बुद्धानें वेणुवनाचा स्वीकार केला; आणि भिक्षूंनां उद्देशून तो म्हणाला “भिक्षुहो, आजपासून लोकांनी दान दिलेला आराम (विहार) स्वीकारण्याविषयी मी तुम्हाला परवानगी देतों.”

त्या काळीं राजगृहाजवळ संजय नांवाचा सुप्रसिद्ध परिव्राजकाचार्य रहात असे. त्याची मोठी शिष्यशाखा होती. सारिपुत्त आणि मोग्गल्लान या दोन ब्राह्मण परिव्राजकांची त्याच्या प्रमुख शिष्यांत गणना होत असे. पण संजयाच्या तत्त्वज्ञानानें त्या दोघांचे समाधान झालें नसल्यामुळें त्यांनी असा बेत ठरविला होता, कीं, दोघांपैकी एकाला जर निर्वाणाचा खरा मार्ग सांपडला, तर त्यानें तो दुसर्‍याला सांगावा.

एके दिवशी अस्सजि (अश्वजित्) नांवाचा भिक्षु राजगृहांत पिंडपातासाठीं (भिक्षेसाठी) फिरत असतां त्याला सारिपुत्तानें पाहिलें. त्याची शांत मुद्रा आणि गंभीरपणाची चालचालणूक पाहून सारिपुत्राला वाटलें, कीं, जे कोणी निर्वाणमार्गाला लागलेले असतील, त्यांपैकी हा एक असावा. तेव्हां सारिपुत्त त्याच्या मागोमाग राजगृहांतून बाहेर पडला.

अस्सजि आपल्या पात्रांत पडलेले अन्न वस्त्रानें झांकून वेणुवनांत जात असतां वाटेंत सारीपुत्तानें त्याला गांठलें; आणि कुशलप्रश्नादि विचारून झाल्यावर सारिपुत्त म्हणाला “आयुष्मन, तुझी चर्या अत्यंत प्रसन्न दिसत आहे. तूं कोणत्या धर्माचा अनुयायी आहेस? तुझा गुरू कोण? आणि त्याचें मत काय?”

अस्सजि म्हणाला “मी नुकताच भिक्षु झालों आहें. मला विस्तारानें गुरूचें मत सांगता येणार नाही; पण तें मी संक्षेपानें सागूं शकेन.”

सारिपुत्त म्हणाला “हरकत नाही. संक्षेपानें किंवा विस्तारानें जें कांहीं सांगण्यासारखें असेल ते सांग. मला सारांशच पाहिजे आहे. शब्दपांडित्य घेऊन काय करावयाचे आहे?”

अस्सजि म्हणाला  “जीं दु:खें कारणापासून उत्पन्न होतात, त्यांचे कारण तथागताने सांगितलें आहे; आणि त्या कारणांचा निरोध कसा करावा, हेंहि सांगितलें आहे. आमच्या गुरूचें हेंच मत आहे.”
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(मूळ गाथा अशी आहे-

ये धम्मा हेतुप्पभवा हेतुं तेसं तथागतो आह
तेसं च यो निरोधी एवं वादी महासमणो।)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या अस्सजीच्या धर्मवाक्यानें सारिपुत्राला बुद्धाचा धर्म निर्वाणाचा खरा मार्ग आहे, अशी खात्री वाटली; आणि तो अस्सजीला म्हणाला “आजकाल जर खरा धर्म असेल, तर तो हाच आहे¡”

सारिपुत्त तेथून मोग्गल्लानाजवळ गेला आणि त्यानें घडलेली सर्व गोष्ट त्याला सांगितली. तेव्हां मोग्गल्लान म्हणाला “ आम्ही याच क्षणी बुद्धाच्या दर्शनाला जाऊं.”

सारिपुत्त म्हणाला “आयुष्मन्¡ संजयाच्या शिष्यांपैकी अडीचशें परिव्राजक आम्हा दोघांवर अवलंबून आहेत. तेव्हां प्रथमत: त्यांनां भेटून त्यांची सल्ला घेऊन मग बुद्धदर्शनाला जाऊं.”

हें संभाषण पुरें झाल्यावर ते दोघे आपल्यावर अवलंबून राहणार्‍या परिव्राजकांना भेटले व त्यापुढें बुद्धाचे शिष्य होण्याचा आपला निश्चय त्यांनी त्यांनां कळिवला; तेव्हां ते अडीचशें परिव्राजक सारिपुत्तमोग्गल्लानांबरोबर बुद्धाचे अनुयायी होण्यास सिद्ध झाले. त्यांजसह वर्तमान सारिपुत्त आणि मोग्गल्लान संजयाजवळ जाऊन त्याला म्हणाले “ आयुष्मन्, आम्ही बुद्ध गुरूजवळ जात आहोंत. आजपासून तो आमचा गुरू आहे.”

संजयानें न जाण्याविषयीं पुष्कळ आग्रह केला. पण तो सारिपुत्त-मोग्गल्लानांचें मन वळवूं शकला नाहीं. त्याला आपली एवढी मोठी शिष्यशाखा नष्ट झाल्याबद्दल अत्यंत खेद झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel