जूजक म्हणाला “आपण मला सिंहाच्या तोंडांत माझें डोकें घालण्यास सांगत आहां! या मुलांनां घेऊन मी जर आपल्या वडिलांच्या राज्यांत गेलों, तर मला उत्तम बक्षीस म्हटलें म्हणजे कारागृहवास किंवा देहांतशासन हेंच मिळेल! तेव्हां मला आपल्या पित्याच्या राज्यांत जाण्याचा आग्रह करूं नका. या मुलांनां माझ्या गृहिणीच्या स्वाधीन करून मला एकदांचा तिच्या तोंडांतून मोकळा होऊं द्या!”

यावर वेस्संतर कांहीं बोलला नाहीं. मुलांनां घेऊन जाण्यास ब्राह्मण अत्यंत उत्सुक झाला होता. परंतु जालि व कण्हाजिना यांनीं आपल्या पित्याबरोबर चाललेला ब्राह्मणाचा संवाद ऐकून आश्रमाजवळील जंगलांत दडी दिली. तेव्हां जूजक वेस्संतराला म्हणाला “आपलीं मुलें कोठें आहेत? मी नेईन या भयानें लपविलींत कीं काय?”

जूजकाला उत्तर न देतां वेस्संतर आश्रमाबाहेर आला, आणि मोठ्या गंभीर स्वरानें म्हणाला “मुलांनों! तुमच्या पित्याचें वचन सत्य करणें सर्वस्वीं तुमच्या हातांत आहे. अशीं लपून बसूं नका. तुमचें हें कृत्य आमच्या थोर क्षत्रिय कुलाला शोभण्यासारखें नाहीं!”

तेव्हां तीं दोन्ही मुलें जंगलांतून बाहेर आलीं, व आपल्या पित्यासमोर उभीं राहिलीं. वेस्संतरानें त्यांनां ब्राह्मणाच्या हवाली करून त्याच्या हातावर पाणी सोडलें. त्याच्या कमंडलूंतील पाणी ब्राह्मणाच्या हातावर मोठ्या कष्टानें पडलें; पण तें डोळ्यांतून आपोआप वहात होतें!

मुलें पुन: पळून जातील, या भीतीनें जूजकानें एका वल्लीनें त्यांचे हात बांधले, आपल्या दंडकाष्ठानें तो त्यांनां बडवीत नेऊं लागला. तेव्हां कण्हाजिना आपल्या बापाला म्हणाली “बाबा, बाबा, ब्राह्मण मोठे क्षमाशील असतात असें आम्ही ऐकतों; पण हा मोठा क्रूर आहे! हा ब्राह्मणवेषधारी राक्षस असावा! बाबा, हा आम्हांला खाण्यासाठीं नेत आहे, तेव्हां तुम्ही आम्हांला याला देऊं नका!”

जालिकुमार म्हणाला “हा ब्राह्मण दंडकाष्ठानें मारतो, याजबद्दल मला खेद वाटत नाही; परंतु आईला पाहिल्यावांचून जावें लागत आहे, याजबद्दल मला अत्यंत दु:ख होतें.”
वेस्संतर आपल्या मुलांचें भाषण ऐकत होता, तथापि त्यांनां कांहीं एक उत्तर न देतां काष्ठवत् तटस्थ राहिला. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या, हेंच काय तें त्याच्या जीवंतपणाचें चिन्ह होतें.

जूजक मुलांनां घेऊन गेल्यावर सायंकाळीं मद्दीदेवी फलमूलें घेऊन आश्रमाकडे वळली. त्या दिवशीं वाघानें रस्ता अडविल्यामुळें तिला उशीर झाला. आश्रमांत मुलें नाहींत हें पाहून, मुलें कोठें गेलीं, असा तिनें पतीला प्रश्न केला. वेस्संतरानें आपलें मौनव्रत सोडलें नाहीं, तेव्हां तिनें आक्रोश करीतकरीत आसपासच्या अरण्यांत पुष्कळ शोध केला; पण व्यर्थ! वेस्संतरानें आणि मद्दीनें ती रात्र शोकांत घालविली. वेस्संतराचा शोक आंतल्याआंत चालला होता; परंतु मद्दीच्या विलापानें अरण्यवासी पशुपक्ष्यांचें देखील हृदय कंप पावलें!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel