कस्सपसंयुत्ताच्या चंदूपमसुत्तांत भगवान् हवेंत हात हालवून भिक्षूंना म्हणतो, “भिक्षूहो, हा माझा हात हवेंत चिकटत नाहीं आणि बद्ध होत नाहीं. ह्याप्रमाणें कुटुंबांत भिक्षाटन करीत असतां ज्या भिक्षूंचें चित्त तेथें बद्ध होत नाहीं, ज्यांची लाभ करून घेण्याची इच्छा असेल, त्यांना लाभ होवो, व ज्यांना (दायकांना) इच्छा असेल ते पुण्य जोडोत, अशा विचारानें जो आपणाला मिळालेल्या वस्तूनें जसा संतुष्ट होतो तसाच इतरांना मिळालेल्या वस्तूनेंहि प्रमुदित होतो - अशा प्रकारचा भिक्षु कुटुंबांत भिक्षाटन करण्याला योग्य आहे. भिक्षुहो, कुटुंबांत भिक्षाटन करीत असतां काश्यपाचें चित्त तेथें बद्ध होत नाहीं... आपणाला मिळालेल्या वस्तूनें जसा तो संतुष्ट होतो, तसाच दुसर्‍याला मिळालेल्या वस्तूनें प्रमुदित होतो... भिक्षुहो, लोक माझा धर्मोपदेश ऐकतील, आणि प्रसन्न होतील व माझी योग्य संभावना करतील अशा बुद्धीनें जो भिक्षु धर्मोपदेश करतो, त्याचा तो धर्मोपदेश शुद्ध नव्हे... पण जो, माझा धर्मोपदेश ऐकून धर्म जाणतील व त्याप्रमाणें वागतील, अशा शुद्ध विचारांने केवळ करुणेनें, दयेनें आणि अनुकंपेनें इतरांना धर्मोपदेश करतो, त्याचा तो धर्मोपदेश शुद्ध होय, भिक्षुहो, काश्यप अशाच बुद्धीनें इतरांना धर्मोपदेश करीत असतो.”

बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणानंतर तीन महिन्यांनीं राजगृह येथें धर्माचा आणि विनयाचा संग्रह करण्यासाठीं जो पांचशें भिक्षूंची सभा (संगीति) भरली होती, तींत महाकाश्यपाला अध्यक्ष (संघस्थविर) निवडण्यांत आलें होतें. ह्यावरून संघांत महाकाश्यपाचा केवढा मोठा मान होता, हें स्पष्ट दिसतें.


अनुरुद्ध

“माझ्या दिव्यचक्षु भिक्षुश्रावकांत अनुरुद्ध श्रेष्ठ आहे.”

अनुरुद्धाचा जन्म अमितोदन शाक्याच्या १  घरी झाला. महानाम शाक्य त्याचा वडील बंधु. पित्याच्या मरणानंतर तोच घरची सर्व व्यवस्था पहात असे. अनुरुद्धाला प्रपंचाची माहिती मुळींच नव्हती. बुद्ध भगवंताची सर्वत्र प्रसिद्धि झाल्यावर थोर थोर शाक्य कुळांतील तरुण, भिक्षु होऊन त्याच्या संघांत प्रवेश करूं लागले. तेव्हां महानाम अनुरुद्धाला म्हणाला, “आमच्या कुळांतून एकहि भिक्षु झाला नाहीं. तेव्हां तूं तरी भिक्षु हो, किंवा मी तरी भिक्षु होतों.”  अनुरुद्ध म्हणाला. माझ्यानें हें काम झेंपणार नाहीं. तेव्हां तुम्हीच भिक्षु व्हा.”
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- ‘अमितोदनसक्कस्स गेहे पटिसांध गण्हि.’ आनंदासंबंधानें लिहितांना ह्याचा अट्ठकथेंत ‘अमितोदनसक्कस्स गेहे निब्बत्ति’ असें म्हटलें आहे. परंतु माज्झिमनिकायाच्या चूळदुक्खक्खन्ध सुत्ताच्या अट्ठकथेंत ह्या कुटुंबाची माहिती दिली आहे ती अशी :- शुद्धोदन, शुल्कोदन, शाक्योदन, धोतोदन आणि अमितोदन हे पांच भाऊ अमितादेवी त्यांची बहिण. तिष्यस्थविर तिचा मुलगा. तथागत आणि नंद शुद्धोदनाचे मुलगे. महानाम आणि अनुरुद्ध शुल्कोदनाचे, व आनंदस्थविर अमितोदनाचा मुलगा. तो भगवंतापेक्षां लहान, आणि महानाम मोठा. येथें दिलेल्या अनुक्रमांत अमितोदन शेवटला भाऊ दिसतो, व त्याचा मुलगा आनंद भगवंतापेक्षां वयाने लहान होता, हें ठीकच आहे. परंतु अमितोदनाच्या घरीं अनुरुद्धाचा जन्म झाला ह्या मनोरथपूरणीच्या म्हणण्याला ह्यामुळें बळकट विरोध येतो.
------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel