खेमा वेळुवनाची शोभा पाहून बुद्धदर्शन घेतल्यावांचून माघारें येऊं लागली. तेव्हां तिला नोकरांनीं राजाज्ञेची आठवण दिली. त्यामुळें नाखुशीनेंच भगवंताच्या दर्शनाला जाणें तिला भाग पडलें. भगवंताजवळ येऊन पहाते, तर त्याच्या मागें एक अत्यंत लावण्यवती स्त्री वारा घालीत उभी होती. तिला पाहून खेमा आपल्या मनांत म्हणाली, “अशा दिव्य स्त्रिया ज्या महर्षीच्या सेवेला तत्पर असतात, त्याच्या दर्शनाची मला लाज वाटावीना? धिक्कार असो मला आणि माझ्या आढ्यतेला! ह्या अप्सरेची मी दासी देखील शोभणार नाहीं!”

हे विचार खेमेच्या मनांत चालले आहेत तोच ती सुंदर स्त्री क्रमाक्रमानें पालटत चालली. थोडक्या अवकाशांत ती प्रौढ, म्हातारी व मरून पडलेली दिसली. तें पाहून आपल्या रूपाविषयीं खेमेचा अभिमान नाहींसा झाला. तेव्हां भगवान् म्हणाला, “कोळ्याच्या जाळ्याप्रमाणें आपल्या भोंवतीं जाळें विणून त्यांत कामासक्त मनुष्य बद्ध होतात. परंतु हेंहि तोडून आणि कामसुखाचा त्याग करून (सत्पुरुष) निरपेक्षपणें परिव्राजक होतात १.”
------------------------------------------------------------------------------------------------------------
१ मूळ गाथा धम्मपदांत आहे. तिचें हें भाषांतर नसून सार मात्र आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
हा उपदेश कानीं पडल्याबरोबर खेमा तेथल्या तेथें अर्हत्पदाला पावली. पुढें बिंबिसारराजाच्या परवानगीनें ती भिक्षुणी झाली.

अब्याकतसंयुत्ताच्या पहिल्या सुत्तांत खेमेचा आणि पसेनदि कोसल राजाचा संवाद आला आहे. त्याचा सारांश असा :-

“भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्यावेळीं खेमा भिक्षुणी कोसल देशांत प्रवास करीत श्रावस्ती आणि साकेत यांच्या दरम्यान तोरणवत्थु गांवीं वर्षावासाठीं राहिली होती. पसेनदि कोसल राजा साकेताहून श्रावस्तीला येत असतां एक रात्र मुक्कामाला तोरणवत्थूजवळ राहिला. त्या रात्रीं कोणातरी श्रमणाचा किंवा ब्राह्मणाचा उपदेश ऐकण्याची त्याला इच्छा झाली; व गांवांत चौकशी करण्यासाठीं त्यानें मनुष्य पाठविला. पण खेमेशिवाय दुसरा कोणी विद्वान् श्रमण किंवा ब्राह्मण तेथें नव्हता. खेमेच्या पांडित्याचें जेव्हां त्या मनुष्यानें वर्णन केलें, तेव्हां राजानें तिचीच भेट घेण्याचा निश्चय केला, व ती होती तेथें जाऊन तिला नमस्कार करून तो एका बाजूला बसला आणि म्हणाला, “आर्ये, तथागत मरणोत्तर होतो कीं नाहीं.”

खेमा :- महाराज, हें भगवंतानें सांगितलें नाहीं.

राजा :- ह्याचें कारण काय बरें?

खेमा :- महाराज, येथें तुम्हांला मी असा प्रश्न करतें कीं, तुमच्या पदरीं असा एकादा गणक आहे काय, कीं जो ह्या गंगेंतील वाळूची गणना करूं शकेल, किंवा जो महासमुद्रांतील उदक मापूं शकेल?

राजा :- आर्ये, असें करणें कसें शक्य होईल? महासमुद्र गंभीर असून अप्रमाण आहे.

खेमा :- त्याचप्रमाणें, महाराज, ज्या रूपानें तथागताला मोजतां येईल तें तथागताचें रूप नष्ट झालें आहे. ज्या वेदनेनें... ज्या संज्ञेनें... ज्या संस्कारांनीं... ज्या विज्ञानानें तथागताला मोजतां येईल तें तथागताचे विज्ञान नष्ट झालें आहे. म्हणून मरणोत्तर तथागत होतो किंवा नाहीं, इत्यादि प्रश्नांचीं सरळ उत्तरें देतां येणें शक्य नाहीं.”

पसेनदि राजा खेमेचें अभिनंदन करून श्रावस्तीला आला, व तेथें त्यानें भगवंताला हेच प्रश्न विचारले. भगवंतानेंहि खेमेप्रमाणेंच त्यांचीं उत्तरें दिलीं. तेव्हां तो म्हणाला, “ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. खेमा भिक्षुणीनेंहि ह्या प्रश्नांचीं अशींच उत्तरें दिलीं.”

ह्यावरून खेमेला प्रज्ञावती भिक्षुणींत अग्रस्थान कां मिळालें होतें, हें सहज लक्ष्यांत येण्याजोगें आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel