८५. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं दोघे भिक्षु कोसल देशांत प्रवास करीत होते. त्यांपैकीं एक नियमाप्रमाणें वागत नसे, व दुसरा त्याला उपदेश करी. त्यामुळें पहिल्याला त्याचा राग आला. ते दोघे श्रावस्तीला आले. दुसरा भिक्षु तेथें एका पूगानें संघाला दिलेल्या भोजन प्रसंगीं जेवला. पहिल्याला ही गोष्ट माहीत होती. त्यानें त्याला आग्रह करून पुन्हां आपल्या नातलगाच्या घरीं जेवूं घातलें. आणि तो त्याला म्हणाला, “तूं मला उपदेश करीत होतास पण आज एकदां जेवून पुन्हां जेवलास।” ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं...व भगवंतानें त्या भिक्षूचा निषेध करून सर्व भिक्षूंना नियम घालू दिला तो असा:-

जो भिक्षु दुसरा भिक्षु जेवून तृप्त झाला असतां त्याला जाणूनबुजून आपत्ति लागू करण्याच्या हेतूनें भिक्षूंच्या शिल्लक राहिलेल्या, अन्नाशिवाय इतर अन्न ग्रहण करण्यास आग्रह करील, म्हणेल कीं, भिक्षु, हें अन्न खा, किंवा हें जेवण जेव, त्याला-इतर भिक्षूंनें तें अन्न ग्रहण केल असतां-पाचित्तिय होतें ।।३६।।

८६. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेणुवनांत रहात होता. त्या काळीं राजगृह येथें पर्वतावर जत्रा (गिरग्गसमज्जो) होती. सप्तदशवर्गीय भिक्षु तेथें गेले असतां लोकांनीं त्यांना स्नान वगैरे घालून जेवूं घातलें, व खाण्याचे जिन्नस देऊन परत पाठविलें. ते आरामांत येऊन षड्वर्गीयांना खाण्याचे पदार्थ देऊं लागले. तेव्हां षड्वर्गियांनीं ते विकालीं (मध्यान्हानंतर) खातात याबद्दल त्यांच्यावर टीका केली... व भगवंतानें नियम घालून दिल तो असा:-

जो भिक्षु विकालीं खाईल किंवा जेवील. त्याला पाचित्तिय होतें ।।३७।।

८७. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं आनंदाचा उपाध्याय बेलट्ठसीस अरण्यांत रहात होता. तो भिक्षाटन करून कोरडा भात आणीत असे व सुकवून ठेवीत असे; आणि जेव्हां भिक्षाटनाला जात नसे तेव्हां पाण्यानें भिजवून तो खात असे. ही गोष्ट भगवंताला समजली, तेव्हां त्याने त्याचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु खाण्याजेवण्याचे पदार्थ सांठवून खाईल किंवा जेविल त्याला पाचित्तिय होतें ।।३८।।

८८. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु उत्तम पदार्थ मागवून खात असत, त्यांवर लोक टीका करूं लागले; व भगवंतानें नियम केला तो असा:-

“तूप, लोणी, तेल, मध, काकवी, मत्स्य, मांस, दूध आणि दही अशा प्रकारचे उत्तम पदार्थ जो भिक्षु आपणासाठीं मागवून खाईल, त्याला पाचित्तिय होतें.”

त्या काळीं भिक्षु आजारी पडत. ते म्हणत, “पूर्वी आम्ही तूप, लोणी इत्यादी पदार्थ मागवून खात होतों; व तेणेंकरून आम्हांस बरें वाटे.” ही गोष्ट भगवंताला समजली तेव्हां त्यानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

तूप, लोणी, तेल, मध, काकवी, मत्स्य, मांस, दूध आणि दही अशा प्रकारचे उत्तम पदार्थ जो निरोगी भिक्षु आपणासाठीं मागवून खाईल, त्याला पाचित्तिय होतें ।।३९।।


८. बुद्ध भगवान् वैशाली येथें महावनांत कूटागार शाळेंत रहात होता. त्या काळीं एक पांसुकूलिक (चिंध्यांचीं चीवरें वापराणारा) भिक्षु स्मशानांत रहात होता. तो लोकांनीं दिलेलें कांहीं घेत नसे; झाडाखालीं किंवा उंबरठ्यावर लोकांनीं ठेवलेले पिंड खाऊन रहात असे. त्यावर लोक टीका करूं लागले. आणि भगवंतानें नियम केला तो असा:-

“जो भिक्षु न दिलेला आहार तोंडांत टाकील, त्याला पाचित्तिय होतें.”

त्या काळीं पाणी पिण्यास व दंतकाष्ठाचा उपयोग करण्यात भिक्षूंना संकोच वाटू लागला. तेव्हां भगवंतानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

जो भिक्षु पाणी आणि दंतकाष्ठ यांवांचून दुसरा न दिलेला आहार तोंडांत टाकील, त्याला पाचित्तिय होतें ।।४०।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel