कालाम गुरू आणि सिद्धार्थ शिष्य असें नातें असतां, कालामानें सिद्धार्थाचा बहुमान केला. सिद्धार्थानें जेव्हा आकिंचन्यसमाधि साध्य केला, तेव्हा मोकळ्या मनानें कालामाने तो आपल्या योग्यतेला चढला ही गोष्ट कबूल केली, परंतु सिद्धार्थाचें कालामानें केलल्या बहुमानानें समाधान झालें नाही. तो आपणाशीच म्हणाला, “आकिंचन्यसमाधीने निर्वाणाची प्राप्ति व्हावयाची नाही. या समाधीनें दुर्वासनाचें काही कालपर्यंत दमन करितां येईल; परंतु त्यांचा समूळ उच्छेद व्हावयाचा नाही. माझ्या आचार्यांने उपदेशिलेल्या या मार्गाहून निर्वाणाचा मार्ग भिन्न असला पाहिजें.”

असा विचार करून सिद्धार्थ कालामऋषीचा आश्रम सोडून निघाला, आणि उद्रक राजपुत्र नावाच्या दुसर्‍या एका प्रख्यात तपस्वी ऋषीच्या आश्रमाला गेला.

उद्रक ऋषीनें सिद्धार्थाचे आगतस्वागत चांगले केले. सिद्धार्थानें जेव्हा त्याला आपलें वृत्त निवेदित केले, तेव्हां त्याला या राजपुत्रानें इतक्या अल्पावकाशांतच समाधीच्या सात पायर्‍या उल्लंघिल्याबद्दल फारच अचंबा वाटला. तो म्हणाला “हे राजपुत्र, माझ्या शिष्यशाखेंत पुष्कळ तपोवृद्ध श्रमण आहेत, पण इतक्या अल्पावकाशांत समाधीच्या सात पायर्‍या चढलेला शिष्य मला एक देखील आढळला नाही! तूं थोर कुलांत जन्मला असून तुझें पूर्ववय ख्यालीकुशालीत गेलें आहे. असें असतां आम्हां तपस्व्यांना जी गोष्ट मोठ्या कष्टानें साध्य होतें, ती तूं आयासावाचून साध्य केलीस, याबद्दल तुझें कौतुक करावें तेवढें थोडेंच आहे! तुझ्या प्रज्ञादिक गुणांनी आणि तपश्चर्येने तूं या आश्रमाला शोभा आणशील, यांत मला शंका नाही. आतां तुला शिकवायचा असा एकच समाधि शिल्लक राहिला आहे. कालामानें ज्या तुला सात पायर्‍या शिकविल्या, त्यांच्यापलीकडे आणखी एक पायरी आहे. तिला आम्ही नैवसंज्ञानासंज्ञायतनसमाधि असें म्हणतो. या समाधीमध्ये योगी तल्लीन झाला असतां त्याच्या मनांतून पदार्थमात्राची संज्ञा नष्टप्राय होऊन जातें. अभावाची संज्ञादेखील त्याच्या मनांत रहात नाही. म्हणून या समाधीला नैवसंज्ञानासंज्ञायतनसमाधि असें नाव दिलें आहे. या समाधीचा जर तूं अभ्यास करशील, तर तुला माझ्या धर्माचें रहस्य तेव्हांच कळेल.”

उद्रक ऋषीच्या उपदेशाला अनुसरून सिद्धार्थानें नैवसंज्ञानासंज्ञायतन समाधीचा थोडक्याच दिवसांनी पूर्ण अभ्यास केला, आणि उद्रक ऋषीजवळ जाऊन तो त्याला म्हणाला “भो आचार्य! आपण उपदेशिलेला शेवटचा समाधि मला पूर्णपणे साध्य झाला आहे. आतां पुढें काय करावें ते शिकवा.”

उद्रक म्हणाला “सिद्धार्था! आंता तुला शिकावयाचें काही राहिलें नाही. तूं माझ्यासारखाच माझ्या शिष्यशाखेचा प्रमुख आचार्य होऊन त्यांना हा माझा धर्म शिकीव.”

या दुसर्‍या गुरूनें केलेल्या बहुमानापासूनहीं सिद्धार्थाचें समाधान झालें नाही. तो आपणाशींच म्हणाला, “नैवसंज्ञानासंज्ञासमाधि सर्व समाधीत श्रेष्ठ आहे, यांत संशय नाही: तथापि त्याच्यायोगे निर्वाणाची प्राप्ति होणार नाही. या सर्व समाधीमुळे आमच्या दुष्ट मनोवृत्तीचें काही काळपर्यंत दमन होईल; परंतु त्यांचा समूळ नाश व्हावयाचा नाही. तेव्हां यापुढें ज्यात्या धर्मपंथांत शिरून कालाचा अपव्यय न करितां स्वत: प्रयत्न करून निर्वाणाचा मार्ग शोधून काढिला पाहिजें.”

नंतर उद्रक ऋषीचा निरोप घेऊन सिद्धार्थ फिरतफिरत गयेजवळ उरुवेला या ठिकाणी आला. हा प्रदेश फारच रमणीय होता. नैरंजा नदी याच प्रदेशांतून वहात होती, आणि अंतराअंतरावर या नदीच्या कांठी गावें वसली होती. बोधिसत्वाचे मन या प्रदेशांतील रम्य वनशोभेकडें वेधून गेले. तो आपणाशीच म्हणाला “असा प्रदेश माझ्या पहाण्यांत क्वचितच आला. काय ही वनशोभा! ही मंदमंद वाहणारी नदी तर जणूं काय मला उत्तेजन देत आहे. येथील रहिवाशांनी हे अरण्य तोडून हा प्रांत उध्वस्त केला नाही, हें एक तपस्विजनांचें भाग्यच समजलें पाहिजें.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel