३७. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या वेळीं उपनंद शाक्यपुत्र राजगृह येथील एका कुटुंबांत जात येत असे. तेथें त्याला नित्य भिक्षा मिळत असे; व त्या घरांत कांहीं खाण्यापिण्याचा जिन्नस नवीन करण्यांत आला. तर त्याचा हिस्सा उपनंदासाठीं ठेवण्यांत येत असे. एके दिवशीं त्या कुटुंबांत मांस तयार केलें होतें, व त्यापैकीं कांही भाग उपनंदासाठीं राखून ठेवण्यांत आला होता. पण मुलगा सकाळींच उठून रडूं लागल्याकारणानें त्याला तें मांस द्यावें लागलें. जेव्हां उपनंद आला तेव्हां त्याला ही गोष्ट सांगून तो गृहस्थ म्हणाला, “त्या मांसाबद्दल आम्हीं तुम्हांला एक कार्षापण ठेवला आहे. त्याचें तुम्हांला मी काय घेऊन द्यावें?” उपनंद म्हणला, जर मला कार्षापण दिला आहे तर तोच माझ्या हातीं ठेव म्हणजे झालें.” त्यां गृहस्थानें तो कार्षापण उपनंदाला दिला खरा; पण उपनंदाचें कृत्य त्याला आवडलें नाही. तो त्यावर टीका करूं लागला. शेवटीं हें वर्तमान भगवंताला समजलें. भगवंतानें उपनंदाचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु सोनन्यारुप्याचें द्रव्य घेईल किंवा घेववील, किंवा खाली ठेवलेलें स्वीकारील, त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।१८।।

३८. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्यावेळीं षड्वर्गीय भिक्षु नाना प्रकारचा रुप्याचा व्यवहार (सराफी) करीत असत. गृहस्थांप्रमाणें हे शाक्यपुत्रीय श्रमण रुप्याचा व्यवहार करतात हें कसें? अशी त्यांजवर लोकांची टीका होऊं लांगली. ही गोष्ट भगवंताला समजली तेव्हा त्यानें षड्वर्गीयांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु नानाप्रकारचा रुप्याचा व्यवहार करील त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।१९।।

३९. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं उपनंद शाक्यपुत्र चीवर शिवण्यांत प्रख्यात होता. त्यानें वस्त्राच्या तुकड्यांची एक संघाटी बनविली, व चांगली रंगवून व इस्तरी करून तो ती वापरूं लागला. दुसर्‍या एका परिव्राजकानें ती पाहिली, व आपलें बहुमोल वस्त्र देऊन त्यानें ती मागितली. उपनंदानें संघाटी देऊन वस्त्र घेतलें. परिव्राजकाच्या आरामांत गेल्यावर इतर परिव्राजकांच्या सांगण्यावरून त्या परिव्राजकाला आपली चूक दिसून आली व तो उपनंदापाशीं येऊन आपलें वस्त्र परत मागूं लागला; व उपनंदानें तें दिल्यामुळें त्यावर टीका करूं लागला. हें वर्तमान भगवंताला समजलें तेव्हां त्या उपनंदाचा निषेध करून भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु नानाप्रकारें क्रयविक्रय करील त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।२०।।

४०. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथे जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु पुष्कळ भिक्षापात्रें सांठवून ठेवीत असत. विहार पहाण्यासाठीं आलेले लोक तीं पाहून टीका करूं लागले कीं, ह्या भिक्षूंनीं जणूं काय मातीच्या भांड्याचें दुकानच लावलें आहे. हें वर्तमान भगवंताला समजलें तेव्हां त्यानें षड्वर्गियांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

“जो भिक्षु (एकाहून) जास्त पात्र ठेवील त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें.”

त्या काळीं आयुष्मान् आनंदाला एक अतिरेक (जास्त) पात्र मिळालें होतें, व तें सारिपुत्ताला देण्याची त्याची इच्छा होती. आणि सारिपुत्त त्या वेळीं साकेताला रहात होता. तो दहा दिवसांच्या आंत श्रावस्तीला येणार होता. हें वर्तमान आनंदानें भगवंताला सांगितलें; तेव्हां त्यानें दहा दिवसपर्यंत अतिरेक पात्र ठेवण्यास परवानगी देऊन वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

अतिरेक पात्र दहा दिवसपर्यंत ठेवावें; त्याहून अधिक ठेवील त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।२१।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel