काश्यप म्हणाला “हे महाश्रमणा, तुझ्या रहाण्यापासून माझी कोणतीच अडचण होण्यासारखी नाही; पण माझ्या अग्निशाळेमध्ये भयंकर नाग रहात असतो;  तो तुला त्रास देईल अशी मला भीती वाटते.”

बुद्ध म्हणाला “त्याबद्दल तूं काळजी करूं नकोस. तूं मला एक रात्र येथें रहावयास परवानगी दे.”

काश्यप म्हणाला “असें आहे, तर तूं खुशाल येथें रहा.”

त्या रात्री बुद्धगुरू काश्यपाच्या अग्निशाळेंत ध्यानस्थ बसला असतां तो महासर्प तेथें आला, व आपल्या तेजानें बुद्धाचा पराभव करण्याचा प्रयत्नं करू लागला. त्याचे फूत्कार ऐकून व त्याच्या तेजानें अग्निशाला प्रकाशित झालेली पाहून, काश्यपाच्या आश्रमांतील जटिल अग्निशालेभोंवती जमले, व आपापसांत बोलूं लागले, कीं, “अरेरे¡ गरीब बिचारा श्रमण या महासर्पाच्या तावडीत सांपडला आहे¡”

परंतु बुद्धाच्या प्रभावापुढें त्या नागाचें कांहीएक चाललें नाही. शेवटीं बुद्धाने आपला सामर्थ्यानें त्याचें तेज हरण करून त्याला आपल्या भिक्षापात्रांत झांकून ठेविलें.

दुसर्‍या दिवशी सकाळीं बुद्ध आपलें भिक्षापात्र उघडें करून तो नाग काश्यपाला दाखवून म्हणाला, “भो काश्यप¡ हा पहा तुझा घोर महासर्प निस्तेज होऊन कसा पडला आहे तो¡”

तो चमत्कार पाहून काश्यपाच्या मनांत असा विचार आला, कीं, “हा महाश्रमण मोठा बुद्धिमान आहे;  तथापि तो माझ्यासारखा अर्हत्पदाला पोहोंचला नसावा.”

दुसर्‍या दिवशी बुद्धगुरू काश्यपाच्या आश्रमाजवळ अरण्यांत रहात होता. त्या रात्रीं चार दिक्पाल त्याचा धर्म ऐकावयासाठीं तेथे आले. त्यांच्या तेजानें ती सर्व वनभूमी प्रकाशित झालेली काश्यपानें पाहिली, व दुसर्‍या दिवशीं सकाळी तो बुद्धाला जेवणाचें आमंत्रण करण्यासाठीं गेला असतां म्हणाला “ हे महाश्रमण, रात्रीं या प्रदेशांत मोठा प्रकाश दिसत होता, तो कशाचा?”

बुद्धानें ‘रात्रीं चार दिक्पाल आपला धर्म श्रवण करण्यास आले होते.’ असे सांगितल्यावर काश्यप मनांतल्यामनांत म्हणाला “हा महाश्रमण मोठा ऋद्धिमान् आहे खरा¡ तथापि तो माझ्यासारखा अर्हत्पदाला पोहोंचला नसावा.”

त्या दिवशीं काश्यपाच्या आश्रमांत भोजन करून बुद्ध त्याच अरण्यप्रदेशांत राहिला. रात्रीं इंद्र त्याचा धर्मोपदेश श्रवण करण्यासाठी तेथें आला. त्याच्या तेजाने काश्यपाच्या आश्रमाच्या आसपासचा प्रदेश अत्यंत प्रकाशित झालेला पाहून काश्यप चकित होऊन गेला. दुसर्‍या दिवशीं इंद्र बुद्धाचा धर्मोपदेश श्रवण करावयाला आला होता, हें वर्तमान त्याला समजलें. तेव्हां पूर्वीचाच विचार पुन: एकवार त्याच्या मनामध्यें आला.

नंतर एके दिवशी रात्रीं बुद्धाच्या दर्शनाला ब्रह्मदेव आला होता, हें वर्तमान काश्यपाला समजलें. तथापि बुद्ध अर्हत्पदाला पोंचला होता, याजबद्दल त्याची खात्री झाली नाहीं.

एके दिवशी काश्यपाच्या आश्रमांत मोठा यज्ञसमारंभ होणार होता, त्यासाठी अंग आणि मगध देशांतील पुष्कळ लोक खाण्यापिण्याचे जिन्नस घेऊन तेथें येणार होते. तेव्हा उरुवेलकाश्यपाच्या मनांत असा विचार आला, कीं, “उद्यां माझ्या आश्रमांत अंग आणि मगध देशांतील पुष्कळ लोक जमणार आहेत. जर हा महाश्रमण त्यांनां आपल्या ऋद्धीचा चमत्कार दाखवील, तर याचा लाभसत्कार वाढेल, व माझा लाभसत्कार कमी होईल. हा जर उद्यां येथें आला नाहीं, तर बरें होईल.”

काश्यपाच्या मनांतील हा विचार जाणून बुद्ध यज्ञाच्या दिवशी त्याच्या आश्रमांत गेला नाहीं.

यज्ञ संपून लोक आपापल्या घरीं गेल्यावर दुसर्‍या दिवशी काश्यप बुद्धाला आमंत्रण करण्यासाठीं तो बसला होता त्या अरण्यांत गेला, आणि त्याला म्हणाला “हे महाश्रमण, भोजनाची सर्व सिद्धता आहे. पण तूं काल कां आला नाहींस?”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel