६८. त्या काळीं प्राचीन वंशदाव उपवनांत अनुरुद्ध, नन्दिय, व किम्बिल हे भिक्षु रहात असत. वनपाळानें भगवंताला तिकडे येतांना पाहिलें, व तो म्हणाला, “हे श्रमण, ह्या उपवनांत परमार्थ चिंतन करणारे तिघे भिक्षु रहात आहेत. तेथें जाऊन त्यांना तूं उपद्रव करूं नकोस.” हें वनपाळाचें भाषण ऐकून अनुरुद्ध त्वरेनें तेथें आला, व त्याला म्हणालां, “बा वनपाळा, भगवंताला प्रतिबंध करूं नकोस. हा आमचा शास्ता येथें आला आहे.” नंतर अनुरुद्धाने आपल्या इतर साथ्यांस घेऊन भगवंताचें स्वागत केलें. तेव्हां भगवान् अनुरुद्धाला म्हणाला, “अनुरुद्धा, तुमचें ठीक चाललें आहे ना? तुम्हांला भिक्षेचा त्रास पडत नाहींना?” आपलें सर्व ठीक चाललें आहे असें अनरुद्धानें उत्तर दिल्यावर ‘तुम्ही एकीनें, आनंदानें, पाण्याच्या आणि दुधाच्या मैत्रीप्रमाणें परस्परांवर प्रेम करून रहातां कीं काय?’ असा बुद्धानें प्रश्न केला. त्यालाहि अनुरुद्धानें “होय’ असें उत्तर दिलें; व ‘हें कसें’ असा बुद्धानें प्रश्न केला, तेव्हां अनुरुद्ध म्हणाला, “भदंत, मला असें वाटतें कीं, असे सब्रह्मचारी मला मिळाले आहेत हें माझें मोठें भाग्य होय. त्यांच्याबरोबर कायावाचामनेंकरून मी प्रेमानें वागतों; आणि असा विचार करतों कीं, स्वत:चे मन बाजूस ठेवून ह्यांच्याच मनाच्या अनुरोधानें मीं वागावें. आमचे देह जरी भिन्न आहेत तरी चित्त जणूं काय एकच आहे.” नन्दियानें व किम्बिलानेंहि आपला अनुभव अनुरुद्धाप्रमाणेंच सांगितला. तेव्हां बुद्ध म्हणाला, “अनुरुद्धा, तुम्ही मोठ्या जागृतीनें वागतां ना?” अनिरुद्ध म्हणाला, “होय, भदंत, जो आमच्यापैकीं भिक्षाटन करून प्रथम इकडे येतो तो आसनें मांडतो; पाय धुण्याचें पाणी व पाट तयार ठेवतो; जास्त अन्न काढून ठेवण्यासाठीं असलेलें ताट धुवून ठेवतो; पिण्याचें व आंचवण्याचें पाणी तयार ठेवतो. जो सर्वाच्या शेवटीं येतो तो इच्छा असल्यास शिल्लक असलेलें जेवण जेवतो; इच्छा नसल्यास तें गवत नसलेल्या जागीं किंवा पाण्याच्या प्रवाहांत टाकतो; आसनें काढतो; पाय धुण्याचें पाणी व पाट काढून जागच्या जागी ठेवतो; जास्त अन्न काढून ठेवण्यासाठीं असलेलें ताट धुवून जागच्याजागीं ठेवतो; पिण्याचें पाणी व आंचवण्याचें पाणी काढून ठेवतो, व जेवण्याची जागा साफ करतो. जो पिण्याच्या किंवा वापरण्याच्या पाण्याचा घडा किंवा पायखान्यांतील पाण्याचा घडा रिकामा पहातो तो तो भरून ठेवतो. जर एकाला तो घडा उचलणें शक्य नसेल, तर दुसर्‍याला खुणेनें बोलावून आणून तो आम्ही उचलून नेतों. पण त्यासाठीं हांका मारीत नसतो. पांच पांच दिवसांनीं आम्ही रात्रीं धर्मचर्चा करीत असतों. ह्याप्रमाणे आम्ही मोठ्या जागृतीनें व उत्साहानें वागतों.”

६९. भगवंतानें ह्या तिघां भिक्षूंला धर्मोपदेश करून उत्साहित केलें, आनंदित केलें व तो क्रमश: पारिलेय्यक वनांत आला. तेथें तो भद्गशालवृक्षाखालीं रहात असतां त्याच्या मनांत असा विचार आला कीं, कौशाम्बीच्या कलहविवाद करणार्‍या भिक्षूंच्या सहवासांत राहून मला बराच त्रास सोसावा लागला; पण आतां येथें एकाकी असल्यामुळें मी सुखानें रहातों. त्या वेळी कोणीएक हस्तिनाग आपल्या यूथाला कंटाळून एकटाच त्या अरण्यांत येऊन राहिला; व तेथें त्यानें आपल्या सोंडेनें बुद्धाचें स्वागत केलें. तेव्हां बुद्धानें हे उद्‍गार काढिले:-“नांगराच्या इसाडासारखे ज्याचे दांत आहेत अशा हस्तिनागाचें चित्त नागाच्या (पापरहित बुद्धाच्या) चित्ताशीं जुळतें. कांकीं, तोहि वनांत एकाकी रमतो!” १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- मूळ गाथा अशी आहे:- एवं नागस्त नागेन ईसादन्तस्स हत्थिनो। समेति चित्तं चित्तेन यदेको रमति वने ति।।
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
७०. यथाभिरुचि पारिलेय़्यक वनांत राहून, भगवान् श्रावस्तीला आला. तेथें तो जेतवनांत आनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. इकडे कौशाम्बी येथील उपासकांनीं असा विचार केली कीं, हे भांडण करणारे भिक्षु आमच्या नुकसानाला कारण झाले; ह्यांच्या भांडणामुळें भगवान् येथून निघून गेला; तेव्हां नमस्कारादिक करून त्यांचा आम्हीं आदर करतां कामा नये, व घरीं आल्यास ह्यांना भिक्षा देतां कामा नयें; असें केलें असतां हे येथून निघून जातील, गृहस्थ होऊन पोट भरतील किंवा माफी मागून भगवंताचें समाधान करतील. ह्यामुळें कौशाम्बी येथील भिक्षूंला आन्नाची मारामार पडली. तेव्हां ते ताळ्यावर आले, व भगवंताजवळ जाऊन आपला खटला मिटविण्याचा त्यांनीं विचार केला. भिक्षुणीसंघाची प्रमुख महाप्रजापती गौतमी हिला, हे भांडण करणारे भिक्षु श्रावस्तीला येत आहेत. हें वर्तमान समजलें; व आपण त्यांच्याशीं कसें वागावें असा भगवंताला तिनें प्रश्न केला. भगवान् म्हणाला, “तूं दोन्ही पक्षांच्या भिक्षूंकडून धर्म श्रवण कर. पण जे धर्मवादी असतील त्यांचेंच म्हणणें ऐक.” अनाथपिंडिक गृपति व विशाखा उपासिका ह्यांनीहि त्या भिक्षूंशीं कसें वागावें असा भगवंताला प्रश्न केला. तो म्हणाला, “तुम्हीं दोन्ही बाजूंच्या भिक्षूंला दान द्या. सर्वांकडूनच धर्मोपदेश ऐका. पण जे धर्मवादी असतील त्यांचेंच मत ग्रहण करा.”

ते भिक्षु अनाथपिंडिकाच्या आरामांत आले; तेव्हां सारिपुत्र भगवंताला ह्मणाला, “हे कौशाम्बी येथील भिक्षु येथें आले आहेत. त्यांच्याशीं आम्हीं कसें वर्तावें?” भगवान् ह्मणाला, “त्यांना रहाण्यास निराळी जागा तयार करून दे, व सर्वांना समानत्वानें खाण्यापिण्याला मिळेल अशी व्यवस्था कर.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel