अनुकेवट्टाची युक्ति ब्रह्मदत्ताला फारच पसंत पडली. त्यानें दुसर्‍या दिवशीं एक मोठा दरबार भरवून सरदारदरकदार वगैरे लोकांना आपापले उत्तमोत्तम वस्त्रालंकार घालून तेथें येण्यास हुकूम केला. सरदारांनीं व मानकर्‍यांनीं नुकतेच विकत घेतलेले कपडे अंगावर घातले व ते त्या दरबाराला गेले. ब्रह्मदत्तराजाचें सर्व लक्ष्य त्यांच्या त्या कपड्यांकडे व दागिन्यांकडे लागलें होतें. प्रत्येक सरदाराच्या आणि मानकर्‍याच्या अंगावर पूर्वी कधीं न पाहिलेले वस्त्रालंकार त्यानें या दिवशीं पाहिले. एवढेंच नव्हे, तर पुष्कळ वस्त्रांवर आणि अलंकारांवर महौषधाचा शिक्का त्याच्या पहाण्यांत आला. तेव्हां त्याच्या मनाची खात्री झाली, कीं, महौषधानें मोठमोठालीं बक्षिसें देऊन सैन्यांतील सर्व अधिकार्‍यांनां फितूर केलें आहे. अनुकेवट्टाच्या म्हणण्याची प्रतीति आल्यामुळें त्यावर ब्रह्मदत्ताचा पूर्ण विश्वास बसला.

एके दिवशीं अनुकेवट्ट घाबर्‍याघाबर्‍या ब्रह्मदत्तपाशीं येऊन म्हणाला "महाराज! आपण येथून आजच्या आज पळून जा कसे! आपल्या सरदारांनीं आणि मानकर्‍यांनीं असा एक गुप्त कट केला आहे, कीं, उद्यां सकाळी आपणाला पकडून महौषधाच्या स्वाधीन करावयाचें, आणि एकदां आपण त्या शेतकर्‍याच्या पोराच्या ताब्यांत गेलां, म्हणजे आपल्या जीविताची आशा करावयालाच नको!"

हें वर्तमान ऐकून ब्रह्मदत्तराजा गडबडून गेला. पुढें काय करावें, हेंच त्याला समजेना. तो अनुकेवट्टाला म्हणाला "या संकटांतून पार पाडणारा तुझ्यावांचून मला दुसरा कोणी नाहीं."

अनुकेवट्ट म्हणाला "महाराज, तुम्ही असे घाबरूं नका. तुमच्या सरदारांनीं आणि मानकर्‍यांनीं केलेल्या कटाची बातमी तुम्हाला समजली आहे, असें तुमच्या साशंक चर्येवरून त्यांनां दिसून आल्यास ते तुम्हाला आजच्या आज पकडून महौषधाच्या स्वाधीन करतील. म्हणून आजचा दिवस तुम्ही मोठ्या गांभीर्यानें वागलें पाहिजे. आज रात्रीं आपणाला येथून पळून जातां येईल, अशी मी व्यवस्था करतों."

अनुकेवट्टानें कोणाला न कळत आपल्या विश्वासू शिपायाकडून त्या रात्रीं दोन उत्तम घोडे तयार करविले, व मध्यरात्रीच्या सुमाराला तो ब्रह्मदत्ताजवळ जाऊन त्याला म्हणाला "महाराज, येथून निघून जाण्याची हीच वेळ आहे. पलीकडील आंबराईंत दोन घोडे तयार आहेत. तेथपर्यंत कोणाला चाहूल न दाखवितां आम्ही चालत जाऊं, व तेथें त्या घोड्यांवर स्वार होऊन पळून जाऊं."

तेव्हां ब्रह्मदत्त आणि अनुकेवट्ट त्या घोड्यांवर स्वार होऊन कोणाला नकळत तेथून पळून गेले.

काही अंतरावर गेल्यावर अनुकेवट्ट म्हणाला "महाराज, त्या दुष्ट शेतकर्‍याच्या पोराची मला बळकट शंका येते. त्याचे हेर रात्रंदिवस आपल्या सैन्यामध्यें घिरट्या घालीत आहेत. आपण दोघे पळून गेलों, हें वर्तमान त्याला इतक्यांत समजलेंच असेल, व आमच्या मागोमाग तो आम्हांला पकडण्यासाठीं घोडेस्वार पाठवील. माझ्या जीविताची मला पर्वा नाहीं; परंतु आपणाला जर त्यांनीं पकडलें, तर मीं आपणाला वांचविण्यासाठीं केलेली ही सर्व खटपट व्यर्थ जाणार आहे. म्हणून मी असें म्हणतों, कीं, आपण मागें न पहातां थेट आपल्या राजधानीचा रस्ता धरावा. मी येथेंच उभा रहातों, आणि आम्हांला पकडण्यासाठी घोडेस्वार आले असतां त्यांनां कांहींतरी थाप देऊन भलत्याच मार्गाला लावतों. मला ते पकडून नेतील, यांत शंका नाहीं. परंतु माझ्याबद्दल आपण काळजी करूं नका. मी त्या शेतकर्‍याच्या पोराला ओळखून आहें. त्यानें जरी मला पकडलें, तरी युक्तिप्रयुक्तीनें त्याच्या हातून निसटून लवकरच मी आपल्या दर्शनाला येईन."

ब्रह्मदत्ताला या वेळीं आपलेच प्राण वांचविण्याची पंचाईत पडली होती. तो अनुकेवट्टाची काळजी वागवीत कशाचा बसतो? त्यानें अनुकेवट्टाला तेथेंच सोडून पांचालदेशचा रस्ता धरला! अनुकेवट्ट तेथूनच मागें फिरला, आणि सकाळ होण्याच्या आधीं ब्रह्मदत्त पळून गेल्याची वार्ता त्यानें महौषधाला कळविली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel