त्या काळीं कल्याणभक्तिक नांवाचा गृहस्थ संघाला नित्यदान देत असे. एके दिवशीं विहारांत येऊन, उद्यां आपल्या घरीं कोणते भिक्षु येणार असें त्यानें विचारलें. मेत्तिय व भुम्मजक ह्या दोन भिक्षूंची त्या दिवशीं पाळी होती. त्याप्रमाणें ते येणार आहेत असें दब्बानें उत्तर दिलें. पण हे भिक्षु सज्जन नव्हते. त्यामुळें त्या उपासकाला अत्यंत वाईट वाटलें, व घरीं जाऊन त्यानें आपल्या दासीला सांगितलें कीं, जर ते भिक्षु आले तर त्यांना कोठडींत आसनें मांडून कण्यांचा भात व आंबील वाढ. त्याप्रमाणें दासीनें सर्व केलें. त्यामुळें त्या दोन भिक्षूंना फार राग आला. दब्ब मल्लपुत्रानेंच त्या उपासकाला असें करण्यास सांगितलें असावें अशी त्यांची समजूत झाली. आणि मेत्तिया नांवाच्या भिक्षुणीला त्यांनी दब्ब मल्लपुत्रावर तिच्यावर जुलूम केल्याचा आळ आणण्यासक शिकविलें.  तिनें भगवंताजवळ जाऊन, दब्बानें आपणावर जुलूम केला अशी तक्रार केली. पण पुढें चौकशीअंती हा आळ खोटा होता असें दिसून आलें. तेव्हां त्या भिक्षुणीला संघांतून काढून टाकून भगवंतानें भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु द्वेषबुद्धीनें ब्रह्मचर्यापासून (संघांतून) भ्रष्ट करण्याच्या हेतूनें भिक्षूला पाराजिका आपत्ति लागू करील-पण पुढें चौकशी केली असतां किंवा चौकशी केली नसतां ती गोष्ट निराधार ठरेल व हा दोषी ठरेल-त्याला संघादिशेष होतो ।।८।।

१३. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या काळीं मेत्तिय व भुम्मजक ह्या भिक्षूंनी गृध्रकूट पर्वतावरून खालीं येतांना एका बकर्‍याला बकरीशीं झालेला संग पाहिला. त्यांनीं त्या बकर्‍याचें नांव दब्ब मल्लपुत्र असें ठेवलें; बकरीचें मेत्तिया भिक्षुणी ठेवलें; आणि दब्बानें पाराजिक आपत्ति केल्याचें आपण स्वत: पहिले असें ते म्हणूं लागले. पुढें चौकशीअंतीं हा सर्व प्रकार उघडकीस आला. तेव्हां भगवंतानें त्यांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु द्वेषबुद्धीनें दुसर्‍या एकाद्या गोष्टीचा लेशमात्र घेऊन ह्या ब्रह्मचर्यापासून(संघांतून) भ्रष्ट करण्याच्या हेतूनें भिक्षूला पाराजिका आपत्ति लागू करील-पुढें चौकशी केली असतां किंवा चौकशी केली नसतां तें प्रकरण दुसरेंच ठरतें, व त्याच्या लेश मात्र येथें लागू केला असें दिसून येतें, आणि भिक्षु दोषी ठरतो-त्याला संघादिशेष होतो ।।९।।

१४. बुद्ध भगवान राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या काळीं देवदत्त, कोकालिका१ आणि समुद्रदत्त ह्या भिक्षूंपाशीं जाऊन त्यांना म्हणाला, “चला आपण श्रमण गोतमाच्या संघांत भेद पाडूं” कोकालिक म्हणाला, “पण श्रमण गोतम महानुभव आहे. त्याच्या संघांत भेद कसा पडतां येईल?” देवदत्त म्हणाला, “आपण त्याजपाशीं जाऊन ह्या पांच गोष्टींची याचना करूं. म्हणूं कीं, भंदत, आपण अनेक रितीनें संतुष्टीची आणि साधेपणाची स्तुति करीत असतां, आणि ह्या पांच गोष्टी संतुष्टीला आणि साधेपणाला कारणीभूत आहेत. (१) भिक्षूंनीं आजीवन अरण्यांत रहावें. जो गांवाजवळ राहील त्याला दोष समजावें. (२) आजीवन भिक्षेवर निर्वाह करावा. आमंत्रण स्वीकारील त्याला दोषी ठरवावें. (३) आजीवन चिंध्यांचींच चीवरें पांघरावी. जो गृहस्थानें दिलेलें चीवर ग्रहण करील त्याला दोषी समजावें. (४) आजीवन झाडाखालीं रहावें. जो छताखालीं राहील त्याला दोषी ठरवावें. (५) आजीवन मत्स्यमांसाचें ग्रहण करूं नये. जो ग्रहण करील त्याला दोषी समजावें. ह्या पांच गोष्टी श्रमण गोतम कबूल करणार नाही; व आम्ही त्यांच्यायोगें लोकांना आमच्या बाजूकडे वळवूं; व श्रमण गोतमाच्या संघांत फूट पाडूं. कारण लोकांची भक्ति रुक्ष आचरणावर जडते.” त्याप्रमाणें बुद्धाजवळ जाऊन त्यानें ह्या पांच गोष्टी अमलांत आणण्यास परवानगी मागितली. अर्थातच बुद्धानें ती दिली नाहीं; व त्यामुळें देवदत्तानें संघांत फूट पाडली. तेव्हां बुद्धानें त्याचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- मूळ वाक्य ‘कोकालिको कोटमारकतिस्सको खण्डदेविया पुत्तो समुद्ददत्तो’ असें आहे. २९व्या पाचित्तियांत ‘अय्यो कोकालिको, अय्यो कोटमारकतिस्सको अय्यो खंडदेविया पुत्तो, अय्यो समुद्ददत्तो’ असे वाक्य आढळतें, व त्यावरून हो चार निरनिराळे भिक्षु असावे असा सकृद्दर्शनीं ग्रह होतो. परंतु विचार केला असतां ह्या दुसर्‍या वाक्यांत कांहीं तरी घोटाळा झाला असावा असें वाटतें. कारण पुढल्या (११व्या) संघादिशेषांत ‘तस्सेव खो पन भिक्खुस्स भिक्खू होन्ति अनुवत्तका वग्गवादका, एको वा द्वे वा तयो वा’ हें वाक्य आहे. देवदत्ताचे दोस्त भिक्षु चार असते, तर येथें ‘चत्तारो वा’ असें असावयास पाहिजे. येवढेंच नव्हे साथी चार असले म्हणजे त्यांचा संघ होतो, व मोठ्या संघाला त्या चारांच्या संघाला बहिष्कार घालण्याचा अधिकार रहात नाहीं. बुद्ध घोषाचार्य म्हणतात:-

“यस्मा पन तिण्णं उपरि कम्मारहा न होन्ति, न हि संघो संघस्स कम्मं करोति, तस्मा एको वा द्वे वा तयो वा ति वुत्तं.” तात्पर्य येथें कोकालिक कोटमारकतिस्सक हा एक, व खंडदेवीचा पुत्र समुद्रदत्त हा दुसरा असे दोनच देवदत्ताचे साथी होते असें समजणें इष्ट आहे.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel