा उपस्थायक भिक्षु असेल त्यानें संघाला म्हणावें, ‘भदंत संघ, अमुक नांवाचा भिक्षु मरण पावला. त्याचीं हीं तीन चीवरें व पात्र.’ तेव्हां समर्थ भिक्षूनें संघाला विज्ञाप्ति करावी, ‘भदंत संघ माझ्या बोलण्याकडे लंक्ष देवो. अमुक नांवाचा भिक्षु मरण पावला. त्याची हीं तीन चीवरें व पात्र. जर संघाला योग्य वाटत असेल तर संघ तीं त्याच्या उपस्थायकाला देवो.’ ही विज्ञाप्ति झाली. ह्याप्रमाणें त्रिवार जाहीर करून कोणीं हरकत घेतली नाहीं म्हणजे तीं पात्रचीवरें उपस्थायकांना देण्यांत आलीं असें समजावें. श्रामणेर मरण पावला तर ह्याचप्रमाणें त्याच्या उपस्थायकांना त्याचीं पात्रचीवरें देण्यांत यावीं.”

संघसामग्री

६६. बुद्ध भगवान् कौशांबी येथें रहात होता. तेथें एका पंडित भिक्षूच्या हातून एक दोष घडला; व त्यानें ती गोष्ट इतर भिक्षूंला सांगितली. तो दोष नव्हे असें त्यांचें मत पडलें. तेव्हां आपला कांहीं दोष नव्हता अशी त्या भिक्षूचीहि खात्री झाली. परंतु दुसर्‍या कांहीं भिक्षूंना तो दोष आहे व त्याबद्दल प्रायश्चित्त करणें योग्य आहे असें वाटलें, व त्यांनी बहुमतानें त्या भिक्षूला बहिष्कृत केलें. ह्याप्रमाणें संघांत दोन तट पडले व भांडणें सुरू झालीं. तेव्हां भगवान् त्या भिक्षूंना म्हणाला, “भिक्षुहो, अशा रितीनें भांडणे करूं नका.” त्यावर एक अन्यायवादी भिक्षु म्हणाला, “भदंत, आपण स्वस्थ रहा. आम्ही आमच्या भांडणाचा विचार करूं.”

भगवान् म्हणाला, “भिक्षुहो, वाराणसींत ब्रह्मदत्त नांवाचा राजा राज्य करीत होता, त्यानें दीघीति१ कोसल राजावर हल्ला करून त्याचा देश पादाक्रांत केला. तेव्हां दीघीत कोसल राजा आपल्या राणीला घेऊन गुप्तवेशानें पळाला, व वाराणसीला येऊन राहिला. तेथें त्याची राणी गरोदर झाली. तेव्हां तिला चतुरंगिनी सेना पहाण्याचे डोहाळे झाले. ब्रह्मदत्ताचा पुरोहित दीघीतीचा मित्र होता. त्यानें, एका शुभमुहूर्तावर चतुरंगिनी सेना सज्ज केली, तर वाराणशीराजाला फायदा होईल, असें सांगून सेना सज्ज करविली, व कोसल राजाच्या राणीला दाखविली. पुढें त्या राणीला दीर्घायु नांवाचा सुस्वरुप मुलगा झाला. तो वयांत येऊं लागल्यावर कोसल राजाला, आपण कोण आहोंत, हें ब्रह्मदत्ताला समजेल अशी भीति पडली व त्यानें दीर्घायु कुमाराला नगराबाहेर पाठवून दिलें. कोसल राजाच्या न्हाव्यानें ब्रह्मदत्ताची नोकरी पत्करली होती; व त्यानें आपला पूर्वीचा मालक राणीसह वाराणसींत गुप्तवेशानें रहात असल्याची बातमी नव्या मालकाला दिली. ब्रह्मदत्तानें दीघीतीला व त्याच्या राणीला पकडलें, व त्यांची धिंड काढून नगराच्या दक्षिणद्वाराबाहेर त्यांचा शिरच्छेद करावा असा हुकूम केला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- संस्कृत, दीर्घेति=दीर्घकाळ दु:ख भोगणारा
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“रस्त्यानें त्यांची धिंड चालली असतां दीर्घायु कुमार मगोमाग चालला होता. त्याला पाहून दीघीति म्हणाला, ‘बा दीर्घायु, तूं फार लांब किंवा फार जवळ पाहूं नकोस. वैरानें वैर शमत नाहीं. प्रेमानेंच वैर शमतें.’ लोकांना वाटलें कीं, दीघीति वेडा झाला असून कांहींतरी बरळत आहे. नंतर दक्षिणद्वारावर नेऊन त्याचा व त्याच्या राणीचा वध करण्यांत आला; व त्यांच्या शवांचे तुकडे करून चारी दिशांनां फेकण्यांत आले, व त्यांच्यावर पहारा ठेवण्यांत आला. तें पाहून दीर्घायु कुमारानें वाराणासींतून दारू नेऊन पहारेकर्‍यांना पाजली, व ते निश्चेष्टित झाल्यावर आईबापांचे शरीरावशेष गोळा करून त्यांना अग्नी दिला. आणि चित्ता पेटत असतां तिला त्यानें त्रिवार प्रदक्षिणा केली. त्याला ब्रह्मदत्त राजानें आपल्या प्रासादाच्या गच्चीवरून पाहिलें; व कौसल राजाचा हा मनुष्य कोणीतरी नातलग असला पाहिजे अशी त्याची खात्री झाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel