त्यानें आपल्या गळ्यांतील मुक्ताहार काढून तो गौतमीकडे पाठविला. सिद्धार्थाचें मन आपणावर जडलें असावें असें वाटून कृशागौतमीला अत्यंत हर्ष झाला.

सिद्धार्थ आपल्या वाड्याशी आल्याबरोबर त्याला यशोधरादेवी पुत्र प्रसवली हे वर्तमान समजलें. तो मोठ्यानें उद्गारला “हा राहु झाला!”

राजपुत्राच्या वाड्यांतील दूतांनी सिद्धार्थाला पुत्र झाल्याची बातमी ताबडतोब शुद्धोदनराजाला कळविली. तेव्हा राजा त्यांना म्हणाला “माझा मुलगा पुत्रजन्माची शुभवार्ता ऐकून काय म्हणाला?”

ते म्हणाले “महाराज, युवराज दुसरें काही एक न बोलता ‘हें बंधन झाले; हा राहु झाला’, एवढेंच म्हणाला.”

राजा मोठ्या हर्षानें म्हणाला “माझ्या नातवाचें नाव राहुल हेच ठेवा. माझ्या मुलाला हें बंधन झाल्यामुळें आतां तो गृहत्याग करूं शकणार नाही. हजारों पहारेकर्‍यांपेक्षा, किंवा लोहशृंखलादिक बंधनापेक्षाहि हे पुत्रबंधन दृढतर आहे, याचा मला अनुभव आहे!”
राजानें या दूतांना शुभवार्ता आणिल्याबद्दल मोठमोठाली बक्षिसें दिली, व आपल्या राजवाड्यांत मोठा उत्सव केला. कपिलवस्तूतील नागरिकांनीहि आपापल्या घरी सिद्धार्थाला पुत्रलाभ झाल्याबद्दल उत्सव केला.

पण सिद्धार्थाचें मन मात्र दुसर्‍याच मार्गाकडे लागले होते. तो आपणाशीच म्हणाला, “जरा, व्याधि, मरण इत्यादि दु:खांपासून मुक्त होऊन आत्यंतिक सुखाचा मार्ग जर लाभला, तरच मला खरें समाधान होईल, तो पर्यंत आईबापें, पुत्र आणि स्त्री ही केवळ बंधने होत. पुत्रजन्म झाला म्हणजे लोक मोठा उत्सव करितात. पण त्या वेळी आपण मनुष्यप्राणी नश्वर आहों, हें ते विसरतात! पुत्र, दारा, धन, दौलत इत्यादि अशाश्वत गोष्टींच्या पायावर जे आपल्या सुखाची इमारत बांधतात, ते लवकरच दु:खभागी होतात, यांत नवल नाही! मला असल्या क्षणभंगुर सुखाची चाड नाही. शाश्वत सुखाचा जर शोध लागला, तर त्यामुळें मलाच नव्हे, पण सर्व मनुष्यप्राण्यांना फायदा होणार आहे.”

सिद्धार्थाच्या डोक्यामध्ये अशा प्रकारचे विचार घोळत असतां त्याच्या भोंवती राजवाड्यांतील नृत्यांगनांचा घोळका जमला. प्रत्येक नर्तकी आपापलें वाद्य घेऊन सिद्धार्थाचे यथाशक्ति रंजन करण्याचा प्रयत्न करूं लागली; परंतु सिद्धार्थाला त्यांच्या वाद्यांनी करमणूक न होता निद्रा आली! तेव्हां त्या स्त्रियाहि आपापली वाद्ये खाली ठेवून तेथेंच निद्रिस्त झाल्या.

मध्यरात्रीच्या सुमाराला सिद्धार्थ जागा होऊन पद्मासन घालून आपल्या मंचकावर बसला. जन्म, जरा, व्याधि, आणि मरण यांच्या विचारानें त्याचें चित्त व्यग्र होऊन गेले होतें. त्यानें त्या इतस्तत: अव्यवस्थितपणें निजलेल्या नर्तकीकडें एकवार दृष्टि फेंकली. त्यातील काही जणीं निद्रेमध्ये बरळत होत्या; काही जणींच्या तोंडांतून लाळ वहात होती; काही दात खात होत्या, काहींची वस्त्रें जाग्यावर नसून त्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. सिद्धार्थ हा सर्व देखावा पाहून अतिशय कंटाळला. पण जणू काय जीवंत माणसांच्या श्मशानांत बसलो आहे, असा त्याला भास झाला. तो आपणाशीच म्हणाला “या नर्तकी थोड्या वेळापूर्वी गायन, वादन, नृत्य आणि नाना प्रकारचें हावभाव करून जणू काय आपण देवलोकीच्या अप्सराच आहोंत, असें मला भासवीत होत्या, पण हा नुसता भास होता! आतां यांचे खरे स्वरूप दिसून येत आहे. निद्रा हा इहलोकीचा लहानसा मृत्युच होय. या अवस्थेंत मनुष्याची मरणोत्तर काय वाट होणार, याचे अनुमान करता येते. हे सौंदर्या, तूं आतां मला भुलवूं शकणार नाहीस! तूं किती क्षणभंगूर आहेस, किती नश्वर आहेस, यी मला यथार्थ कल्पना झाली आहे!”

सिद्धार्थ मंचकावरून उठला, आणि तडक दरवाज्याकडें गेला. तेथे त्याचा इमानी नोकर छन्न उंबरठ्यावर डोके ठेवून निजला होता. सिद्धार्थानें “येथे कोण आहे!” अशी मोठ्यानें हांक मारल्यावर छन्न जागा होऊन म्हणाला, “आर्यपुत्र, मी आपला सेवक छन्न आहे.”

सिद्धार्थ म्हणाला “माझ्या आवडत्या छन्ना! याच क्षणी तूं माझी एक कामगिरी बजावली पाहिजेस. आतांच्या आतां पागेंत जाऊन तूं माझ्यासाठी एक घोडा तयार करून आण.”

एवढ्या रात्री आपला धनी कोठे जाऊं इच्छितो, इत्यादि प्रश्न विचारण्याच्या भरीला न पडतां तो स्वामिभक्त सेवक तडक पागेंत गेला व कंथक नांवाच्या घोड्याला शृंगारून त्यानें सिद्धार्थाच्या वाड्याजवळ नेले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel