अनित्यताभावनेच्यायोगे चार ध्याने आणि अष्टांगिक मार्गाचे रहस्य प्राप्‍त होते, एवढेच नव्हे, तर योग्याला क्रमक्रमाने चार लोकोत्तर आर्यमार्ग व फळे प्राप्‍त होतात.  विपश्यनाभावनेच्यायोगे प्रथम ध्यानादिक चार ध्यानापैकी एखादे ध्यान प्राप्‍त होऊन, सक्कायदिट्ठि (आत्मा हा भिन्न पदार्थ असून ती नित्य आहे अशी दृष्टि), विचिकिच्छा (बुद्ध, धर्म आणि याजविषयी शंका किंवा अविश्वास), आणि सीलब्बतपरामास (स्नानादिव्रतांनीच मुक्ति मिळेल असा विश्वास), या तीन संयोजनाचा (बंधनाचा) जर नाश करू शकला, तर तो स्त्रोत आपत्ति मार्गात येतो, त्याला स्त्रोत आपत्तिमार्गस्थ व त्या मार्गात स्थिर झाल्यावर स्त्रोतआपत्तिफलस्थ म्हणतात.  त्यानंतर त्याच किंवा अन्य ध्यानाच्यायोगे कामरोग, द्वेष आणि मोह हे दुर्बल झाले म्हणजे तो सकृदागामिमार्गात येतो.  त्याला सकृदागामिमार्गस्थ, आणि त्या मार्गात स्थिर झाल्यावर सकृदागामिफलस्थ म्हणतात.  त्यानंतर कामराग (कामवासना), पटिघ (क्रोध), या दोन संयोजनांचा पूर्णपणे उच्छेद करून तो अनागामिमार्गात येतो.  त्याला अनागामिमार्गस्थ, व त्यात स्थिर झाल्यावर अनागमिफलस्थ म्हणतात.  त्यानंतर रूपराग (ब्रह्मलोकादि प्राप्‍तीची इच्छा), अरूपराग (अरूपदेवलोकप्राप्‍तीची इच्छा), मान (अहंकार), उद्धच्च (भ्रांतचित्तता), आणि (अविद्या) या शिल्लक राहिलेल्या पाच संयोजनांचा समूळ नाश करून तो अर्हन्मार्गात येतो.  त्याला अर्हन्मार्गस्थ, व त्या मार्गात स्थिर झाल्यावर अर्हत्फलस्थ म्हणतात.  अशा पूर्णावस्थेला पोचलेल्या व्यक्तीच्या तोंडी खालील गाथा शोभण्यासारख्या आहेत.

सुसुखं वत जीवाम वेरिनेसु अवेरिनो ।
वेरिनेसु मनुस्येसु विहराम अवेरिनो ॥
सुसुखं वतं जीवाम आतुरेसु अनातुरा ।
आतुरेसु मनुस्सेसु विहराम अनातुरा ॥
सुसुखं वत जीवाम उस्सुकेसु अनुस्सुका ॥
उस्सुकेसु मनुस्सेसु विहराम अनुस्सुका ॥
सुसुखं वत जीवाम येसं नो नत्थि किंचनं ।
पीतिभक्खा भविस्साम देवा आभस्सरा यथा ॥१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१  वैर्‍यांमध्ये अवैरी होऊन आम्ही सुखाने जगतो; वैरी मनुष्यात आम्ही अवैराने वागतो.  आतुरांमध्ये अनातुर होऊन आम्ही सुखानं जगतो; आतुर मनुष्यात आम्ही अनातुरपणे वागतो.  उत्सुकांमध्ये अनुत्सुक होऊन आम्ही सुखाने जगतो; उत्सुक मनुष्यात आम्ही अनुत्सुकपणे वागतो.  ज्या आम्हाला काहीच नाही (नामरुपात्मक पदार्थांची आसक्ति नाही), ते आम्ही सुखाने जगतो; आभास्वर देवांप्रमाणे आम्ही प्रेमरुपी अन्न ग्रहण करतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel