८५. त्या काळीं आरामांत रहाणारे भिक्षु आगंतुक भिक्षूंशीं नीट रीतीनें वागत नसत. तेव्हां त्यांना भगवंतानें नियम घालून दिले ते असे:-

आगंतुक भिक्षु वडील असेल तर त्याला पाहिल्याबरोबर आवासिक भिक्षूनें आसन तयार करावें. पाय धुण्याचें पाणी व पाट ठेवावा. पुढें जाऊन त्याचें पात्र व चीवर घ्यावें. पिण्याचें पाणी पाहिजे असल्यास विचारावें. शक्य असल्यास (वर सांगितल्याप्रमाणें) त्याच्या वाहणा पुसाव्या; व पुसण्याचें फडकें धुवून घालावें. आगंतुक भिक्षूला नमस्कार करावा. रहाण्याची जागा दाखवावी. तेथें कोणी रहात होता कीं नाहीं तें सांगावें. भिक्षेला कोठें जावयाचें व कोठें जावयाचें नाहीं, व संघाला मदतद करणारी घरें कोणती हें सांगावें. शौचकूप, लघवीची जागा, वापरण्याची काठी वगैरे दाखवावी. येण्याजाण्याच्या वगैरे संघानें नियमित केलेल्या वेळा सांगाव्या. जर अगंतुक भिक्षु कमी वर्षांचा असेल तर आवासिकानें आसनावर बसूनच ‘अमूक ठिकाणीं पात्र ठेव, अमूक ठिकाणीं चीवर ठेव, ह्या आसनावर बस’ वगैरे सर्व सांगावें. आगंतुक भिक्षूनें त्याला नमस्कार करावा.

८६. त्या काळीं आरामांतून जाणारे भिक्षु (गमिक) नीट रीतीनें वागत नसत. त्यांना भगवंतानें नियम घालून दिले ते असे:-
गमिक भिक्षूनें आपल्या रहाण्याच्या जगां लांकडी आणि मतीचीं भांडी जागच्या जागीं व्यवस्थितपणें ठेवावीं; व दारें आणि खिडक्या बंद करून इतर भिक्षूंला सांगून जावें. जर कोणी भिक्षू नसेल तर श्रामणेराला सांगावें. श्रामणेरहि नसेल तर आरामाची काळजी घेण्यासाठीं ठेवलेल्या मनुष्यास सांगावें. कोणीच नसेल तर चार दगडांवर खाट ठेवून व त्यावर चौरंग वगैरे ठेवून लांकडाचीं व मातीचीं भांडी जागच्याजागीं ठेवावीं, व खिडक्या आणि दारें बंद करून निघून जावें. विहारांत पावसाचें पाणी गळत असल्यास, तें स्थान शक्य असल्यास शाकारावें. किंवा दुसर्‍याकडून शाकारून घेण्याचा प्रयत्न करावा. परंतु शाकारणें शक्य नसल्यास जेथें गळत नसेल तेथें खाट, चौरंग वगैरे ठेवावीं. पण जर सर्वच विहारांत गळत असेल, तर शक्य असल्यास खाट वगैरे गांवांत न्यावीं, किंवा इतरांकडून पोहोंचविण्याचा प्रयत्न करावा. तसें करणें शक्य नसल्यास मोकळ्या जागीं खाट वगैरे खालीं दगड ठेवून वर मांडावी. कां कीं, तेवढ्यानें निदान त्यांचे खूर वगैरे भाग शाबूत रहातील.

भिक्षुणी-प्रव्रज्या

८७. बुद्ध भगवान् कपिलवस्तु येथें निग्रोधारामांत रहात होता. तेथें महाप्रजापती गौतमी भगवंताजवळ येऊन म्हणाली, “भदंत, बायकांना आपल्या धर्म पंथांत प्रव्रज्या घेण्यास परवानगी द्या.” बुद्धानें ती गोष्ट तीनदां नाकारली, व तो तेथून वैशाली येथें आला. मागाहून महाप्रजापती गौतमी आपलें केशवपन करू व आणखी बर्‍याच शाक्य स्त्रियांना बरोबर घेऊन वैशालीला आली. प्रवासानें तिचे पाय सुजले होते व अंग धुळीनें माखलें होतें; ती उदासीन दिसत होती. अशा स्थितींत आनंदानें तिला पाहिलें, व उदासीनतेचें कारण विचारलें. स्त्रियांना प्रव्रज्या घेण्यांची भगवान् परवानगी देत नाहीं म्हणून मी उदासीन आहें, असें गौतमीनें सांगितलें. तेव्हां तितला तेथेंच रहाण्यास सांगून, स्त्रियांस प्रव्रज्या घेण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करण्यासाठीं आनंद भगवंताजवळ गेला, पण भगवंतानें ही गोष्ट नाकारली. तेव्हां आनंद म्हणाला, “भदंत, तथागतानें निवेदिलेल्या धर्मपंथांत प्रव्रज्या घेऊन एकाद्या स्त्रीला स्त्रोतआपत्तिफल, सकृदागामिफल अनागामिफल किंवा अर्हत्फल प्राप्त करून घेणें शक्य आहे कीं नाहीं?” भगवंतानें, “होय” असे उत्तर दिलें. आनंद म्हणाला, “असें जर आहे तर ज्या मावशीनें भगवंताला आईच्या अभावीं दूध पाजून लहानाचें मोठें केले तिच्या विनंतीवरून भगवंतानें स्त्रियांना प्रव्रज्या द्यावी.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel