देवदत्त आपल्या अनुयायांनां धर्मोपदेश करीत बसला असतांना सारिपुत्त आणि मोग्गल्लान त्या ठिकाणीं पोहोंचले. त्यांनां पाहून समुद्रदत्त देवदत्ताला हळूच म्हणाला “हे दोघे त्या गौतमाचे दुष्ट अग्रशिष्य आपणांपाशी येत आहेत त्यांनां आपण येथें थारा देऊं नका.”

देवदत्त म्हणाला “आपल्या गुरुला कंटाळून ते मजपाशी आले असतील. तेव्हां त्यांचा मला योग्य आदरसत्कार केलाच पाहिजे.”

देवदत्तानें सारिपुत्त- मोग्गल्लानांचे फारच आतिथ्य केलें. बराच वेळ उपदेश केल्यानें देवदत्ताला थकवा आला होता. तेव्हां तो सारिपुत्ताला म्हणाला “ आयुष्यमन्, आतां जरी बरीच रात्री झाली आहे, तरी भिक्षुसंघाची धर्मश्रमणाची आस्था कमी झालेली दिसत नाहीं. पण मला बरेच श्रम झाले आहेत. आतां तुझ्या तोंडचे उपदेशपर शब्द माझ्या संघाला ऐकूं दे. मी विश्रांति घेण्यासाठी जातों.”

देवदत्ताला लवकरच गाढ निद्रा लागली. इकडे सारिपुत्तानें त्या भिक्षुंनां उपदेश करून त्यांचीं मनें  वळविलीं. तेव्हां ते सर्वजण सारिपुत्ताबरोबर बुद्धदर्शनाला जाण्यास सिद्ध झाले व देवदत्त उठण्यापूर्वी गयेहून राजगृहाला जाण्यासाठी निघाले.

तेव्हां समुद्रदत्त घाबर्‍याघाबर्‍या देवदत्ताला उठवून म्हणाला “या सारिपुत्त- मोग्गल्लानांला येथें येऊ देऊं नका, असें मीं तुम्हाला सांगितलें नाही काय? आतां ते तुमच्या सर्व अनुयायांना घेऊन राजगृहाला गेले!”

हें ऐकून देवदत्ताला वज्रप्रहार झाल्यासारखें दु:ख झालें!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel