(५)
बुद्धपदाचा लाभ आणि पहिला धर्मोपदेश


सिद्धार्थाचा जयजयकार करून आणि दिव्यपुष्पवृष्टीनें त्याची पूजा करून ब्रह्मादिक देवगण आपापल्या ठिकाणी गेल्यावर सिद्धार्थ ध्यानस्थ बसला, आणि रात्रीचा पहिला प्रहर संपण्यापूर्वी त्यानें दु:खाच्या कारणपरंपरेच शोध लावला.

अविद्येपासून संस्कार होतात, संस्कारांपासून विज्ञान, विज्ञानापासून नामरूप, नामरूपापासून षडायतन (पंचेंद्रिये आणि मन) षडायतनापासून स्पर्श, स्पर्शापासून सुखदु:खादिक वेदना, वेदनेपासून तृष्णा, तृष्णेपासून उपादान, उपादानापासून भव, भवापासून जन्म आणि जन्मापासून जरा, मरण, शोक, परिदेव, दु:ख, दौर्मनस्य आणि उपायास उद्भवतात. याप्रमाणे इहलोकीच्या दु:खाचा उगम होतो, पण अविद्येचा पूर्ण वैराग्यानें निरोध केला असता संस्काराचा निरोध होतो. संस्कराच्या निरोधाने षडायतनचा, षडायतनाच्या निरोधाने स्पर्शाचा, स्पर्शाच्या निरोधाने वेदनेचा, वेदनेच्या निरोधाने तृष्णेचा, तृष्णेच्या निरोधाने उपादानाचा, उपादानाच्या निरोधाने भवाचा, भवाच्या निरोधाने जन्माचा आणि जन्माच्या निरोधानें जरा, मरण, शोक, परिदेव, दु:ख, दौर्मनस्य, उपायस यांचा रोध होतो. याप्रमाणें या ऐहिक दु:खांचा निरोध होत असतो. अविद्येपासून जरामरणापर्यंत जी कार्यकरणपरंपरा, तिला बौद्धग्रथांमध्ये प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात.

वर सांगितल्याप्रमाणे दु:खाचा उगम कसा होतो आणि निरोध कसा होतो, हे जेव्हा सिद्धार्थाला समजलें, तेव्हां तो बुद्ध झाला. आपल्या ज्ञानदृष्टीने चार आर्यसत्यें आणि तदंतर्गत आर्य अष्टांगिक मार्ग त्याने पाहिला. मनुष्यप्राण्याचें हिताहित कशांत आहे, याचे आता त्याला स्पष्ट ज्ञान झाले. तेव्हा तो आपणाशीच उद्गारला, “ध्यानस्थ ब्राह्मणाला मोठ्या प्रयत्नानें जेव्हा सद्धर्माचा साक्षात्कार होतो, तेव्हा त्याच्या सर्व कुशंका विलयाला जातात. कार्यकारणपरंपरेचे त्याला नीट ज्ञान झालेलें असते.”
रात्रीच्या दुसर्‍या प्रहरी बुद्धानें प्रतीत्यसमुत्पादाचें पुन: समालोचन केले. दु:खाचा उगम कसा होतो आणि निरोध कसा होतो, याचा नीट विचार करून तो उद्गारला, “ध्यानस्थ ब्राह्मणाला प्रयत्नानें जेव्हा सद्धर्माचा साक्षात्कार होतो, तेव्हा त्याच्या सर्व कुशंक विलयाला जातात. कांकी, दु:खाच्या कारणांचा निरोध कसा करावा हे तो जाणतो!”

पुन: रात्रीच्या तिसर्‍या प्रहरी बुद्धानें प्रतीत्यसमुत्पादाचे समालोचन करून उद्गार काढलें की, “ध्यानस्थ ब्राह्मणाला मोठ्या प्रयत्नाने जेव्हा सद्धर्माचा साक्षात्कार होतो, तेव्हां त्याच्या सर्व कुशंका विलयाला जातात, आणि अंतरिक्षांत प्रकाशणार्‍या सूर्याप्रमाणें मारसेनेचा विध्वंस करून तो प्रकाशित होतो!”

बुद्ध याच आसनावर सात दिवसपर्यंत विमुक्तिसुखाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसला. आठव्या दिवशी त्या आसनावरून उठून तो न्यग्रोधवृक्षाखाली गेला व तेथेंहि तो सात दिवसपर्यंत विमुक्तिसुखाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसला.

तेथे एका मोठा गर्विष्ठ ब्राह्मण येऊन त्याला म्हणाला, “हे गौतम, कोणत्या गोष्टीमुळे मनुष्याला ब्राह्मण म्हणता येईल? ब्राह्मणाचे कर्तव्य काय?”

हे ऐकून बुद्धानें हे उद्गार काढिले, “ज्यानें पापाला आपल्या अंत:करणांतून टाकून दिले आहे, गर्वमल ज्याच्या अंत:करणाला शिवूं शकत नाही, ज्याचे ब्रह्मचर्य परिपूर्ण आहे, ज्याला इहलोकीच्या कोणत्याही गोष्टीविषयी तृष्णा नाही, ज्याने अंतर्दृष्टीनें ज्ञानाचा अंत पाहिला आहे, तोच आपणाला सत्यत्वाने ब्राह्मण म्हणू शकेल!”

तो आठवडा न्यग्रोधवृक्षाखाली घालवून पुढल्या आठवडयांत बुद्ध  सुचिंलिंदवृक्षाखाली गेला व तेथेहि एक आठवडापर्यंत विमुक्तिसुखाचा अनुभव घेता झाला, त्या वेळी अकालिक मेघ उत्पन्न होऊन मोठी वृष्टि झाली. तेव्हा बुद्धाला वृष्टिची बाधा होऊ नये म्हणून मुचिलिंद नागाराजा आपल्या नागलोकांतून बाहेर निघाला, आणि बुद्धाच्या मस्तकावर फणा करून उभा राहला. एका आठवड्यांतर जेव्हा पाऊस थांबून आकाश स्वच्छ झालें, तेव्हा मुचुलिंद आपले स्वरूप पालटून कुमारवेषाने हात जोडून बुद्धासमोर उभा राहिला. त्याला पाहून बुद्धगुरू उद्गारला “धर्माचें शिक्षण संपादून जो त्यातील रहस्य पाहून संतुष्ट होतो, त्याला एकांतवास सुखावह होतो; आणि प्राणिमात्रावर मैत्री केल्याने सुख कसे होते, हे त्याला समजते! इहलोकी कामवासनेचें उल्लंघन करून वैराग्याचा लाभ होणे सुखकारक आहे; पण याच्याहि पलीकडे अहंकार नष्ट होणे ही खरोखर सुखाची परमावधि समजली पहिजें!”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel