त्याच्या आग्रहास्तव ब्राह्मणाकडून ऐकिलेल्या चारहि गाथा सुतसोमानें त्याला म्हणून दाखविल्या. तेव्हां तो बोधिसत्वाला म्हणाला “हे नरश्रेष्ठ! या तुझ्या अर्थपूर्ण सुंदर गाथा ऐकून मला अत्यंत आनंद झाला आहे. या चार गाथांबद्दल मी मोठ्या संतोषानें तुला चार वर देतो.”

बोधिसत्व म्हणाला “हे ब्रह्मदत्त! आपलें हिताहित न जाणतां केवळ जिव्हालौल्यानें तूं कुकर्मे करण्यास प्रवृत्त झालास. तुझ्या अंगी वर देण्याचे सामर्थ्य कोठून असणार! समज मी, तुझ्यापाशी वर मगितला, आणि तुझ्या स्वभावाप्रमाणे तू तो देत नाही असे म्हटलें, मग अशा वेळी भांडणाशिवाय दुसरे काय निष्पन्न होणार आहे! आणि कोणता शहाणा मनुष्य तुझ्यासारख्या माणसाशीं जाणूनबुजून भांडण उपस्थित करील?”

ब्रह्मदत्त म्हणाला “हे कुरुश्रेष्ठ! सर्व शंका सोडून दे. माझ्या वचनाचा मी कधीहि भंग करणार नाही. माझा प्राण गेला, तरी तूं मागून घेतलेले वर फेडल्यावाचून मी राहणार नाही.!”

याप्रमाणे ब्रह्मदत्तानें वर मागण्यास फारच आग्रह केल्यावर बोधिसत्व त्याला म्हणाला “ठीक आहे, पहिला वर मी असा मागतों, की, तुला शंभर वर्षेपर्यंत निरोगी आणि सुखी पहाण्यास मी समर्थ व्हावे.”

हें ऐकून ब्रह्मदत्ताला अत्यंत आनंद झाला. हा अलौकिक पुरुष वर मागतांना देखील दुसर्‍याच्याच कल्याणाकडे अधिक लक्ष्य देतो, असे वाटून मोठ्या हर्षानें तो बोधिसत्वाला म्हणाला “हा वर मी तुला दिला आहे. आता दुसरा वर माग.”

बोधिसत्व म्हणाला “हे जे राजकुमार तूं धरून आणिले आहेत, त्यांना जीवदान द्यावे, हा मी दुसरा वर मागतो.”

ब्रह्मदत्तानें तोहि वर मोठ्या संतोषाने दिला. तेव्हा बोधिसत्वानें त्या सर्व राजकुमारांना मुक्त करून आपापल्या राजधानीला पोहोचवावें, असा तिसरा वर मागितला.

ब्रह्मदत्तानें मोठ्या आनंदानें तोहि वर दिला; आणि बोघिसत्वाला चौथा वर घेण्यास सांगितलें.

बोधिसत्व म्हणाला “ज्या कृत्यामुळे तुझे राष्ट्र उपद्रव पावलें व इतर राष्ट्रांतील लोकांनांहि ज्यामुळें अत्यंत ताप होत आहे, तें नरमांसभक्षणाचें कर्म तूं सोडून द्यावें, हा मी चौथा वर मागतो.”

ब्रह्मदत्त म्हणाला, “याच्याबद्दल तूं दुसरा कोणताहि वर माग. ज्या नरमांसासाठी मी राज्याचा त्याग केला, ते खाण्याचें सोडून देणें मला कसे शक्य होईल?”

बोधिसत्व म्हणाला “मी तुला पूर्वीच सांगितलें होते, की, तूं या वर देण्याच्या भानगडीत पडूं नको म्हणून! कांकी, मी वर मागितला असतां तुझ्यानें तो देववणार नाही, व त्यामुळें विनाकारण भांडण मात्र होईल.”

हे बोधिसत्वाचें भाषण ऐकून ब्रह्मदत्ताला लाज वाटली, आणि तो म्हणाला “मनुष्यमांसासारखी मला दुसरी कोणतीहि वस्तू प्रिय नाही. तथापि मी मनुष्यमांस सोडावे असाच जर तुझा हट्ट असेल, तर तोहि वर मी तुला देतो.”

बोधिसत्व आपण स्वत: जाऊन वडाच्या झाडाच्या पारंब्याला बांधून घातलेल्या राजकुमारांना म्हणाला “मी तुम्हाला मुक्त करण्यासाठी येथे आलों आहे, परंतु तुम्हाला येथून सोडून देण्यापूर्वी तुम्ही ‘कल्माषपादानें (ब्रहमदत्ताच्या पायांत खैराचा सुळका भरून जखम झाल्यामुळे सुतसोमानें येथे त्याला कल्माषपाद म्हटले असावे.) आम्हाला अत्यंत त्रास दिला, आमचे तळहात फोडून त्यात दोर्‍या घालून आम्हाला येथे बांधून टाकिलें,’ असे म्हणून त्याचा सूड उगविण्याची बुद्धि मनांत वागविता कामा नये. त्याचा कोणत्याहि प्रकारे सूड उगविणार नाही, अशी जर तुम्ही प्रतिज्ञा करीत असाल, तर मी तुम्हाला सोडून देतो.”

राजकुमारांनी, ब्रह्मदत्ताचा सूड घेणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. एवढेंच नव्हे, तर आपण त्याच्यावर आपल्या आईबापांप्रमाणेंच प्रेम करू, असे अभिवचन दिलें. तेव्हा बौधिसत्वाने त्या सर्वांना मुक्त करून आपापल्या ठिकाणी पाठविलें. आणि कल्माषपादाला घेऊन तो वाराणसी नगरीला गेला. तेथें कल्माषपादाचा तरुण पुत्र, कालहस्ती सेनापतीच्या मदतीनें राज्य करीत होता. त्या दोघानांहि चार उपदेशाच्या गोष्टी सांगून कल्माषपादाचे पालन करण्याविषयी बोधिसत्वानें त्यांचे मन वळविलें.

ब्रह्मदत्त नरमांसापासून उपरत झाला आहे व यापुढें सद्धर्माने वागण्याचा त्यानें निश्चय केला आहे, इत्यादि वर्तमान ऐकून त्याच्या मुलाला आणि सेनापतीला फार संतोष झाला. त्यानें ब्रह्मदत्ताला राजवाड्यांत आणिलें, आणि सर्व नागरिकांसमोर बोधिसत्वाचा मोठा गौरव केला. बौधिसत्व एक महिनापर्यंत वाराणसीमध्ये राहिला व ब्रह्मदत्त पापकर्मापासून पूर्णपणे निवृत्त झाला, अशी खात्री झाल्यावर स्वदेशी परत गेला.

बोधिसत्वानें आपल्या सत्याचरणाच्या जोरावर कल्माषपादाचें दमन करून त्याला सन्मार्गाला लाविलें, ही गोष्ट सर्व भरतखंडात पसरली. बोधिसत्व जेव्हा इंद्रप्रस्थ नगराला आला, तेव्हा कौरव्य राजानें आणि सर्व नागरिकांनी सात दिवसपर्यंत उत्सव करून त्याचा मोठा गौरव केला. दूरदूरच्या देशांतून सुतसोम राजकुमाराची भेट घेण्यासाठी अनेक भाविक लोक येऊ लागले.
इकडे ब्रह्मदत्तानें ज्या वडाच्या झाडांखाली आपण वास केला होता. तेथे एक लहानसे शहर वसविलें व त्या शहराला कल्माषदम्य असें नाव दिलें.

या जन्मी बोधिसत्वानें आपलें वचन पाळून सत्यपारमितेचा अभ्यास केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel