४८. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या  काळीं भिक्षु वर्षाकाळानंतर अरण्यांत रहावयास जात असत. कार्तिक महिन्यांतील चोर, ह्या भिक्षूंना पुष्कळ चीवरें मिळालीं असतील, ह्या समजुतीनें उपद्रव देत असत. हें वर्तमान भगवंताला समजलें, तेव्हां त्या प्रकरणीं भिक्षूंना बोलावून भगवान् म्हणाला, “भिक्षुहो, अरण्यांत रहाणार्‍या भिक्षूंना तिहींपैकीं एक चीवर गांवांत ठेवण्यास मी परवानगी देतों.” भगवंताची परवानगी मिळाली आहे म्हणून तिहींपैकीं एक चीवर ठेवून भिक्षु अरण्यांत रहात असत. अशीं चीवरें गांवांत फार दिवस राहिल्यानें नाश पावत असत (उंदीर वगैरे तीं खात असत). हें वर्तमान भगवंताला समजलें. तेव्हां त्यानें भिक्षूंना खालील नियम घालून दिला:-

वर्षाकाल संपल्यावर-कर्तिक पौर्णिमेनंतर-जीं साशंक आणि भयकारक आरण्यक वासस्थानें असतील, त्यांत रहाणार्‍या भिक्षूनें वाटल्यास तिहींपैकीं एक चीवर गांवांत ठेवावें; व कांहीं कारणास्तव जरूर लागल्यास सहा दिवसपर्यंत त्या चीवरापासून दूर राहावें. भिक्षूंच्या संमतीशिवाय त्यापेक्षां जास्त दिवस त्या चीवरापासून अलग राहील, त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।२९।।

४९. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं श्रावस्तींत एका पूगानें१  संघाला भोजन तयार करून चीवरवस्त्र देण्याचा बेत केला होता. षड्वर्गीय भिक्षु त्या पुगाजवळ जाऊन तीं चीवरवस्त्रें मागूं लागले. पण पूगाचे सभासद म्हणाले, “आम्हीं दरवर्षी जेवण देऊन संघाला चीवरवस्त्रें देत असतों. तेव्हां हीं चीवरवस्त्रें तुम्हांला देतां येत नाहींत. षड्वर्गीय म्हणाले, “संघाला देणारे पुष्कळ आहेत. पण आम्ही केवळ तुमच्यावर अवलंबून रहातों. तुम्ही जर आम्हांला देणार नाहीं तर दुसरा कोण देईल?” ह्याप्रमाणें अतिशय आग्रह केल्यामुळें त्या पूगानें तीं चीवरवस्त्रें त्यांना दिलीं. पुढें संघाला जेवण दिल्यावर इतर भिक्षु म्हणाले, “आतां तुम्हीं तयार करून ठेवलेलीं वस्त्रें आणून संघाला द्या.” तेव्हां पूगाचे सभासद म्हणाले, “आम्हीं वस्त्रें गोळा केलीं होतीं खरी; परंतु षड्वर्गियांच्या आग्रहास्तव त्यांना देणें भाग पडलें. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं; व ती कळून आल्यावर भगवंतानें षड्वर्गियांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- पूग म्हणजे कामगार लोकांचा संघ.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जो भिक्षु जाणून बुजून संघाला मिळणारा लाभ आपण मिळवील त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें. ।।३०।।

ब्याण्णव पाचित्तिय

५०. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं हत्थक शाक्यपुत्र वादविवादांत गुंतला होता. इतर पंथांच्या परिव्राजकांबरोबर वाद करीत असतां, आपला मुद्दां अमूक असें म्हणून, पुन्हां तो आपला मद्दाच नाहीं असें तो म्हणे; किंवा दुसरीच कांही तरी गोष्ट काढी. अमूक ठिकाणी अमक्या वेळीं वादासाठीं येईन असें म्हणून त्यावेळीं हजर रहात नसे. दुसर्‍या पंथाचे परिव्राजक ह्या त्याच्या वर्तनावर टीका करूं लागले, व भगवंताला हें वर्तमान समजलें तेव्हां त्यानें त्याचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु जाणून बुजून खोटें बोलेल त्याला पाचित्तिय होतें ।।१।।

५१. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु विद्वान् भिक्षूंबरोबर भांडण करून त्यांना शिवीगाळ करीत असत. तेव्हां त्यांचा निषेध करून भगवंतानें नियम केला तो असा:-

वर्मी बोलणार्‍यास पाचित्तिय होतें ।।२।।


५२. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु तंटा, भांडणें झालेल्या भिक्षूंच्या परस्परांशीं चहाड्या करीत असत. तेव्हां भगवंतानें त्यांचा निषेध करून नियम केला तो असा:-

भिक्षूची चहाडी केली असतां पाचित्तिय होतें ।।३।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel