९५. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या काळीं उपनंद शाक्यपुत्राच्या उपस्थायक कुटुंबांत उपनंदाला आणि इतर भिक्षूंना आमंत्रण होतें. सर्व भिक्षु येऊन आपापल्या आसनांवर बसले; व म्हणाले “विकाल होण्यापूर्वी आम्हांस जेवण दे.” पण उपनंद दुसर्‍या कुटुंबांत फिरत होता. तो आल्यावाचून उपासक भिक्षूंना जेवूं घालीना. त्याला येण्यास उशीर झाला, व त्यामुळें भिक्षूंना शांतपणें जेवतां आलें नाहीं. सज्जन भिक्षूंना ही गोष्ट आवडली नाहीं...आणि भगवंतानें नियम केला तो असा:-

“जो भिक्षु एका ठिकाणीं आमंत्रण केलें असतां जेवणापूर्वी इतर कुटुंबांत फिरत राहील. त्याला पाचित्तिय होतें.”

एके दिवशीं उपनंदाच्या उपस्थापक कुटुंबांतून विहारांत कांहीं खाण्याचा पदार्थ पाठविण्यांत आला होता, व तो उपनंदाला दाखवून संघाला देण्यांत यावा असा त्या गृहस्थाचा निरोप होता. उपनंद भिक्षेसाठीं गांवांत गेला होता. तेव्हां तो परत येईपर्यंत भगवंतानें तो खाण्याचा पदार्थ तसाच ठेवावा असें सांगितलें. जेवण्यापूर्वी इतर कुटुंबांत जाण्याची मनाई केली आहे म्हणून उपनंद जेवण झाल्यावर आपल्या ओळखीच्या कुटुंबांत फिरत राहिला; व त्यामुळें आरामांत येण्यास त्यास फार उशीर झाला. जेवण्याची वेळ निघून गेल्यामुळें तो पदार्थ भिक्षूंना खातां आला नाहीं, व त्या माणसांनीं तो परत नेला. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं; आणि भगवंताला ती समजली, तेव्हां त्यानें उपनंदाचा निषेध करून वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

“जो भिक्षु एका ठिकाणीं आमंत्रण केलें असतां जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर इतर कुटुंबांत फिरत राहील, त्याला पाचित्तिय होतें.”

पुढें एकदोन प्रसंगीं ह्या नियमांत फेरफार करण्यांत आला तो असा:-

जो भिक्षु एका ठिकाणीं आमंत्रण केलें असतां जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर प्रसंगावांचून इतर कुटुंबांत फिरत राहील, त्याला पाचित्तिय होतें. चीवरदानाची वेळ, व चीवर करण्याची वेळ, हा ह्या बाबतींत प्रसंग जाणावा ।।४६।।

९६. बुद्ध भगवान् शाक्य देशांत कपिलवस्तु तेथें निग्रोधारामांत रहात होता. त्या काळीं महानाम शाक्याच्या घरीं तूप लोणी इत्यादि औषधी पदार्थ होते. चातुर्मासांत संघाला औषधी पुरवण्याची परवानगी द्यावी अशी त्यानें भगवंताला विनंती केली, व ह्या बाबतींत भगवंतानें चातुर्मासांत गृहस्थानें औषधें देण्याची व्यवस्था केली असतां ती स्वीकारण्यास भिक्षूंना परवानगी दिली. परंतु भिक्षु महानाम शाक्यापाशीं थोडक्या प्रमाणांतच हे पदार्थ मागत असत. तेव्हां महानामानें आणखीहि मागून घ्यावे अशी विनंती केली. तरी भिक्षु अल्पप्रमाणांतच ते पदार्थ घेत असत. तेव्हां महानाम भगवंताला म्हणाला, “मी आमरण भिक्षुसंघाला औषधी पदार्थ देऊं इच्छितों.” तीहि गोष्ट भगवंतानें कबूल केली.

त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु नेसण्या पांघरण्यांत व्यवस्थितपणानें वागत नसत. त्यांना पाहून महानाम म्हणाला, “अशा रितीनें अव्यवस्थितपणे तुम्ही कां वागतां?” ह्या त्याच्या बोलण्यामुळें षड्वर्गीय भिक्षूंना त्याचा राग आला; व सूड उगविण्याच्या उद्देशानें ते त्याजवळ जाऊन औषधांसाठीं एकदम एक द्रोण१ तूप मागूं लागले. महानामानें त्यांस एक दिवस रहाण्यास सांगितलें; तेव्हां ते म्हणाले, “तुझ्या विनंतीचा उपयोग काय झाला? औषधी पदार्थ देण्याची तुझी इच्छा नसून तूं संघाला विनंती करतोस हें कसे?” हें त्यांचें भाषण ऐकून महानाम त्यांजवर टीका करूं लागला; व ही गोष्ट भगवंताला समजली, तेव्हां त्यानें भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- चार कुडव (एक मूठभर माप) म्हणजे एक प्रस्थ, चार प्रस्थ म्हणजे एक आढक, आणि चार आढक म्हणजे एक द्रोण.)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
निरोगी भिक्षूनें चातुर्मासांत औषधें घेण्याची विनंती स्वीकरावी; दुसर्‍यांदा केलेली विनंतीहि स्वीकारावी; आणि सदोदित औषधे घेण्याची विनंतीहि स्वीकारावी. पण औषधें मागण्यांत जो अतिरेक करील त्याला पाचित्तिय होतें ।।४७।।

९७. बुद्ध भगावान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं पसेनदि कोसल सैन्यासह कूच करीत होता. षड्वर्गीय भिक्षु फौजेचा कूच पहाण्यासाठीं गेले. त्यांना पाहून पसेनदि राजा म्हणाला, “तुम्ही य़ेथें कां आलां?” ते म्हणाले, “आम्ही महाराजांच्या दर्शनासाठीं आलों.” राजा म्हणाला, “युद्धांत आनंद मानणार्‍या मला पाहून तुम्हांला कोणता फायदा होणार? भगवंताला पहाणें तुम्हांला योग्य नाहीं काय?” षड्वर्गियांच्या ह्या कृत्यावर लोक टीका करूं लागले... आणि भगवंतानें ह्या बाबतींत नियम केला तो असा:-

“जो भिक्षु सैन्य कूच करीत असतां तें पाहाण्यासाठीं जाईल त्याला पाचित्तिय होतें.”

त्या काळीं एका भिक्षुचा मामा सैन्यांत आजारी होता. त्यानें त्या भिक्षूनें आपणांस य़ेऊन भेटावें असा निरोप पाठविला. ही गोष्ट त्या भिक्षूनें भगवंताला कळविली, व भगवंतानें ह्या प्रसंगीं तशाच कारणास्तव सैन्यांत जाण्यास परवानगी दिली, आणि वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

जो भिक्षु सैन्य कूच करीत असतां तशाच कारणावांचून तें पाहण्यासाठीं जाईल त्याला पाचित्तिय होतें ।।४८।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel