भगवंतानें उपदेशिलेल्या धर्माचा अर्थ मी असा समजतों कीं, जे अंतरायकारक धर्म (कामोपभोग) भगवंतानें सांगितलेले आहेत, ते सेवन करणार्‍याला त्यांजपासून अंतराय होणार नाहीं असें जो श्रामणेरहि म्हणेल, त्याला भिक्षूंनीं म्हणावें, “आयुष्मान् श्रामणेर, तूं असें म्हणूं नकोस. भगवंतावर आळ आणूं नकोस. भगवंतावर आळ आणणें चांगलें नाहीं. भगवान् (तूं म्हणतोस) असें कधींहि बोलणार नाहीं. भगवंतानें अनेक रितीनें अंतरायकर धर्म (कामोपभोग) अंतरायकारक आहेत, आणि ते सेवन केल्यास अंतराय घडेल, असें सांगतितलें आहे.” असें भिक्षूंनीं सांगितलें असतां तो श्रामणेर तसाच हट्ट धरून बसेल, तर त्याला भिक्षूंनीं म्हणावें, “आजपासून आयुष्मान श्रामणेर, त्या भगवंताला तूं आपला शास्ता (गुरु) म्हणूं नकोस. दुसरे श्रामणेर भिक्षूंबरोबर दोन तीन दिवस एके ठिकाणीं निजूं शकतात तेंहि तुला शक्य नाहीं. जा; तुझें वाटेल तें होऊं द्या. जो भिक्षु अशा रितीनें घालवून दिलेल्या श्रामणेराशीं जाणूनबुजून सलोखा करील, त्याच्याकडून आपली सेवा करवील, त्याच्याबरोबर जेवील किंवा एके ठिकाणीं निजेल, त्याला पाचित्तिय होतें ।।७०।।

१२०. बुद्ध भगवान् कौशांबी येथें घोषितारामांत रहात होता. त्या काळीं छन्न भिक्षु अव्यवस्थितपणें वागे, आणि, भिक्षूनें असें वागणें योग्य नाहीं, असें म्हटल्यास म्हणे कीं, चांगल्या हुशार भिक्षूला विचारल्याशिवाय तुमचें म्हणणें मी स्वीकारणार नाहीं. सज्जन भिक्षूंना ही गोष्ट आवडली नाहीं... आणि भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु भिक्षूंनीं नियमाची आठवण करून दिली असतां म्हणेल, “जोंपर्यंत दुसर्‍या हुशार विनयधर भिक्षूला मी विचारून खात्री करून घेतली नाहीं तोपर्यंत मी ह्या शिक्षापदाप्रमाणें (नियमाप्रमाणें) वागणार नाहीं,” त्याला पाचित्तिय होतें. शिकणार्‍या भिक्षूनें नियम समजून घ्यावे, त्यासंबंधीं इतरांस विचारावें, प्रश्न करावे, हा ह्या बाबतीत शिष्टाचार समजावा ।।७१।।

१२१. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं भगवान् भिक्षूंना अनेक रितीनें विनयकथा सांगत होता, विनयाचे गुण वर्णीत होता; आणि उपालीचे गुण वर्णीत होता. भगवान् उपालीची स्तुति करीत आहे, म्हणून भिक्षु त्याजपाशीं जाऊन विनय शिकत. परंतु षड्वर्गीयांना ही गोष्ट आवडली नाहीं. सगळे भिक्षु विनयांत कुशल झाले, तर आपणाला वारंवार दोष लावतील असें त्यांस वाटलें; आणि तेव्हां पासून ते विनयाची निंदा करूं लगाले; म्हणाले कीं, हे लहानसहान नियम म्हणत बसण्यांत काय अर्थ आहे? ह्यापासून शंका आणि त्रास होतो. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं...आणि भगवंतानें नियम केला तो असा:-

प्रतिमोक्ष म्हणत असातं जो भिक्षु म्हणेल, “ही लहानसहान शिक्षापदें (नियम) म्हणण्यांत काय अर्थ? त्याच्यापासून संशय, त्रास आणि मनाची रुखरुख मात्र उत्पन्न होते.” (अशा रितीनें) शिक्षापदांची निंदा केली असतां पाचित्तिय होतें ।।७२।।

१२२. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या वेळीं षड्वर्गीय भिक्षु नियमांचा भंग करून प्रातिमोक्ष म्हटला जात असतां म्हणत असत कीं, ह्या नियमाचा प्रातिमोक्षांत समावेश होतो, हें आम्हास आतांच समजले... त्यांचा निषेध करून भगवंतानें नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु दर पंधवड्याला प्रातिमोक्ष म्हटला जात असतां म्हणेल, “ह्या नियमाचा समावेश प्रातिमोक्षांत होतो, व दर पंधरवड्याला तो म्हटला जातो, हें मला आतांच समजलें.” परंतु तो भिक्षु दोनतीनदां किंवा त्याहीपेक्षां जास्ती वेळां प्रातिमोक्ष म्हणण्याच्या समयीं हजर होता, असें जर बर्‍याच भिक्षूंना माहीत असेल, तर केवळ अजाणपणामुळें तो भिक्षु त्या आपत्तीपासून मुक्त होत नाहीं. तिचें प्रायश्चित त्यानें केलें पाहिजे. आणखी त्याच्यावर जडतेचाहि (मोहाचाहि) आरोप लागू करावा:- आयुष्मान्, प्रातिमोक्ष म्हटला जात असतां तूं सावधपणें त्याजकडे लक्ष देत नाहींस, त्यामुळें तुझें फार नुकसान होत आहे. आणि ह्या त्याच्या जडतेबद्दल त्याला पाचित्तिय होतें ।।७३।।

१२३. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु रागावून विकृतमनानें सप्तदशवर्गियांवर प्रहार करीत; ते रडत असत... ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु दुसर्‍या भिक्षूवर रागावून विकृतमनानें प्रहार करील, त्याला पाचित्तिय होतें ।।७४।।

१२४. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु रागावून विकृतमनानें सप्तदशवर्गियांवर हात उगारीत असत... ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु भिक्षूवर रागावून विकृतमनानें हात उगारील, त्याला पाचित्तिय होतें ।।७५।।

१२५. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु पुरावा नसतां इतर भिक्षूंना संघादिशेष आपत्ति लागू करीत...ह्या प्रसंगी भगवंतानें नियम केला तो असा:-
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel