९. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं उदायी श्रावस्तींत पुष्कळ लोकांच्या घरीं जात असे. अविवाहित स्त्री आणि पुरुष त्याला आढळले म्हणजे तो त्यांची लग्ने जुळवण्याची खटपट करी. पूर्वी जिचा नवरा गणक (कारकून) होता अशा एका बाईला एक फार सुंदर मुलगी होती. दुसर्‍या गांवांतून आजीवकांचे श्रावक श्रावस्तीला येऊन त्या गणकीपाशीं आपल्या (घराण्यांतील एका) मुलासाठीं ती मुलगी मागूं लागले. पण त्यांची ओळख नसल्यामुळें गणकीनें मुलगी देण्याचें नाकारलें. श्रावस्ती येथील कांहीं लोकांना ती गोष्ट समजली. तेव्हां ते त्या आजीवक श्रावकांना म्हणाले, “तुम्हीं पूर्वीच जाऊन त्या गणकीपाशीं मुलगी कां मागितलीत? आय उदायीला सांगितलें असतें, तर त्यानें ती मुलगी तुमच्या मुलाला केव्हांच दिवविली असती.” हें ऐकून त्या अजीवक श्रावकांनीं उदायीच्या मार्फत त्या गणकीशीं बोलणे सुरू केलें व त्या मुलीचें लग्न आपल्या मुलाशीं जुळवून आणलें. त्यांनीं त्या मुलीला महिनाभर चांगल्या रितीनें वागविलें, व पुढें दासीप्रमाणें वागवूं लागले. तिनें आपणाला घेऊन जाण्यासाठीं निरोप पाठविला. आईनें तेथें येऊन आपल्या मुलीला नीट रितीनें वागविण्याविषयीं त्यांना विनंति केली, तेव्हां ते म्हणाले, “तूं विचारणारी कोण? आमचा सगळा ठराव उदायीच्या मार्फत झाला आहे.” हें वर्तमान त्या गणकींने उदयीला सांगितलें. जेव्हां तो तिकडे येऊन मुलीला नीट वागण्याविषयीं त्यांना उपदेश करूं लागला, तेव्हां ते म्हणाले, “तूं विचारणारा कोण? आमचा सर्व कदारमदार गणकाशीं झाला आहे.” पुन्हा गणकीनें तिकडे जाण्यास उदायीला विनविलें; तेव्हां त्यानें जाण्याचें नाकबूल केलें. अर्थात ती उदायीची निंदा करूं लागली व शिव्याशाप देऊं लागली. दुसर्‍याहि स्त्रिया-ज्या उदायीनें जमवून आणलेल्या लग्नसंबंधामुळें दु:ख भोगीत होत्या त्या-उदायीला शिव्याशाप देऊं लागल्या. हे वर्तमान भिक्षूंला व भिक्षूंकडून भगवंताला समजलें. तेव्हां त्यानें उदयीचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:- “जो भिक्षु स्त्रीपुरुषांमध्यें मध्यस्थी करील, लग्नसंबंधात किंवा जारसंबंधांत स्त्रीला पुरुषाची किंवा पुरुषाला स्त्रीची आवड उत्पन्न करील, त्याला संघादिशेष होतो.”

त्या काळीं कांहीं धूर्त उद्यानांत चौनीसाठीं गेले होते. त्यांनी एका वेश्येला तेथें बोलाविलें, पण ती तिकडे जाण्यास कबूल होईना. तेव्हां त्यांपैकी एकजण म्हणाला, “हे काम उदायी करील.” एक बुद्धोपासक तेथें होता; तो म्हणाला, “शाक्यपुत्रीय श्रमण असलीं कामें कधींहि करणार नाहींत. उदायीहि हें काम करावयाचा नाही.” भवति न भवति होऊन पैज लावली, व एकाला उदायीजवळ पाठविलें. उदायीनें त्या वेश्येचे मन वळवून तिला तेथें पाठविलें. तेव्हां त्या उपाकानें त्याची फार निंदा केली. त्याच्याकडून भिक्षूंला, व भिक्षूंकडून भगवंताला ही गोष्ट समजली, तेव्हां उदायीचा निषेध करून त्यानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

जो भिक्षु स्त्रीपुरुषांमध्यें मध्यस्थी करील, लग्नसंबंधांत किंवा जारसंबंधात स्त्रीला पुरुषाची किंवा पुरुषाला स्त्रीची आवड उत्पन्न करील, केवळ तावत्कालिक वेश्येशींहि मध्यस्थी करील, त्याला संघादिशेष होतो ।।५।।

१०. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेणुवनांत रहात होता. त्या काळीं आळवी येथील भिक्षु गृहस्थांशीं याचना करून कोणाच्या मालकीच्या नव्हत अशा आपणांसाठीं प्रमाणाबाहेर मोठ्या झोंपड्या बांधीत असत, व त्या पुर्‍या होत नसत. त्यामुळें त्यांना पुष्कळ याचना करावी लागत असे. माणूस द्या, बैल द्या, गाडा द्या, कुर्‍हाड द्या, कुदळ द्या, वेळू द्या, गवत द्या, असें ते लोकांना म्हणत, त्या योगें त्रास पावून भिक्षूंना पाहिलें कीं गृहस्थ इकडे तिकडे पळ काढीत; तोंड दुसर्‍या बाजूला फिरवीत किंवा दार लावून आंत बसत. दुरून गाईला पाहून देखील भिक्षु समजून लोक पळत असत. आयुष्मान् महाकाश्यप राजगृह येथें वर्षाकाळ घालवून प्रवास करीत आळवी येथें आला. तेथें भिक्षाटनासाठीं आळवींत गेला असतां लोक त्याला पाहून तोंड फिरवूं लागले, किंवा पळ काढूं लागले. पूर्वी आळवी सुभिक्ष असे, पण आतां हें कसें झालें, ह्याची जेव्हां महाकाश्यपानें चौकशी केली, तेव्हां त्याला वरील कारण समजून आलें.

वर्षाकाळ संपल्यावर बुद्धभगवानहि राजगृहाहून आळवीला आला. तेव्हां महाकाश्यपानें घडलेली गोष्ट भगवंताला सांगितली. त्यानें त्या भिक्षूंचा निषेध करून संघाला नियम घालून दिला तो असा:-
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel