संयुत्तनिकायांत चित्तसंयुत्त नांवाचें ह्याच्यासंबंधानें एक प्रकरण आहे. त्यांत दहा सुत्तें आहेत. पैकीं कांहीं सुत्तांत चित्रानें भिक्षूंला विचारलेले प्रश्न आहेत, व कांहींत स्वतःच भगवंताच्या उपदेशाचें त्यानें विवेचन केलें आहे. शेवटल्या तीन सूत्तांत त्याच्या चरित्राशीं विशेष संबंध दिसतो; म्हणून त्यांचा सारांश येथें देतों.

(१) त्यावेळीं निगण्ठ नाथपुत्त १ मोठ्या निगण्ठसमुदायासह मक्षिकाशंडाला आला होता. कांहीं उपासकांना बरोबर घेऊन चित्र गृहपति त्याजपाशीं गेला, आणि कुशल प्रश्नादिक विचारून एका बाजूला बसला. तेव्हां नाथपुत्त त्याला म्हणाला, “हे गृहपति, अवितर्कअविचार समाधि आहे, ह्या श्रमण गोतमाच्या म्हणण्यावर तुझा विश्वास आहे काय?”
------------------------------------------------------------------------------------------------------------
१ जैन तीर्थंकर महावीरस्वामीला निगण्ठ नाथपुत्त(निर्ग्रंन्थ ज्ञातपुत्र) म्हणत असत.
------------------------------------------------------------------------------------------------------------
चित्र :- भंदत, ह्या बाबतींत भगवंतावर श्रद्धा ठेवण्याचें कारण वाटत नाहीं.

हें चित्राचें भाषण ऐकून नाथपुत्त आपल्या समुदायाकडे वळून म्हणाला, “हा चित्र गृहपति किती साधा आणि सरळ आहे पहा! वितर्क विचारांचा निरोध करणारा म्हणजे वार्‍याला जाळ्यांत बांधूं पहाणारा मनुष्य असला पाहिजे, किंवा गंगेचा ओघ आपल्या मुठीनें थांबवूं पहाणारा मनुष्य असला पाहिजे.”

चित्र म्हणाला, “भंदत, तुम्ही अनुभव-ज्ञानाला महत्त्व देतां कीं श्रद्धेला?”

नाथ :- हे गृहपति, श्रद्धेपेक्षां अनुभवज्ञान श्रेष्ठ आहे.

चित्र :- भदंत, जेव्हां जेव्हां माझी इच्छा असते, तेव्हां तेव्हां सवितर्क सविचार एकांतापासून प्राप्त झालेलें प्रीतिसुख ज्यांत आहे, अशा प्रथम ध्यानांत मी मग्न होतों.  जेव्हां इच्छा असेल, तेव्हां वितर्कविरांची शांति करून वितर्कविचारविरहित द्वितीय ध्यानांत मग्न होतों... तृतीय... चतुर्थ ध्यानांत मग्न होतों. अर्थात् अवितर्कअविचार समाधि आहे, हें जाणण्याला कोणत्याहि श्रमणावर किंवा ब्राह्मणावर श्रद्धा ठेवण्याची मला गरज नाहीं.”

हें ऐकून नाथपुत्त पुन्हां आपल्या शिष्यसमूहाकडे वळून म्हणाला, “हा चित्रगृहपति कसा द्वाड आणि शठ आहे पहा!”

चित्र :- भदंत, इतक्यांत तुम्हीं मला साधा आणि सरळ म्हणत होतां, आणि इतक्यांत द्वाड आणि शठ म्हणतां! एक तर तुमचें पहिलें भाषण खोटें असलें पाहिजे किंवा शेवटचें खोटें असलें पाहिजे. नंतर नाथपुत्ताला दहा १ (१- ह्या प्रश्नांचा चित्राच्या चरित्राशीं कांहीं संबंध नसल्यामुळें ते येथें दिले नाहींत.) प्रश्न विचारून त्यांच्या उत्तरांची वाट न पहातां चित्रगृहपति तेथून निघून गेला.

(२) एके वेळीं चित्राचा पूर्वींचा मित्र अचेल (नग्न) काश्यप मक्षिकाशंडाला आला होता. चित्रगृहपति तो होता तेथें जाऊन त्याला कुशल प्रश्नादिक विचारून एका बाजूला बसला, व म्हणाला, “भदंत काश्यप, परिव्राजक होऊन तुला किती वर्षे झाली?”

का० :- हे गृहपति, परिव्राजक होऊन मला तीस वर्षें झाली.

चित्र :- पण भदंत, ह्या तीस वर्षांत सामान्य लोकांपेक्षां कांहीं विशेष ज्ञान मिळविलें आहे कीं नाहीं?

का० :- शरीराचा नागवेपणा, शिरोमुंडण आणि केसांची चवरी ह्याशिवाय दुसरें कांहीं प्राप्त झालें नाहीं.

चित्र :- वाहवा रे वाहवा! हा तुमचा पंथ फारच चांगला म्हटला पाहिजे! ज्यांत तीस वर्षें राहून नागवेपणा, शिरोमुंडण आणि चवरी ह्यांशिवाय दुसरें कांहीं प्राप्त होत नाहीं!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel